आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. समस्त महिलांना आजच्या दिवशी जगातल्या १९६ देशांच्या शुभेच्छा. एकेकाळी चूल आणि मूल सांभाळणारी महिला विश्वाच्या रणात झेपावली. आणि त्या महिलेला विज्ञानाने पृथ्वीसुद्धा छोटी वाटू लागली. अशा या दोन महापराक्रमी महिलांमध्ये जगाला चटका लावून गेली ती भारतीय वंशाची कल्पना चावला. तिच्या प्रेरणेने १९५ दिवस विश्वाच्या रणात झेपावलेली सुनीता विलियम्स. महिला दिनाच्या निमित्ताने या दोन महिलांचा पराक्रम महिला दिनाच्या निमित्ताने..
महिला दिनानिमित्त या भगिनींचे कर्तृत्व म्हणजे जगातल्या सर्व महिलांच्या कर्तृत्वाची सर्वात मोठी झेप आहे. कल्पना चावला एकापरिने विज्ञानाला गवसणी घालताना शहीद झालेली आहे. कल्पना बनारसीलाल चावला हिचा जन्म कर्नाल म्हणजे हरियाणामधला.
टागोर विद्यालयात शिकून पंजाब विद्यापीठातून ऐरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवी घेऊन कल्पना अमेरिकेत पोहोचली. आणि कोलोराडो विद्यापीठातून विश्वाच्या वातावरणातील (ऐरो स्पेस) डॉक्टरेट पदवी घेऊन अमेरिकेतल्या ‘नासा’ या नामवंत संस्थेत अंतराळवीर समूहात तिची निवड झाली.
३७६ तास आणि ३४ मिनिटे कल्पनाने अवकाशात भ्रमण केलेले आहे. मूळ भारतीय वंशाची कल्पना अमेरिकेतली अंतराळवीर होती. आणि अंतराळात झेपावणारी ती पहिली महिला होती. डॉक्टर कल्पनाचा मृत्यू अपघाती होताच. पण ते मरण तिला वीरासारखे वाटले.
१ फेब्रुवारी २००३ हा तो दिवस. अवकाश संशोधन क्षेत्राला म्हणजे जगातल्या सर्व विज्ञान क्षेत्राला हादरवून टाकणारी ती घटना होती. अवकाशातून पृथ्वीवर परत येणा-या कोलंबिया अवकाश यानाचा स्फोट झाला. यानाचे तुकडे तुकडे झाले. या यानामधल्या सगळया अंतराळवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जगाप्रमाणेच भारतालाही सुन्न करून टाकणारी ही घटना होती.
पण कल्पनाचे वडील म्हणजे बनारसीलाल चावला यांनी आपल्या लाडक्या मुलीच्या मृत्यूचे दु:ख न करता अंतराळ क्षेत्रात महिलांनी या अपघाताचे भय न बाळगता हिमतीने पुढे गेलेच पाहिजे, अशी अत्यंत उमदी प्रतिक्रिया दिली. आणि कल्पनापासून प्रेरणा घेऊनच मी अंतराळात झेप घेत आहे. असे आणखी एक भारतीय वंशाची असलेल्या सुनीता विल्यम हिने झेप घेण्यापूर्वी जाहीर केले. तिची झेप यशस्वी ठरली.
कल्पनाच्या मृत्यूनंतर व्यथित झालेल्या या देशातल्या अनेकांनी कल्पनाच्या आई-वडिलांचे सांत्वन केले. पण कराडमधील एक शिक्षक संजय पुजारी हे केवळ सांत्वन करून स्वस्थ बसले नाहीत. ते कल्पनाच्या वडिलांना भेटले. आणि काही उद्दिष्टे डोळय़ांसमोर ठेवून त्यांनी १ जुलै २००६ या दिवशी कराडमध्येच ‘डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र’ स्थापन केले.
कल्पनाचे वडील बनारसीलाल चावला मुद्दाम कराडला आले. आपल्या मुलीच्या नावाने निघालेले विज्ञान केंद्र पाहून त्यांना कृतकृत्य वाटले. कल्पनाच्या नावाचे विज्ञान केंद्र संपूर्ण देशात एकमेव आहे. कल्पनाच्या वडिलांनी या केंद्राला मोठी देणगीही दिली. कल्पनाची भगिनी सुनीता हिने पन्नास हजार रुपये किमतीची विज्ञानविषयक पुस्तके या केंद्राला भेट दिली.
या केंद्रात शिकणा-या विद्यार्थ्यांना अंतराळाची पूर्ण माहिती, निसर्ग, पर्यावरण आणि विश्वाचा व्यापार या संबंधीच्या डीव्हीडी अशा मोलाच्या मार्गदर्शनाने समृद्ध केले जाते. कल्पनाच्या नावाने चालणारे हे कराडचे केंद्र केवळ विज्ञान दिनाला विज्ञानविषयक कार्यक्रम करून विज्ञानाची प्रगती होणार नाही.
म्हणून पुजारी सर आणि त्यांचे सहकारी वर्षातले बावनच्या बावन रविवार आणि सुट्टीच्या सर्व दिवशी या केंद्रात विमानबांधणी शास्त्राची, वायुगती शास्त्राची स्लाईड शो करून माहिती दिली जाते.
तज्ज्ञ व्यक्तींना व्याख्यानाला बोलावले जाते. जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर, विज्ञान प्रसारक डॉक्टर अरविंद गुप्ता, ज्येष्ठ आकाश अभ्यासक हेमंत मोने, विज्ञान लेखक, प्राध्यापक मोहन आपटे असे विज्ञान क्षेत्रातले दिग्गज कराडच्या या विज्ञान केंद्रामध्ये नेहमी येत असतात.
