भारतीय संस्कृतीला विविध सणांचा एक अमूल्य ठेवाच लाभला आहे. महाराष्ट्रीय संस्कृतीत दर मराठी महिन्यात एक ना एक सण असतोच. जो सामाजिक बांधिलकीसोबत माणसाला जगण्याची दिशा देतो. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार दर १ जानेवारीला नवीन वर्षात पाऊल टाकल्यानंतर सूर्यभ्रमणानुसार पहिला सण येतो मकरसंक्रांत. ‘तीळगूळ घ्या आणि गोडगोड बोलाऽऽऽ..’ असं म्हणत आपण आपल्या नात्यांमधला गोडवा अधिकाधिक वाढो, अशा शुभेच्छा एकमेकांना देतो आणि तीळगूळ हातात ठेवत नवीन नातीही जोडतो. या सणाच्या निमित्तानं बिघडलेले मानवी नातेसंबंध सुरळीत व्हावे, ते अधिकाधिक दृढ व्हावेत, हा उद्देश मनाशी बाळगून सगळ्यांसोबत मकरसंक्रांत साजरी करण्याची मजा, आनंद काही औरच!
सर्वाना हे नवीन वर्ष सुखासमाधानाचे जावो, अशा शुभेच्छा देत आपण ‘मकरसंक्रांत’ करतो. मात्र मकरसंक्रात साजरी करण्यामागचा खरा हेतू आजही आपल्याला कळलेला नाही. कारण इंग्रजी दिनदर्शिकेनुसार नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मकरसंक्रांतीचा योग योजण्यामागे आपल्या पूर्वजांचा नक्कीच काहीतरी उत्तम हेतू असावा. सुगी आली की, पीक फुलायला सुरुवात होते. शेतक-यांच्या जीवनात याच्यामुळे एक वेगळाच बहर येतो. मकरसंक्रांत साजरी करण्यामागे काही भौगोलिक कारणं आहेत. ऋतुचक्रानुसार भारतवर्षात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन मुख्य ऋतू आहेत. या ऋतूप्रमाणे सूर्याचे आयनांतर होते. ‘आयनांतर’ अर्थात सूर्याच्या स्थितीमध्ये बदल होतात.
आश्विन महिन्यात ऋतुचक्र बदलते. ते पौष महिन्यापर्यंत कायम असते. या कालावधीत सूर्याचे दक्षिणायन सुरू असते. या दक्षिणायनामुळे दिवस छोटा आणि रात्र मोठी असते. वर्षाच्या सुरुवातीला मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायणाला सुरुवात होते. सूर्य वर्षभरात चार वेळा परिक्रमणा करत असतो. त्या परिक्रमणामध्ये सूर्य विविध राशीमध्ये प्रवेश करतो. सूर्य जेव्हा सिंह राशीत प्रवेश करतो, तेव्हा सिंहस्थ पर्वणी साजरी केली जाते. वर्षभरात चार वेळा परिक्रमणा करणारा सूर्य जेव्हा दक्षिणायन संपवून उत्तरायणात प्रवेश करतो. त्या दिवशी मकरसंक्रांत साजरी केली जाते. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायणाला सुरुवात करतो. या दिवसापासून दिवस मोठा आणि रात्र छोटी होत जाते.
मकरसंक्रातीचा खरा अर्थकाय?
मकरसंक्रातीचा सण हा संपूर्ण भारतात अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. पण मकरसंक्रांतीचा खरा अर्थ काय? याचा आपण कधीच विचार करत नाही. मकरसंक्रांतीचा मराठी भाषेत अर्थ लावण्याचा प्रयत्न केला तर मकर राशीत सूर्याचे झालेले परिक्रमण, असा नक्कीच लावता येईल. पण या सणाला ‘संक्रांत’च का म्हटलं गेलं? संक्रांत या शब्दाची फोड केली असता, ‘सं’ म्हणजे ‘संक्रमण’ आणि ‘क्रांती’ म्हणजे ‘दिवसेंदिवस झालेले बदल’. मग हा सण सूर्याची पूजा करून का केला जातो? ‘मकरसंक्रांत’ या शब्दाच्या अर्थाप्रमाणे आपण आपल्या आयुष्यातील संकटावर मात करत क्रांती केली पाहिजे, असा संदेश हा सण आपल्याला देतो आणि म्हणूनच कदाचित आपल्या पूर्वजांनी या सणाची योजना वर्षाच्या आरंभी केली असावी. माणसाच्या आयुष्य कायम सुखी असेल असे नाही. पण माणसानेच ठरवलं तर तो दु:खाच्या डोंगरातही सुखाची बाग फुलवू शकतो. सूर्य जसा लोकांचं आयुष्य प्रकाशमान करतो त्याचप्रकारे माणसाच्या बुद्धीतही तीच प्रगल्भता आहे. फक्त माणूस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे या सणासुदीच्या माध्यमातून लोकांचं आयुष्य प्रकाशमान आणि हितावह करण्यासाठीच पूर्वजांनी मकरसंक्रांतीचा घाट घातला असावा.
