वास्तुशास्त्राचा आणि ज्योतिषशास्त्राचा अतिशय निकटचा संबंध आहे. शहरांमध्ये मिळेल तेवढय़ा जागेत कशाबशा बांधलेल्या घरांमुळे वास्तुशास्त्राचा अजिबात विचार होत नाही आणि अशा घरांच्या रचनेचा त्यात राहणा-यांच्या स्वभावावर परिणाम होत असतो, असे या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.
माणसाच्या बारूपाचा तसेच स्वभावाचा अंदाज त्याच्या जन्मकुंडलीवरून ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकाला लावता येतो; परंतु कालांतराने ‘सर्वात बदल घडायला लागतो. आपल्या आजूबाजूची भौगोलिक, सामाजिक परिस्थिती, वातावरणातील बदल, प्रदूषण, इ. अनेक घटक या बदलाला कारणीभूत होत असतात. या सर्व घटकांबरोबरच एक अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्या स्वभावावर प्रभाव टाकत असतो आणि तो म्हणजे आपली राहती तसेच कार्यालयीन वास्तू.
आग्नेय दिशा
या विभागाचा विचार धन-संपत्तीशी निगडित आहे. तसेच आरोग्याच्या दृष्टीनेही या विभागाला मोठे महत्त्व आहे.
निर्दोष असता : स्वभाव उत्साही, कष्टाळू असतो, दुस-यांच्या अडचणीत मदतीला धावून जातात. आरोग्य उत्तम राहिल्याने स्वभावात नैसर्गिकरीत्या एक प्रकारचा आत्मविश्वास येतो. मनस्ताप खूपच कमी होतो. दोन पिढय़ांमध्ये सुसंवाद असतो यामुळे आयुष्य सुखी, समाधानी, समृद्ध व यशस्वी असते.
सदोष असता : संततीसंबंधी त्रास, अनाठायी प्रवास तसेच अग्निभय, अनारोग्य, आर्थिक समस्या, चिंता, नसत्या काळज्या, स्त्रियांना पीडा या गोष्टी संभवतात. सामान्यत: आळशी स्वभाव असतो, महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष करून वायफळ गोष्टीत वेळ दवडतात. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी स्वभावामुळे फारसे यश प्राप्त होत नाही.
प्रसिद्धीसाठी वेळ आणि पैसा दोन्ही फुकट घालवतात. पैशांचा अपव्यय होताना दिसतो. ‘थँकलेस जॉब’ करण्याची जणू आवडच असते. या दोषाचा विपरीत परिणाम संततीवरही होताना दिसतो, त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव असतो, उर्मटपणाने वागतात. वागणे अतिरेकी असू शकते. या वास्तूतील तरुण पिढी ही शिरजोर, नसता तोरा मिरवणारी असते, वडीलधा-या मंडळींना दुरुत्तरे देतात. घरातील सर्वच जण मोठमोठय़ाने एकमेकांशी भांडल्यासारखेच बोलतात. घरातील मुख्य पुरुष/स्त्री स्वत:चे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी धडपडत असताना दिसतात.
या वास्तुदोषात अतिशय कष्टाने पैसा मिळतो व तोही थोडाच. पैसा मिळवणे हेच परम ध्येय असते व त्यासाठी कोणत्याही थराला जातात, अपार कष्टही करतात. संततीचे वागणे अतिरेकी असू शकते.
नोकरीतही बढतीचे प्रश्न त्रासदायक ठरतात. सर्वाचा परिणामस्वरूप प्रचंड मनस्ताप होतो. वरिष्ठ तसेच कनिष्ठ मंडळींबरोबर सामना करावा लागतो.
नैऋत्य दिशा
वास्तुशास्त्रानुसार या प्रभागात स्थिर तत्त्व विराजते. म्हणूनच आयुष्यातील स्थैर्याचा बोध या दिशेवरून होतो.
निर्दोष असता : आयुष्यात स्थैर्य आल्यामुळे मानसिक संतुलन ढासळत नाही व त्यामुळे आरोग्याच्या तक्रारीही ब-याच अंशी कमी होताना दिसतात. यामुळे मनुष्य येणा-या अडचणी-अडथळे सहजगत्या पार करतो. सत्कर्म करण्याची प्रवृत्ती दिसते, वायफळ गोष्टींमध्ये वेळ वाया न दवडता कष्ट करण्याची आवड असते.
सदोष असता : या दिशेतील दोषाचे वैशिष्टय़ असे की, वास्तूत राहणा-यांना तर मनस्ताप होतोच होतो; परंतु बांधकाम सुरू असताना बांधकामाशी संबंधित प्रत्येकाला कुठल्या तरी स्वरूपात मनस्ताप भोगावा लागतो. अशी वास्तू बांधत असताना सर्वच संबंधितांना अगदी साध्या कामगारांपासून ते आर्किटेक्टपर्यंत सर्वानाच मनस्ताप भोगावा लागतो.
या व्यक्तींमध्ये आढळणारा एक दुर्गुण म्हणजे आळशीपणा. मोठेपणाचा प्रचंड हव्यास; परंतु आत्मविश्वासाच्या अभावामुळे यश हुलकावणी देते. या वास्तुदोषाचा सर्वात वाईट परिणाम पती-पत्नीच्या नात्यावर होतो. दोघांमधील विसंवाद टोकाला जाऊन त्यांच्यात दुरावा निर्माण होतो. या दोषाचे निराकरण शक्य तितक्या लवकर करणे, अत्यावश्यक ठरते अन्यथा, पती-पत्नी एकमेकांपासून कायमचे विभक्त होऊ शकतात. तडजोड न करण्याच्या स्वभावामुळे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होण्यात हा दोष कारणीभूत ठरतो.
