कमी पटसंख्या असलेल्या शाळांना उद्ध्वस्त करणारा जीआर राज्य सरकारने काढल्यामुळे शनिवारी, ५ सप्टेंबर रोजी साजरा होणा-या शिक्षक दिनावर बहिष्काराचे सावट पसरले आहे.
मुंबई- शिक्षक दिनाच्या २८ ऑगस्ट रोजी राज्यातील हजारो शिक्षकांना अतिरिक्त ठरवून कमी पटसंख्या असलेल्या शाळांना उद्ध्वस्त करणारा जीआर राज्य सरकारने काढल्यामुळे शनिवारी, ५ सप्टेंबर रोजी साजरा होणा-या शिक्षक दिनावर बहिष्काराचे सावट पसरले आहे.
कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती, मुख्याध्यापक महामंडळ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेल, लोकभारती आदी संघटनांकडून शिक्षक दिन हा काळा दिवस म्हणून पाळला जाणार असून सरकारच्या या धोरणाविरोधात लाखो शिक्षक काळ्या फिती लावून सरकारचा निषेध नोंदवणार आहेत, तर अनेक ठिकाणी लेखणी बंद आणि सरकारविरोधात निदर्शनेही करण्यात येणार आहेत.
दरम्यान, २८ ऑगस्टचा जीआर सरकारने मागे घ्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, लोकभारती, शिक्षण हक्क कृती समिती आदी मागणी केली असून यात आता राज्यातील नामवंत साहित्यिकांनीही सरकारला हा जीआर मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. यात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे, साहित्यिक अरूण साधू, डॉ. नागनाथ कोतापल्ले, फादर फ्रान्सिस दिब्रीटो, प्रा. नीरज हातेकर, रंगनाथ पठारे, आणि अरूण म्हात्रे आदींनीही मागणी केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष महादेव सुळे यांनी सरकारचा निर्णय हा गरीबांच्या शिक्षणाचा हक्क हिरावणारा असल्याने शिक्षक दिनी शिक्षकांनी लेखणी बंद करावे असे आवाहन केले आहे. तर लोकभारतीचे आमदार कपिल पाटील हे आपल्या विविध मागणसाठी शिक्षक दिनी परळ येथील कामगार मैदानात सकाळी ११ पासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत एक दिवसाचे उपोषण करणार आहेत.
पाटील यांच्या उपोषणाला शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, आणि शाळा कृती समितीनेही पाठिंबा दर्शवला आहे. तर सरकारने हा काळा जीआर मागे घ्यावा अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.
२८ ऑगस्टच्या जीआरविरोधात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यकि शाळा मुख्याध्यापक संघाकडून शिक्षक दिनी राज्यभरात उपवास करून सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. तर या संघाचे हजारो प्रतिनिधी हे काळ्या फिती लावून दिवसभर काम करतील मात्र शिक्षक दिनाच्या कोणत्याही सरकारी कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत, अशी माहिती संघाचे मुंबई प्रमुख प्रशांत रेडीज यांनी दिली.