आज विज्ञान-तंत्रज्ञानाने अफाट प्रगती केली आहे, त्याचा पाया शतकांपूर्वी वेगवेगळ्या देशांतील बुद्धिवंतांनी घातला आहे. विज्ञान हे सतत उत्क्रांतित होत असते, त्यामुळे जुने शोध खोटे ठरून नवे लागत असतात. हे विज्ञानाचे संचितच असते. म्हणून विज्ञानाकडे सजग नजरेने बघायला हवे.
भारताची विज्ञान परंपरा तुटक तुटक पण फार जुनी आहे. हरप्पा-मोहंजोदरो संस्कृतीने मोठी व स्वच्छ तसेच आरोग्यदायी शहरे कशी बांधली जातात, याचे धडे काही हजार वर्षापूर्वी दिले आहेत. आर्यभट्ट, भास्कराचार्य व चार्वाक सारख्यांनी अनेक नवीन वैज्ञानिक परिमाण भारताला दिली आहेत. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या देशाने वैज्ञानिक व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगतीची भरारी मारलेली आहे.
आधुनिक काळात अनेक देशांत विज्ञानाची देवाणघेवाण होताना दिसते. युरोपियन व अमेरिकन खंडात काही शतकांपूर्वी वैज्ञानिक ज्ञानाची गंगा इतकी बहरली की, मानवी इतिहासात त्याला तोड नाही. रेनेसॉच्या काळात (पुनरुत्थान) विज्ञानाने इतकी मजल मारली की विश्वाच्या अनेक रहस्यांचा शोध अगदी अकल्पितरीत्या लागत गेला. पण त्याची पायाभरणी आधी अॅरिस्टॉटल कोपर्निकस, गॅलिलिओसारख्या अनेक महानुभावांनी केली होती.
अॅरिस्टॉटल यांनी विज्ञानाचा पाया रचला यावर अनेकांचे एकमत आहे. त्यांची बुद्धिमत्ता अतिशय तीक्ष्ण होती व या बुद्धिमतेच्या जोरावर त्यांनी अनेक वैज्ञानिक संकल्पना मांडल्या होत्या. त्या किती ख-या व किती खोटया हे तपासण्याच्या फंदात ते पडले नाहीत. त्यांना तर्काच्या आधारावर पटलं तर ते खरं असा त्यांचा खाक्या होता. त्यांच्या बुद्धिमत्तेच्या प्रेमात ते इतके आंधळेपणाने पडले होते की, त्यांनीही त्यांच्या शोधांची प्रयोगाच्या माध्यमातून शहानिशा करण्याची तसदी घेतली नाही. ते काम गॅलिलिओ यांनी नंतर पार पाडले. निसर्गाच्या अनेक अनाकलनीय गोष्टींचा पर्दाफाश करण्याची शर्यतच जणू त्यानंतर न्यूटन, फॅराडे, मॅक्सवेल, आइनस्टाइन, हॉकिंगसारख्या वैज्ञानिकांमध्ये लागली. डर्विन, क्रिक, वॉटसन सारख्यांनी सजीवांच्या उत्तपत्तीची अनेक क्रियाप्रक्रियांची उकल केली. आज आपणाला जेवढी या विश्वाच्या व सजीवांच्या उत्पत्तीची-उत्क्रांतीची माहिती आहे, तेवढी हरप्पा व पौराणिक काळातील बुद्धिवंतांना खचितच नव्हती.
आज विज्ञानाने इतकी प्रगती साधलेली आहे की, शाळेत शिकवणारा विद्यार्थीसुद्धा या प्रज्ञावंतापेक्षा जास्त जाणणारा आहे. त्याच्याकडे वैज्ञानिक माहितीचे इतके सकस व समृद्ध भांडार आहे की, अॅरिस्टॉटल यांच्यातही कमीपणाची भावना यावी. इतक्या वैज्ञानिक दिग्गजांच्या नंतर जन्माला येण्याचा हा फायदा आहे. याचा अर्थ असा नाही की, आजची पिढी त्यांच्या पूर्वजांपेक्षा जास्त प्रतिभाशाली आहे, पण विज्ञानाचे संचित इतके जमा झाले आहे की, विश्वाचे अगणित रहस्य अगदी आरामात उलगडली जाऊ शकतात.