या घरात राहणा-या व्यक्तींना परस्परांकडून अपेक्षित प्रेम, माया, ऊब न मिळाल्यामुळे त्यांचा जगण्यातील रसच नाहीसा होतो व परिणामी संघर्ष वाढून घरातील वातावरण तप्त होते. माणसांचा स्वभाव अति तापट, चिडचिडा होतो. भांडण-तंटे कुठल्याही थराला पोहोचतात.
या घरातील लोक बहुतांशी नास्तिक असतात. स्वत:वर संयम नसतो, प्रलोभनांच्या मागे धावतात.
या घरांमध्ये असमाधान, अस्थैर्य, अशांतता असते. लहानसहान कारणांवरून घरात सतत वादविवाद, रुसवे-फुगवे, मानापमानाची नाटय़े घडत असतात व यामुळे या लोकांच्या मनात जन्म वाया गेल्याची भावना रुजू लागते.
वायव्य दिशा
ही दिशा चंचलता व अस्थैर्याची निदर्शक आहे.
निर्दोष असता : स्वभावातील चांचल्याचे प्रमाण कमी होते व त्यामुळे जीवनातही स्थैर्य येऊन येणा-या अडचणींवर मात करतात. एकदा हाती घेतलेले काम पूर्णत्वाला नेण्याची धडपड दिसून येते. चांगले मित्र मिळतात. हितशत्रूंचे प्रमाण कमी असते. घरातील स्त्रियांना स्वत:चे करिअर करण्याची संधी मिळते व त्याही समाधानी असतात. वैवाहिक जोडीदार एकमेकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. मित्रमंडळी, नातेवाईक व आप्तेष्टांशी सलोख्याचे संबंध असतात.
सदोष असता : कामापेक्षा दुस-यांना मदत करणे, मौजमजा करणे, असल्या गोष्टींमध्ये वेळ, पैसा व श्रम वाया घालवतात. या व्यक्ती स्वत:च्या कल्पनाविश्वात वावरत असतात. अविचारी वृत्ती असते. मित्रच शत्रू होतात.
मुलांचे फाजील लाड करण्याने ती वाया जातात. घरच्या स्त्रियांची एकप्रकारे मानसिक कुचंबणा होते. या मंडळींना निरनिराळी वाहने खरेदी करण्याचे जणू काही व्यसनच असते.
नातेवाईक, मित्र परिवार, हितचिंतक यांच्याशी दुरावा/ गैरसमज होतात. वेळेचे महत्त्वच समजत नाही. कामाचे गांभीर्य लक्षात येत नाही. नियोजनाचा अभाव असतो.
या दोषाचा संबंध वैवाहिक जीवन व मुलांच्या प्रगतीशी असतो; परंतु त्याग न करण्याच्या स्वभावामुळे व वाढीस लागलेल्या स्वार्थी वृत्तीमुळे पती-पत्नी एकमेकांना समजून घेताना दिसत नाहीत व त्यांच्या नात्यामध्ये दरी निर्माण होते. किरकोळ कारणांनी नातेवाईक, मित्रवर्ग, पाहुणे यांच्याशी असलेले संबंध बिघडतात.
वास्तूतील सर्व दिशांतील गुणदोषांचा एकत्रित विचार करून मगच योग्य तो निष्कर्ष काढावा. या माहितीचा उपयोग सुज्ञ वाचक स्वत:च्या स्वभावातील गुण-दोषांचा विचार करून राहत्या/ कार्यालयीन वास्तूतील गुण-दोष शोधून काढण्यासाठी निश्चितच करतील अशी अपेक्षा आहे. अर्थातच एखाद्या जाणकार वास्तुतज्ज्ञाचा सल्ला घेणेच कधीही योग्य ठरेल.
वास्तू टिप्स
- स्वयंपाकघरात (किचन) लिकेज असू नये. गळके नळ नसावेत.
- किचन ओटय़ाला काळा कडप्पा वापरू नये. ग्रीन ग्रेनाईट वापरावे.
- स्वयंपाक करताना आल्हादायक वातावरण असावे. आनंदी, उत्साही वातावरण असेल अशी किचनची रचना असावी.
- किचन ओटय़ाच्या पाठीमागे आरसा किंवा काचेचे कपाट असू नये.
- किचन ओटा, किचन ओटय़ावरची टाईल्स, जमिनीवरील फरशी खडे मीठाच्या पाण्याने स्वच्छ करावी. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते.
- स्वयंपाकघरामध्ये ट्रॉलीचा रंग लाल, मरून, काळा, गडद चॉकलेटी असू नये. कपाटे, क्रॉकरी यांचाही रंग गडद नसावा.
- डायनिंग टेबल पूर्व-पश्चिम असे ठेवावे. दक्षिण दिशेला जास्त खुर्च्या येऊ देऊ नयेत.
- स्वयंपाकघरामध्ये किचन ओटय़ावरती खिडकी किंवा पंखा असणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रदूषण होत नाही.
- स्वयंपाकघरात शेगडी उत्तर भिंतीला लागून ठेवू नये.
- स्वयंपाकघर शक्यतो आग्नेय किंवा वायव्येला उत्तराभिमुख ठेवावे.
- दक्षिण दिशेला तोंड करून स्वयंपाक करू नये. स्वयंपाक करताना तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला करावे.