रेल्वेची सुरक्षा भिंत तोडून, स्थानकांतील उद्घोषणांकडे दुर्लक्ष करून सर्रास रेल्वेरूळ ओलांडले जातात. परिणामी लोकल मार्गावर होणा-या अपघातांमध्ये सर्वाधिक अपघात रेल्वेरूळ ओलांडताना होतात.
मुंबई- रेल्वेची सुरक्षा भिंत तोडून, स्थानकांतील उद्घोषणांकडे दुर्लक्ष करून सर्रास रेल्वेरूळ ओलांडले जातात. परिणामी लोकल मार्गावर होणा-या अपघातांमध्ये सर्वाधिक अपघात रेल्वेरूळ ओलांडताना होतात. त्यामुळे अशा ठिकाणांचा आढावा घेण्यात आला असून या ठिकाणी पादचारी पूल किंवा इतर पर्यायी व्यवस्था सुरू करण्याचे प्रयत्न रेल्वेकडून करण्यात येत आहेत.
लोकलच्या तिन्ही मार्गावरील एकूण २२ ठिकाणांचा सामावेश असून लवकरच रेल्वेरूळ ओलांडण्यास आळा घातला जाणार असल्याची माहिती रेल्वे अधिका-याने दिली. यामध्ये मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सर्वाधिक १२ ठिकाणी रेल्वेरूळ ओलांडले जात असल्याने समोर आले आहे.
यामध्ये, घाटकोपर, विक्रोळी, नाहूर, मुलुंड, मुलुंड-ठाणे, ठाणे-कळवा (विटावा ब्रीज), ठाणे-दिवा, ठाणे-कळवा, कळवा-मुंब्रा, दिवा-कोपर, कल्याण-उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर तर पश्चिम रेल्वेवर माहीम-माटुंगा, वांद्रे-खार, विलेपार्ले-अंधेरी, जोगेश्वरी आणि गोरेगाव या स्थानकांमध्ये रूळ ओलांडले जातात. शिवाय हार्बर मार्गावर वडाळा-जीटीबीनगर, टिळकनगर-चेंबूर, चेंबूर-गोवंडी, गोवंडी-मानखुर्द, मानखुर्द-वाशी, वाशी आणि सानपाडा या ठिकाणचा समावेश आहे.
रेल्वेरूळ ओलांडणा-या २२ ठिकाणी पादचारी पूल उभारण्यात येणार असून मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) एमयुटीपी-३ अंतर्गत ही कामे हाती घेणार आहे. एमयुटीपी-३ या प्रकल्पाला निती आयोगाची मान्यता मिळाली असल्याने लवकरच ही कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. एमआरव्हीसीने या कामांकरिता ५२० कोटींच्या निधीची मागणी रेल्वेबोर्डाकडे केले होती.
दिवा स्थानकात वर्षभरात १९ जणांचा मृत्यू
रेल्वेरूळ ओलांडून होणा-या अपघातांची संख्या अधिक असताना मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकातील रेल्वे फाटक ओलांडताना २०१५ या वर्षात तब्बल १९ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी रोड ओव्हर ब्रीज बांधण्याचे केवळ कागदी घोडे नाचवले जात असून रेल्वे आणि ठाणे महानगरपालिका यांच्या अपु-या इच्छाशक्तीमुळे हा ब्रीज रखडल्याचे बोलले जात आहे.
या ठिकाणी असलेले पादचारी पूल हे प्रवासी संख्येच्या तुलनेत कमी असल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव जीव धोक्यात घालून रेल्वेरूळ ओलांडावे लागत असल्याचेही समोर येत आहे.