दादर येथील चैत्यभूमीत महापरिवर्णादिनानिमित्त आलेल्या बहुतांश अनुयायांनी आजच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (रिपाइं)च्या नेतृत्त्वावर नाराजी व्यक्त केली.
मुंबई – दादर येथील चैत्यभूमीत महापरिवर्णादिनानिमित्त आलेल्या बहुतांश अनुयायांनी आजच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (रिपाइं)च्या नेतृत्त्वावर नाराजी व्यक्त केली. आपल्या खासगी हितासाठी अद्यापही दलितांच्या प्रश्नांव स्वत:ची पोळी भाजणा-या नेत्यांऐवजी अद्यापही समाजाला कणखर नेतृत्त्व मिळाले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
आजही शिवाजी पार्क परिसरात आंबेडकरी अनुयायांना मूलभूत सोयीसुविधा मिळत नसून, दलित नेतृत्व आमच्या प्रश्नांवर स्वत:ची पोळी भाजत आहे. म्हणावे तसे काम नेत्यांकडून झालेले नाही. ते केवळ आश्वासनांवरच वेळ मारून नेत आहेत. – वर्षा कांबळे, हिंगोली
दादर येथे अनुयायांसाठी आंघोळीची व्यवस्था नाही. गेल्या दोन दिवसांपूर्वीच मी आलो आहे. पण, स्वच्छतागृहे दिसली नाहीत. एका कोप-यात स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याऐवजी शिवाजी पार्कच्या प्रत्येक कोप-यात स्वच्छतागृहे उभारली गेली पाहिजेत. येथे राहण्याचीही योग्य सुविधा उपलब्ध होत नाही. आजचे नेते दलित प्रश्नांकडे कानाडोळा करत आहेत. या सर्व नेत्यांनी केवळ स्वार्थ साधला आहे. – राजू साने, परभणी
चैत्यभूमीला उसळणारा जनमसुदाय हा दलित नेतेमंडळींसमोर भाषणाचे मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देतो. प्रत्येक भागातून आंबेडकरांचे अनुयायी येथे हमखास येणार, हे माहित असल्याने आश्वासनांचा पाऊस पाडला जातो. गेल्या काही वर्षापासून इंदू मिलच्या प्रश्नावर या नेतेमंडळींकडून आश्वासनांची खैरात होत आहे. आमच्याकडून प्रश्न विचारण्याआधीच काम मार्गी लागत आहे, असे बोलून वेळ मारून नेली जात आहे. मात्र इंदू मिल प्रकरणी कोणतीच कार्यवाही होत नाही. नेत्यांकडून काही ठोस आश्वासने मिळत नाहीत, याचे दु:ख आहे. – बाळासाहेब झाबळे, मराठवाडा