शहरात वीजचोरीचे प्रमाण वाढले असून, वीजचोरी करणा-यांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
मुंबई – शहरात वीजचोरीचे प्रमाण वाढले असून, वीजचोरी करणा-यांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत झालेल्या सुनावणीवेळी वीजचोरांवर कारवाई केली जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांतर्फे न्यायालयात देण्यात आली.
बेस्ट प्रशासनातर्फे वीजचोरीच्या तक्रारी पोलिस ठाण्यांत नोंदवल्या जात आहेत. वीजचोरी कायदा २००३नुसार पोलिस चौकशी करत आहेत, अशी माहिती एमआरए मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक जगदाळे यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात अनेक मंडळे वीजचोरी करतात.
त्यामुळे राज्य सरकारचे नुकसान होते. या मंडळांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी न्या. पी. व्ही. हरदास आणि न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर झाली.
वीज वितरण करणा-या कंपन्यांना दरवर्षी १५ आणि ५० टक्के वीजचोरीचा फटका बसतो. त्यांपैकी जास्त वीजचोरी ही विविध सण आणि उत्सवांच्या काळात सार्वजनिक मंडळांकडून होत असल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. २००५मध्ये एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात वीजचोरीच्या १० तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे, असे जगदाळे यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
बेस्टला कारवाईसाठी आवश्यक पोलिस बंदोबस्त पुरवला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वीजचोरीचे वाढचे प्रमाण रोखण्यासाठी विशेष विभागाची स्थापना करण्यात यावी, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी जानेवारीत होणार आहे.