सुपरस्टार शाहरुख खान आणि प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साली पुन्हा एकदा समोरासमोर येण्याची शक्यता आहे. दोघांचेही चित्रपट या वर्षीच्या ख्रिसमसदरम्यान तिकीट खिडकीवर आदळणार आहेत.
सुपरस्टार शाहरुख खान आणि प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साली पुन्हा एकदा समोरासमोर येण्याची शक्यता आहे. दोघांचेही चित्रपट या वर्षीच्या ख्रिसमसदरम्यान तिकीट खिडकीवर आदळणार आहेत.
याआधी शाहरुखच्या ‘ओम शांती ओम’ हा चित्रपट संजय लीला भन्साली यांच्या ‘सावरीया’ला २००७मध्ये भिडला होता, मात्र या भिडमभिडीचा फायदा अर्थातच शाहरुखला झाला. भन्साली यांचा रणबीर कपूर आणि सोनम कपूर अभिनित ‘सावरीया’ प्रेक्षकांच्या पचनी पडला नाही. आता संजय लीला भन्साली या वर्षीच्या ख्रिसमसला रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण अभिनित ‘बाजीराव मस्तानी’ प्रदर्शित करणार आहेत. ही बातमी येत नाही तोच; रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनणारा शाहरुख खान अभिनित चित्रपटही याचदरम्यान प्रदर्शित होणार आहे.
मजेशीर गोष्ट अशी की, दिग्दर्शक इम्तियाज अलीचा ‘तमाशा’ हा चित्रपटही याच कालावधीत प्रदर्शित होणार होता. पण भन्साली आणि शाहरुखचा चित्रपट येणार म्हणून ‘तमाशा’ २०१६पर्यंत पुढे ढकलण्यात आला. ‘बाजीराव मस्तानी’ ख्रिसमसला सोलो प्रदर्शित होणार होता. त्यामुळे संजय खूप खूश होता. पण शाहरुखच्या आलेल्या बातमीने तो निराश झाला आहे.
असो. जेव्हा एकाच दिवशी दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होतात, तेव्हा निर्मात्यांना नुकसान सोसावं लागतं, हे आता जगजाहीर झालं आहे. अशात हे दोघं खरंच एकाच दिवशी आपापले चित्रपट प्रदर्शित करणार की तारखा पुढे ढकलणार, हे पाहणं मजेशीर ठरेल.