मुंबई महापालिकेत शिवसेना २० वर्षे सत्तेत असूनही रहिवाशांना अपेक्षित सुविधा मिळालेल्या नाहीत.
मुंबई- मुंबई महापालिकेत शिवसेना २० वर्षे सत्तेत असूनही रहिवाशांना अपेक्षित सुविधा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे जो विकास करेल त्याच्या पाठीशी खंबीर उभे राहा, असे आवाहन काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी केले. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात ‘अच्छे दिन’साठी नारायण राणे यांना निवडून आणावेच लागेल, असे जाहीर आवाहन निलेश राणे यांनी केले.
वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी खार (पूर्व), शांतीलाल कंपाऊंड येथे चौकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघात नारायण राणे यांना स्वबळावर मात देता येऊ शकत नसल्याने शिवसेनेने चक्क ‘एमआयएम’शी हातमिळवणी केली.
मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणा-या शिवसेनेची ही काय अवस्था झाली आहे. एकेकाळी मुंबईत शिवसेनेचा धाक होता. आम्ही शिवसेनेत होतो. त्यावेळी हिंदूहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे हात वर करायचे तेव्हा संपूर्ण मुंबई बंद व्हायची, आता उद्धव ठाकरे हात वर करतात तर बाजूची गल्लीही बंद होत नाही. ही परिस्थिती शिवसेनेवर का ओढवली, मराठी माणसांनी ही परिस्थिती तुमच्यावर का आणली? असा खोचक सवाल निलेश राणे यांनी यावेळी केला.
वांद्रे (पूर्व) पोटनिवडणूक अस्मितेची लढाई बनल्याने शिवसेनेला आता भीती वाटू लागली आहे. आमचा कोणाशीही वैयक्तिक वाद नसून आमचे गरीब जनतेवर प्रेम आहे. त्यासाठीच आम्ही इकडे आलो आहोत, असे निलेश यांनी ठामपणे सांगितले. यावेळी आमदार राजहंस सिंह, माजी नगरसेवक अर्जुन सिंह, माजी आमदार बलदेव खोसा आदी मान्यवर उपस्थित होते.