विज्ञानाची हीच एक खासियत आहे. ज्ञानाची ही शाखा सदैव उत्क्रांतीत होत असते. जे सत्य आहे ते विना भांडणतंटा स्वीकारत विज्ञान प्रगतिपथावर सतत पुढे मार्गक्रमण करत राहते. या जगतात इगो हा प्रकार नसतो. न्यूटनची चूक आइनस्टाइन यांनी सप्रमाण दाखवून दिली, तर कोणातीही दंगल होत नाही. उलट कौतुकाची थापच पडते. अॅरिस्टॉटल यांना विश्वातील सर्वाधिक प्रज्ञावंत मानव समजले जाते., पण आजच्या प्राथमिक शाळेतील विज्ञान शिकताना कदाचित त्यांची दमछाक होईल. उंचावरून वेगवेगळ्या वजनाचे समान वेगवेगळ्या गतीने जमिनीकडे झेपावतात, हा त्यांच्या सिद्धांत कालबाह्य व चुकीचा आहे, हे सिद्ध झालेले आहे, पण त्यांना इतरही अनेक नवीन गोष्टींचे आकलन होईल. पृथ्वी हा विश्वाचा मध्यबिंदू नाही व तिचे सूर्याभोवती भ्रमण होत असते किंवा पृथ्वी, जल, वायू व आग एवढीच चार मूलतत्त्व नसून शंभरपेक्षा जास्त मूलतत्त्वे आहेत, ज्यात पृथ्वी, जल, वायू व अग्नी यांचा सामावेश आहे.
एकपेशी सजीवांची उत्क्रांती होऊन बहुपेशी सजीव निर्माण झाले. जनुकीय नकाशाच्या मदतीने सर्व सजीवांचा एकमेकांशी असलेला नातेसंबंध आता स्पष्ट झाला आहे. विज्ञानाने अनेक गोष्टींची उकल केलेली आहे, अनेक शोध लावले आहेत, अनेक रहस्यांवरचा पडदा बाजूला सारला आहे. एवढे असूनसुद्धा विज्ञानाकडे जितक्या आश्वासक नजरेने पाहिले पाहिजे, तितके पाहिले जात नाही. या शाखेकडे भीतीयुक्त आदराने पाहिले जाते. हे जे ‘बघणे’ आहे, ते आता बदलले पाहिजे. सा-या समाजाचा विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.
विज्ञानाबद्दल नेहमीच एक आक्षेप घेतला जातो की, ते फार बोरिंग असतं. विज्ञान शिकणे व शिकवणे हा कंटाळवाणा प्रकार असतो. एखादे चांगले गाणे किंवा संगीत ऐकण्यासाठी, आस्वाद घेण्यासाठी आपल्याला पेटी व तबला वाजवण्याची कला अवगत करण्याची गरज नसते. विज्ञानाबाबत आपण इतके कठोर का असतो? त्याचा आस्वाद घेणे किंवा आकलन करण्यासाठी प्रयोगशाळेतच जाण्याची गरज नाही.
आपल्या आजूबाजूला घडणा-या सा-या नैसर्गिक घटनांमध्ये विज्ञान दडलेले आहे. त्याचे अवलोकन करण्याची क्षमता सामान्य लोकांमध्ये निश्चितच असते. त्याचे परिणाम कळण्याची अक्कलहुशारीसुद्धा आपल्या ठायी असते, पण कधीकधी कळतं पण वळत नाही, अशी परिस्थिती उत्पन्न होते. डोंगराच्या उतारावर दाटीवटीने वस्ती करून राहणे सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे होऊ शकते. हे ठाऊक असूनसुद्धा आपण तिकडे कानाडोळा करतो. प्रवाहित पाण्याला अडथळा केला तर धोधो पावसात वित्त व मनुष्यहानी फार मोठया प्रमाणावर होऊ शकते हे सोयीस्कररीत्या विसरतो, पण त्याचा फटका बसला तर विज्ञान व वैज्ञानिकांना दोष देत राहतो.
निसर्गाकडे, विश्वाकडे पाहण्याची एक नवी व विज्ञानावर आधारित नजर विकसित करण्याची गरज आहे. आपल्या आजूबाजूला अनेक नैसर्गिक घटना घडत असतात. कधीकधी या घटना का व कशामुळे होतात हे सांगता येत नाही. पण म्हणून प्लँचेटने या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, त्यासाठी सजगपणे त्या गोष्टींकडे पाहावे लागते. विज्ञान ही वैज्ञानिकांची मक्तेदारी नसून ती आपल्या सर्वाची जबाबदारी आहे. हा भाव जेव्हा सामान्यांच्या मनात उठेल तेव्हा पुन्हा एक नवा रेनेसॉ निर्माण होईल. विज्ञान जे आज प्रयोगशाळेत बंदिस्त झाले आहे, ते प्रत्येकाच्या मनात तेवत राहील.