गॅलिलिओ, आयझँक न्यूटन, थॉमस अलवा एडिसन या शास्त्रज्ञांनी आणि मुलांची भेट होते. आधुनिक विज्ञान एवढे झपाटून पुढे गेले आहे की अत्याधुनिक सीडींमुळे ‘धमाल विज्ञानाची’ हा बाल चित्रपटही या विज्ञान संस्थेने तयार केला आहे. या केंद्राचे प्रमुख श्री. संजय पुजारी सर यांना २०११ साली मराठी विज्ञान परिषदेने पुण्याच्या अधिवेशनात सन्माननीत केले आणि त्यावेळी त्यांनी आपल्याला मिळालेली प्रेरणा कल्पना चावला हिच्या बलिदानातून मिळाली, अशी कृतज्ञता व्यक्त केली.
कल्पना चावलापासून प्रेरणा घेऊन अंतराळात झेपावलेली जगातली ही दुसरी भारतीय महिला. पहिली कल्पना. ती भारतीय वंशाची. दुसरी सुनीता तीही भारतीय वंशाची. १९ डिसेंबर १९६५ रोजी जन्मलेली सुनीता मूळ भारतीय आहे.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये तिचे मूळ गाव आहे. या सुनीताचा पराक्रम असा की, अंतराळात १९५ दिवस भ्रमण करण्याचा जागतिक विक्रम सुनीताच्या नावावर आहे.
आकाशामध्ये ती ज्या दिवशी झेपावली, तेव्हा तिने आपले हे आंतरीक्ष भ्रमण कल्पना चावलाची आठवण करून सुरू केले. आणि एक दुर्दम्य आत्मविश्वास व्यक्त करत तिने जाहीर केले की, मी या विश्व भ्रमणामध्ये यशस्वी होईन आणि नासाचे आंतरीक्ष यान १९५ दिवसांनंतर जेव्हा जमिनीवर उतरले, तेव्हाही तिने या आंतरीक्ष भ्रमणाची माझी प्रेरणा कल्पना चावला असल्याचे सांगितले.
१९९८ पासून ‘नासा’ या ख्यातनाम संस्थेची सदस्य असलेली सुनीता तीस अलग अलग अंतरीक्ष यानात २७७० वेळा झेपावलेली आहे. हेलिकॉप्टर पायलट म्हणून तिने आयुष्याला सुरुवात केली.
पण पृथ्वीपुरते दिसणारे आकाश तिला अपुरे वाटू लागले. पृथ्वीच्या पलीकडे जे विश्वाचे रण आहे, त्या रणात भ्रमण करावे, यासाठी नासाच्या अंतराळवीर कसोटीला उतरण्याकरिता तिने अतिशय कठीण असा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि नासाने या गुणी विज्ञान विद्यार्थिनीला आपल्या चमूमध्ये सामावून घेतले.
सुनीताने आतापर्यंत अंतराळात ३२१ दिवस, १७ तास आणि १५ मिनिटे एवढे भ्रमण केलेले आहे. तिच्या या कमालीच्या जिद्दीच्या अंतराळभ्रमणामुळे भारत सरकारने २००८ साली पद्मभूषण पुरस्काराने सुनीताला सन्मानित केलेले आहे.याखेरीज नेवी आणि मरिन अचिव्हमेंट मेडल देऊन भारतीय नौसेनेने तिला सन्मानित केलेले आहे.
अमेरिकेतल्या नासा या वैज्ञानिक संस्थेने सुनीता विल्यम हिला नासाच्या चौदाव्या आणि पंधराव्या अंतरीक्ष मोहिमेवर पाठवले. आणि या दोन्ही मोहिमा मिळून १९५ दिवस अंतराळात भ्रमण करण्याचा विक्रम सुनीताच्या नावावर नोंदवला गेला.
सुनीता लहान होती तेव्हा अहमदाबादच्या शाळेत शिकली आहे. उच्च शिक्षणाकरिता ती अमेरिकेत गेली आणि पदार्थ विज्ञान विषय घेऊन बी.एस्सी. झाली. त्यानंतर फ्लोरिडा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून ती एम.एस. झाली.
सुनीता विलियम्स हिने आपल्या दिव्य अंतराळभ्रमंतीनंतर जे अनुभवकथन केले आहे, त्यामुळे या पृथ्वीतलावरील आपल्या सर्वाना जग खूप मोठे वाटते. पण सुनीता विल्यमच्या मते मात्र विश्वाच्या तुलनेत पृथ्वी एकदम छोटीशी आहे. १९५ दिवसांची प्रदक्षिणा करून आल्यानंतर सुनीताने सांगितलेल्या अनुभवात अनेकांना आठवली ती कुसुमाग्रजांची कविता..
‘असीम अनंत
विश्वाचे रण,
त्यात हा पृथ्वीचा
इवला कण
त्यातला आशिया
त्यातला भारत
छोटया शहरी
छोटयाशा घरात
कुणी मी वसे
क्षुद्रता अहो ती
अफाट असे
भिंतीच्या कडेला
बांधून जाळी
कितीक कीटक
राहतात कोळी
त्यातला मी असे
एकदा एकले
काहीसे असे..’
सुनीता विलियम्सचे कर्तृत्व किती अफाट आहे, तिची धडाडी आणि तिचा वैज्ञानिक आत्मविश्वास यामुळे जागतिक किर्तीच्या महिलांमध्ये सुनीता विल्यमचा समावेश होतो. ती भारतीय वंशाची आहे. यामुळे तिचा अधिक अभिमान वाटतो.
२००७ साली सुनीता विलियम्सने भारताचा दौरा केला आणि अहमदाबादमध्ये आपल्या घरी ती आली तेव्हा भारतीय पदार्थावर तुटून पडली. भारताविषयी तिची ओढ अशी विलक्षण आहे.