त्यामुळे मकरसंक्रांतीला नुसते तीळगूळ वाटून चालणार नाही तर इतरांच्या सुखदु:खात सहभागी होऊन त्यांच्यासाठी आनंदाचे क्षण आपण दिले पाहिजे. मकरसंक्रांतीला तीळ देण्यामागे ही शास्त्रीय कारणे आहेत. बदलत्या ऋतुमानानुसार आपण आपल्या आहारातही बदल करत असतो. थंडीच्या दिवसात शरीराला अधिक ऊर्जा आशी स्निग्धांशाची गरज असते. ती ऊर्जा आपल्याला स्निग्ध पदार्थातून मिळते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला थंडीचा कडाका कायम असतो (अलीकडच्या वातावरणातील बदलामुळे शहरांसह, गावांकडेही वर्षागणिक थंडी कमी होतेय.) परिणामी आपण या काळात स्निग्ध पदार्थाचे सेवन करतो. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी इतर काही न दिले जाता तीळ दिले जातात. तीळ हा स्निग्ध पदार्थ असून त्याच्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते. तिळामुळे शरीरात उष्णता कायम ठेवण्यास मदत होते. त्यामुळे ऋतुचक्राचं भान ठेवत आपल्या पूर्वजांनी अतिशय विचारपूर्वक या दिवशी तीळच वाटले होते. या तीळ वाटण्यामागे काही दंतकथा सांगितल्या जातात त्याही आपण पाहू या.
मकरसंक्रांतीची दंतकथा
मकरसंक्रांत करण्यामागे एक दंतकथा सांगितली जाते. काही पुस्तकात आणि ग्रंथांमध्ये मकरसंक्रांतीच्या दिवसाचा उल्लेख पाहायला मिळतो. पृथ्वीच्या निर्मितीनंतर हजारो वर्षानी मनुष्याची निर्मिती झाली होती. त्यावेळी फक्त तीन ठिकाणं अस्तित्वात होती. पृथ्वी, आकाश आणि पाताळ, अशी या तिन्ही लोकांची नावं. पाताळात असुर आणि आकाश म्हणजे स्वर्गात देवाचा वास होता. तर पृथ्वीवर मनुष्य अगदी सुखासमाधानात राहत होते. पण काही काळानंतर असुरांनी पाताळातून पृथ्वीकडे मोर्चा वळवला. संकासुर नामक दैत्यराजा पाताळातून पृथ्वीकडे अतिक्रमण करत निघाला. त्याने रस्त्याने येताना अनेक ऋषिमुनींना ठार केले. पृथ्वीवर संकासुराने उच्छाद मांडला होता. धर्माच्या नावाखाली अधर्म माजला होता. देवाचे नाव घेणारा प्रत्येक जण सरणावर चढत होता. त्यामुळे लोकांमध्ये एक वेगळीच दहशत निर्माण झाली होती. संकासुर आश्विन मासात पातळ सोडून निघाला होता. त्याने अनेक देवदेवतांना जेरीस आणले होते.
शेवटी ऋषीमुनी आणि देवगणांनी देवी भगवतीला शरण जाण्याचे ठरवले. मार्गशीर्ष महिन्यात सगळ्यांनी महालक्ष्मीरूपी देवी भगवतीला आवाहन केले. या देवी भगवतीने चंडमुंडीनी रूप घेतले आणि पृथ्वीवर अवतार घेतला. मार्गशीर्ष महिन्यापासून पौष महिन्यापर्यंत देवी आणि दैत्यराजा संकासुरामध्ये तुंबळ युद्ध झाले. सलग दोन ते तीन महिने हे युद्ध सुरू होते. नाना कयास करून देखील देवीला या असुरावर विजय मिळवता येईना. त्यामुळे देवीने सूर्याला आवाहन केले. त्याप्रमाणे सूर्याने तिला सहाय्य केली. शेवटी देवीने असुराचे वर्म जाणले आणि त्याचा वध केला. यासाठी देवीने संक्रांतीचा आकार घेतला होता. या संक्रांतीमुळे त्या असुराचा वध झाला होता, अशी कथा आहे. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी सूर्याला नमस्कार केल्यानंतरच संक्रांतीची पूजा मांडली जाते.
या दंतकथेबरोबरच तीळ का वाटायचे, याची ही दंतकथा सांगितली जाते. जेव्हा देवी भगवती युद्ध संपवून स्वर्गलोकाकडे निघाली, त्यावेळी संकासुराच्या वज्र हल्ल्यामुळे तिच्या शरीरावर जे घाव झाले होते. त्या जखमा थंडीमुळे चिघळत होत्या. थंडीच्या काळात सूर्यप्रकाशाचा अभाव असल्यामुळे देवीच्या शरीरावरील घाव बरे होण्यासाठी उष्णता मिळत नव्हती. परिणामी तिने तीळ आणि शेंगदाण्याचे सेवन केले होते. ज्यामुळे तिला घावांमुळे होणारे कष्ट, यातना कमी झाल्या. म्हणूनही यादिवशी तिळाचे सेवन केले जाते.