अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रस्तावित स्मारक उभारण्यासाठी भूमिपूजनाचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे.
मुंबई – अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रस्तावित स्मारक उभारण्यासाठी भूमिपूजनाचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे. या स्मारकाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच भूमिपूजन होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंतीच्या आदल्या दिवशी स्पष्ट केले.
यंदा शिवजयंतीला स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याची घोषणा फडणवीस सरकारने केली होती. मात्र पर्यावरणविषयक परवानग्या मिळाल्या नसल्याने स्मारकाचे भुमिपूजन लांबणीवर पडले आहे. पर्यावरणविषयक परवानगी न मिळाल्याने शिवस्मारकाच्या भूमिपूजनात अनंत अडथळे येत होते.
काही दिवसांपूर्वीच या परवानग्या मिळाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र ठरल्याप्रमाणे शिवजयंतीला भूमिपूजनाचा मुहूर्त चुकला आहे. पर्यावरणविषयक परवानग्या मिळाल्यानंतर या स्मारकाचे भूमिपूजन होईल, अशी शिवप्रेमींची अपेक्षा होती. मात्र फडणवीस सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या स्मारकाचे रेखाचित्र काढण्यासाठी २२ तारखेपर्यंत प्रस्ताव पाठवता येणार आहेत.
१५ मार्चपर्यंत यापैकी एका संस्थेला त्याची जबाबदारी सोपवली जाईल. त्यानंतर स्मारकाच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी निविदा काढल्या जातील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भुमिपूजन सोहळा होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ही प्रकिया कधी होणार, याविषयी बोलणे मात्र
त्यांनी टाळले.