भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावणारा वैजयंता रणगाडा मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरातील शहीद स्मारकाजवळ ठेवण्यात आला आहे.
ठाणे – भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावणारा वैजयंता रणगाडा मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरातील शहीद स्मारकाजवळ ठेवण्यात आला आहे. या शहीद स्मारकासह मुंब्रा येथील विविध विकासकामांचे उद्घाटन १९ मे रोजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
१९७१ च्या युद्धात विजयी भूमिका निभावणारा वैजयंता हा रणगाडा माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी संघर्ष संस्थेला मिळवून दिला. त्यामुळे १९७१ च्या युद्धात शहीद झालेल्या मेजर मनीष पितांबरे यांच्या स्मरणार्थ मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ शहीद स्मारक बनवण्यात आले आहे. तिथे हा रणगाडा ठेवण्यात आला आहे.
‘सोच बदलो, मुंबई बदलेगा’ हा विचार घेऊन स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीन वर्षापूर्वी मुंब्रा – कळवा परिसरातील विकासकामांना सुरुवात केली. आता तीन वर्षानंतर कळवा आणि विशेषत: मुंब्रा रेल्वे स्थानक परिसराचा चेहरामोहरा बदलला आहे. ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात हे दोन्ही परिसर येत असताना अनेक वर्ष या दोन्ही परिसराच्या विकासाकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.
तीन वर्षापूर्वी मुंब्रा म्हणजे अस्वच्छता आणि गलिच्छपणाची बजबजपुरी अशी प्रतिमा या परिसराची पाहणी केल्यानंतर होती. परंतु आता हे दोन्ही परिसर कात टाकत आहेत. कळवा रेल्वे स्थानकाबाहेर पश्चिमेकडे बस आणि रिक्षा स्टॅँड बनवण्यात येत आहे. स्थानकामधून बाहेर पडणा-या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी १७० मीटरचे कॉरीडोअर बनवण्यात आले आहे.
मुंब्रा स्थानकाजवळ ७२ टन लोखंड वापरून ५६ फूट उंचीचे प्रवेशद्वार उभारण्यात येत आहे. मुंब्य्रातील ५०० फेरीवाल्यांसाठी हॉकर्स प्लाझा, क्रिक व्ह्यू गार्डन, ऋतूचक्र पार्क, खारेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर, दिल्लीमध्ये असलेल्या इस्लामिक कल्चर सेंटरच्या धर्तीवर मौलाना आझाद सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन आणि भूमीपूजनासाठी शरद पवार येत आहेत.