मुंबईतील अनेक परिसर हा (सायलेन्स झोन) शांतता प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असला तरी अनेक ठिकाणी त्याचे सर्रास उल्लंघन होते.
मुंबई – मुंबईतील अनेक परिसर हा (सायलेन्स झोन) शांतता प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असला तरी अनेक ठिकाणी त्याचे सर्रास उल्लंघन होते. यासाठी पालिकेने मुंबईतील आवाजाच्या पातळीचे मोजमाप करण्याचा निर्णय घेतला असून, विविध १२०० ठिकाणी यंत्रे बसवली जाणार आहेत.
या यंत्राद्वारे विभागातील वरच्या पट्टीतील आवाजाची नोंद घेऊन त्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. महापालिकेतर्फे याकरता सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असून निविदा मागवण्यात आल्या आहेत.
मुंबईतील ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने पुढाकार घेतला असून, मुंबईतील २४ प्रशासकीय कार्यालयांच्या हद्दीतील आवाजाचे मॅपिंग करून त्याचा अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
न्यायालय, सरकारी कार्यालये, निमसरकारी कार्यालये, कॉर्पोरेट कार्यालये, रुग्णालये, शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळे, उद्यान, मैदाने, मंडई, मॉल्स, वाहतूक बेट, चौक आदी १२०० ठिकाणे त्यासाठी निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार प्रत्येक प्रभागांत ५० यंत्रे बसवली जाणार असून काही भागांत ही संख्या कमी वाढण्याची शक्यता असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.
या यंत्राद्वारे सकाळी आठ ते रात्रौ नऊ व नंतर सकाळी आठ या वेळेत प्रत्येकी दोन तासांच्या वेळेत आवाजाची नोंद घेतली जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी बसवलेल्या यंत्राद्वारे विविध ध्वनिमर्यादेपर्यंतची नोंद घेतली जाणार आहे. अर्थात, ही यंत्रे बसवताना घनकचरा विभागाच्या उपायुक्तांची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यांच्या परवानगीनेच ही यंत्रे बसवली जाणार असून त्याचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची निवड करण्यात येणार आहे.