सर्व प्रमुख कलावंतांची अप्रतिम कामगिरी या एका शब्दांत ‘चीटर’ चित्रपटाची तारीफ करायला पाहिजे. खूप दिवसांनी अजय फणसेकर यांचा चित्रपट आला म्हणून पाहायला गेलं तर हा चित्रपट ब-यापैकी अपेक्षाभंग करतो. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन अशा सगळ्याच जबाबदा-या अजय फणसेकर यांनी पेलल्यामुळे कथेच्या पातळीवर चित्रपटात खूप उणिवा राहून गेल्या आहेत.
पुण्यातल्या अग्निहोत्री या पौरोहित्य करणा-या कुटुंबातील शेंडेफळ अभय अग्निहोत्री (वैभव तत्त्ववादी) हा शिक्षणात लक्ष नसणारा, उडाणपटप्पूपणा करणारा, खोटं बोलून लोकांना लुबाडणारा थोडक्यात ‘इसकी टोपी उसके सर’ करणारा आहे. कुटुंबातील त्याचा मोठा भाऊ सी.ए. आहे. धाकटी बहीण पीएच.डी. करते आहे.
कॉलेजमध्ये केवळ मौज-मस्ती करायला जाणा-या अभयच्या आयुष्यात मृदूला ऊर्फ मिमो (पूजा सावंत) ही तरुणी येते. दोघांचं एकमेकांवर प्रेम असतं पण हे प्रेमही खोटय़ाच्या पायावर उभारलेलं असतं. अभयने तिला आपण श्रीमंत उद्योगपती ठाकुरांचा मुलगा असून पीएच.डी. करत असल्याचं सांगितलं असतं.
मूळच्या मॉरिशसच्या असलेल्या मीमोला तिचे वडील बॉब साटम नवीन बंगला घेतल्याबद्दल मॉरिशसला बोलवतात. बंगल्यात प्रवेश करताक्षणी मीमोची आजी पौर्णिमाला (सुहास जोशी) कसले तरी अशुभ संकेत मिळतात. शंभर वर्षे जुन्या बंद बंगल्यात वास्तुशांत केल्याशिवाय राहणार नाही. अशी तंबीच आजी देते. वास्तुशांतीसाठी तिला अग्निहोत्री ब्राह्मणच हवा असतो.
आजीची इच्छा पूर्ण करण्यासाठी मीमो आपला मित्र अभय यालाच पुण्यातून एखादा वास्तुशांती करणारा ब्राह्मण पाठवण्यास सांगते. प्रत्यक्षात मीमोला भेटायच्या ओढीने आणि तिच्या वडिलांच्या पैशांवर जीवाचं मॉरिशस करण्यासाठी अभय मॉरिशसला येतो. भुतांवर, वास्तुशांती अशा गोष्टींवर विश्वास नसणा-या अभयला प्रत्यक्षात एका स्त्री भूताशी सामना करावा लागतो.
हे कथानक पडद्यावर मांडताना लेखक म्हणून अजय फणसेकर यांनी खूपच हलगर्जीपणा दाखवला आहे. मुलींवर भारतीय संस्कार व्हावेत म्हणून मॉरिशियसवरून मीमोला एकटीलाच पुण्यात कुठे ठेवण्यात येतं आणि कां हे कळत नाही. तसंच आकस्मिकपणे अभय आणि मीमोच्या प्रेमाचा उलगडाही होत नाही.
मीमोला त्याची गुंडगिरी उघडपणे दिसत असते. त्याच्या थापा एवढय़ा सुशिक्षित मुलीला समजत नाहीत, ये बात कुछ हजम नहीं होती. तीच गोष्ट सारंगीच्या भुताची (वृषाली चव्हाण) आणि व्हिक्टरच्या प्रेमाची, त्यांच्या जुदाईची, खुनाची अविश्वसनीयपणे हे सारे घडते.
लेखकाने या व्यक्तिरेखांना त्यांच्या प्रेमकहाणीला तपशीलच पुरवलेला नाही. लेखक म्हणून अजय फणसेकर यांनी सारंगीच्या भुताला घराबाहेर पडण्यासाठी आवश्यक देह धारण करण्यासाठी चित्रपटातील एकूण एक पात्रांचा वापर केला आहे. त्यातून झालेली विनोदनिर्मिती अनेकदा हास्यास्पद या पातळीवर जाते.
तरीही चित्रपट थोडाफार जे मनोरंजन करतो त्याचं श्रेय केवळ आणि केवळ कलावंतांची अचूक निवड आणि त्यांचा उत्तम अभिनय याला आहे. बी.लक्ष्मण यांनी केलेल्या मॉरिशसच्या अप्रतिम चित्रणाने चित्रपट नेत्रसुखद बनला आहे. चित्रपटाच्या इतर तांत्रिक बाजू गीत, संगीत यांनी चित्रपटाला चांगला दर्जा प्राप्त करून दिला आहे.
अभिजित नार्वेकरांचे संगीत श्रवणीय आहे. त्यावरील वृषाली चव्हाण आणि अमित बाईंग यांनी बसवलेली नृत्ये आकर्षक आहेत. वृषाली चव्हाण यांनी सारंगीची भूमिका खूप चांगली केली आहे. पूजा सावंत खूप ग्लॅमरस आणि सुंदर दिसते.
नृत्याचेही तिला उत्तम अंग आहे. वैभव तत्त्ववादीनेही चिटर अभयच्या भूमिकेत रंग भरण्याचा प्रयत्न केला आहे. पण मुद्दलातच चित्रपट कमजोर असल्याने त्यांची कामगिरी चित्रपट सावरू शकत नाही.