रंगभूमीवर गेल्याच वर्षी एक्झिट घेतलेले १७ जूनला अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते विनय आपटे यांचा वाढदिवस आगळ्यावगेळ्या पद्धतीने पार पाडला. या निमित्ताने सादर झालेला ‘विनय.. एक वादळ’ हा कार्यक्रम नुसताच त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा नव्हता, तर तो खरंच एका संकल्पनेचा अफलातून रंगमचीय आविष्कार होता.
जिचा वाढदिवस होता ती व्यक्तीच तिथे उपस्थितच नव्हती. खरं तर ती या जगातच नव्हती. तरीही तिचा वाढदिवस तोही जाहीरपणे साजरा होत होता आणि तिचे सहकारी, मित्रमैत्रिणी, सुहृद असं सगळे तिथे जमले होते आणि ते तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते. या वाढदिवस सोहळ्याला एक नावही देण्यात आलं होतं, विनय.. एक वादळ.
१७ जूनला विनय आपटेंचा वाढदिवस असा आगळ्यावेगळ्या पद्धतीने पार पडला. एखाद्या कलाकाराचा वाढदिवस या पद्धतीने साजरा होण्याचं हे मराठी रंगभूमीवरचं पहिलंच उदाहरण असावं. आपण एखाद्या कलाकाराच्या बाबतीत लिव्िंहग लीजंड म्हणजे चालतीबोलती आख्यायिका वगैरे म्हणतो, पण जाण्यानंतरही वाढदिवस साजरा होण्याचं जे भाग्य विनय आपटेंना लाभलं ते इतर कुणाला लाभलं असेल, असं वाटत नाही. याचं कारणही तसंच होतं, विनयच्या अचानक एक्झिटनंतर त्याला ओळखणा-यांच्या मनात तो अनेक आठवणी ठेवून गेला होता. या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा वाढदिवस हे एक निमित्त होतं.
‘विनयचा हा वाढदिवस म्हणजे त्याचा जयंती किंवा स्मृतिदिन वगैरे नाही. तेव्हा उगाच भावुक होऊ नका, आपल्याला श्रद्धांजली वगैरे वाहायची नाही तर आपण फक्त विनयच्या आठवणी शेअर करायच्या आहेत,’ असं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणा-या जयंती अभिजीत खांडकेकर आणि स्पृहा जोशी यांनी सांगितलं तेव्हा कार्यक्रम नेहमीसारखा श्रद्धांजलीपर नाही, हे लक्षात आलं. याचाच पुनरुच्चार करत नंतर विनय आपटे यांच्या पत्नी वैजयंती आपटे यांनी त्याच्या जाण्यानंतर त्याचा वाढदिवस साजरा करण्याचं प्रयोजनही सांगितलं, ‘दरवर्षी मी आणि विनय एकमेकांच्या वाढदिवसाला सरप्राइज काहीतरी द्यायचो. माझ्या एका वाढदिवसाला त्याने माझ्यासाठी ‘कुसूम मनोहर लेले’चा मुहूर्त केला, तर विनयच्या एका वाढदिवसाला मी त्याला न कळू देता त्याची वेबसाइट तयार करून दिली. आता विनयच्या जाण्यानंतरचा या पहिल्याच वाढदिवशी काय सरप्राइज द्यायचं म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलं.’
हे सरप्राइज खरोखरंच विनयवर प्रेम करणा-यांसाठी सुखद धक्का होतं. आणि ते विनयच्या बहुपेडी, बहुरंगी, बहुगुणी व्यक्तिमत्त्वाला साजेसं होतं. तब्बल चाळीस वर्षाची कारकीर्द म्हणजे एक वादळी पर्वच होतं. मराठी-इंग्रजी रंगभूमी, मराठी-हिंदी मालिका, मराठी-हिदी चित्रपट यात नट-निर्माता-दिग्दर्शक म्हणून त्यांनी सोडलेली छाप तशीच अमीटच. हे सगळं करताना त्यांनी किती माणसं जोडली, याची प्रचिती या कार्यक्रमातून येत होती.
विनयच्या आठवणी जागवायला कोण कोण आले होते, याची यादी खूपच मोठी होती. त्यात त्याचे कॉलेजपासूनचे सोबती होते, त्याचे दूरदर्शनवरचे सहकारी होते, त्याच्या नाटकातून ब्रेक मिळवणारे होते, त्याच्या नाटकात काम करून मोठे झालेले होते, त्याच्यासाठी नाटकं लिहिणारे होते, त्याने ज्यांना दिग्दर्शित केलं ते होते, त्याला इंग्रजी नाटकात साथ देणारे होते, त्याला टीव्हीवर दिग्दर्शित करणारे होते, त्याला हिंदी पडद्यावर संधी देणारे होते. त्यांनी आठवणी सांगितल्या विनयच्या सुरुवातीच्या दिवसांच्या, त्याने स्पर्धेत केलेल्या नाटकांच्या, त्याच्या दूरदर्शनवरील नोकरीच्या, तो रंगभूमीवर स्थिरावलेल्यानंतरच्या, अभिनेता-दिग्दर्शक-निर्मात्याच्या भूमिकेत आल्यानंतरच्या, त्याने रंगभूमीवर केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांच्या.. अशा कितीतरी. त्याचवेळी त्याच्या प्रेमळपणाच्या, उर्मटपणाच्या, बेमुर्वतपणाच्या, बिनधास्तपणाच्या, पारखी वृत्तीच्या, दिग्दर्शनातील कौशल्याच्या आणि जिवाला जीव देण्याच्याही..
