मुंबई महापालिकेकडून शुद्ध पाणीपुरवठा करूनही अनेक जुन्या चाळी आणि गृहनिर्माण सोसायटय़ांत पाण्याच्या शोषण टाक्या साफ केल्या जात नाहीत.
मुंबई – मुंबई महापालिकेकडून शुद्ध पाणीपुरवठा करूनही अनेक जुन्या चाळी आणि गृहनिर्माण सोसायटय़ांत पाण्याच्या शोषण टाक्या साफ केल्या जात नाहीत. त्यामुळे चांगल्या दर्जाचे शुद्ध पाणी पुरवूनही रहिवाशांच्या निष्काळजीमुळे दूषित पाणी दिसून होते.
त्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. जुन्या चाळी व इमारतीत पाणी साठवून ठेवणा-या शोषण टाक्यांची सफाई नगरसेवक निधीतूनच करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे नगरसेवक सुधीर जाधव यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.
मुंबईकरांना २४ तास पाणीपुरवठा करण्याचे स्वप्न दाखवले जात असले तरी अद्याप मुंबईकरांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे सकाळी, दुपारी रात्रीच्या वेळी पाणीपुरवठय़ात संक्शन टँकमध्ये (शोषण टाक्या) पाणी साठवले जाते व त्यातून ठरावीक वेळेत रहिवाशांना ते वितरित केले जाते पालिकेकडून शुद्ध पाणीपुरवठा करूनही शोषण टाक्यांची सफाई होत नाही.
अशावेळी नागरिक स्थानिक प्राधिकरण म्हणून मुंबई पालिकेला जबाबदार धरतात आणि स्थानिक नगरसेवकालाही त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागत असल्याचे मनसे नगरसेवक सुधीर जाधव यांनी स्पष्ट केले.