उदाहरणार्थ, सुनील बर्वेने सांगितलेला त्यांच्या रेशन कार्डचा किस्सा. ‘अफलातून’ हे विनयचं नाटक आज नावारूपाला आलेल्या पंधराएक कलाकारांचं तरी पहिलं नाटक होतं. त्यामध्ये संजय नार्वेकर, महेश मांजेरकर, सचिन खेडेकर अशा अनेकांचा समावेश होता. सुनील हाही त्यातलाच एक. सुरुवातीला सुनील विनयकडे काम करत होता, तेव्हा त्याच्या वडिलांना त्याच्या कारकिर्दीबद्दल काळजी वाटत होती. त्यांनी एके दिवशी आपटेंच्या घरी फोन करून विचारलं, ‘अहो, आमच्या सुनीलचं बरं चाललं आहे ना?’ तेव्हा आपटेंचं उत्तर होतं, ‘काळजी करू नका. अगदी चांगलं चाललंय. माझ्या रेशन कार्डमध्ये त्याचं नाव टाकायचं तेवढं राहिलंय.’
विनय आपटेंच्या रेशन कार्डवर एकटा सुनीलच नव्हता तर असे अनेक जण होते. मग तो संजय नार्वेकर असो, सुकन्या कुलकर्णी असो की, मुक्ता बर्वे. म्हणूनच प्रत्येक जण त्यांच्याविषयी बोलताना रेशन कार्डचा आवर्जून उल्लेख करत होता, तर काही जण त्याच्या स्वभावाचे इतर अनेक पैलू उलगड होते. शरद पोंक्षेने ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ केवळ विनय आपटेंमुळे या नाटकात आपल्याला नथुरामची भूमिका केली,’ असं सांगत त्यांना कलाकाराची पारख कशी होती, हे नम्रपणे नमूद केलं. मुंबईत सिगारेट पित भरधाव वेगाने मोटारसायकलवरून जाणा-या विनयच्या त्यांचा आकाशवाणीतील सहकारी रवींद्र साठेने सांगितलेल्या आठवणी त्यांच्या बेदरकारपणाचा, तर गन हातात घेऊन नाटकाच्या दौ-याला गाडीतून जाण्याच्या आठवणी त्याच्या बेमुर्वतखोरपणाचाच नमुना कथन करत होत्या.
पुंडलिक शेट्टीवार आणि पद्माकर ओझे यांनी त्याच्या रुईयातील आठवणी सांगितल्या, तर महेश काळेने ‘मॅन विदाउट श्ॉडो’च्या दिवसांना उजाळा दिला. हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश झा यांनी स्टेजवर येऊन कलाकार आणि माणूस म्हणून आपटेंचं मोठेपण सांगितलं. भरत दाभोळकर आणि किशोर प्रधान त्याच्या हिंग्लिश नाटकाबद्दल बोलले. मधुर भांडारकर, मनोज वाजपेयी, दिलीप प्रभावळकर, चंद्रकांत कुलकर्णी यांच्या पडद्यावर दाखवण्यात येत असलेल्या मुलाखतीतूनही विनय आपटे हळुवार उलगडत होते. या आठवणी सांगितल्या जात असतानाच त्याच्या नाटकांचे सादर होणारे काही भाग त्याच्या रंगमंचीय वृत्तीचं दर्शन घडवत होत्या. रोहिणी हट्टंगडींनी ‘मित्राची गोष्ट’ वेळचा किस्सा सांगितला. या नाटकात सिगारेट पिण्याचा एक प्रसंग होता.
रोहिणींना सिगारेट पिता यायची नाही, परंतु विनयने त्यांना सांगितलं की, तुला ही भूमिका करायची तर सिगारेट प्यावी लागेल. त्यामुळे रोहिणी सिगारेट ओढायला शिकल्या, पण विनयने त्यांना सिगारेट विशिष्ट पद्धतीनेच धूर हवेत सोडून प्यावी लागेल, असा आग्रह केला आणि हे रोहिणींकडून करून घेतलं. हा प्रसंग त्यांनी पुन्हा एकदा सादर केला, तेव्हा दिग्दर्शक म्हणून विनयची चुणूक प्रेक्षकांना मिळाली. विनयच्या एक लफडं विसरता न येणारं(चिन्मय मांडलेकर-अदिती सारंधर), कुसूम मनोहर लेले (गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, संजय मोने आणि देविका देशपांडे ही ओरिजनल टीम) कबड्डी कबड्डी (मुक्ता बर्वे आणि विनय आपटेंचा आवाज) या नाटकांच्या तुकडय़ांनी या कार्यक्रमाला रंगमचीय परिणाम दिला.
ही सगळा दृक-श्राव्य आणि मंचीय अनुभव खरोखरंच आगळावेगळा होता. याबद्दल या कार्यक्रमाचे दिग्दर्शक मंगेश कदम यांचं खास कौतुक करायला हवं. कारण विनयसारख्या अफलातून कलाकाराच्या आठवणींना मंचीय चौकटीत त्यांनी दिलेलं मूर्त स्वरूप खरोखरंच नेटकं होतं. या निमित्ताने विनय आपटे प्रतिष्ठानच्या स्थापनेचीही घोषणा झाली. या कार्यक्रमात कुणी भावुक होऊ नये, असं आधीच सांगितलं होतं, तरीही सगळेच वारंवार हेलावून जात होते. या संपूर्ण कार्यक्रमात मिस करण्यासारखी एकच गोष्ट होती, ती म्हणजे.. विनय आपटे.