१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील संजय दत्तसह चार आरोपी गुरुवारी विशेष टाडा न्यायालयसमोर शरण आले. संजय दत्तला उर्वरित साडेतीन वर्षाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
मुंबई – १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील संजय दत्तसह चार आरोपी गुरुवारी विशेष टाडा न्यायालयसमोर शरण आले. संजय दत्तला उर्वरित साडेतीन वर्षाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
या सर्व आरोपींना एक महिन्यासाठी घरचे जेवण, औषधे, पातळ सतरंजी, चादर आणि पंखा या सुविधा मिळणार आहेत. त्यानंतर कारागृह प्रशासन एक महिन्यानंतर त्यांच्या या सुविधांबाबत पुनर्विचार करणार आहे. दरम्यान, दोन आरोपी वैद्यकीय कारणास्तव शरण आले नाहीत.
संजय दत्त शरणागती पत्करण्यासाठी दुपारी २.५० वाजता टाडा न्यायालयात आला. त्या वेळी त्याच्याबरोबर आमदार बाबा सिद्दीकी, संजयची पत्नी मान्यता, बहीण व खासदार प्रिया दत्त व त्यांचे पती उपस्थित होते. या वेळी अन्य आरोपी युसूफ नळवाला, इसा मेमन, अल्ताफ सय्यद आणि केरसी अदजानिया व त्यांचे नातेवाईकही आले होते. संजयच्या चाहत्यांनी न्यायालयाच्या आवारात प्रचंड गर्दी केली होती. या वेळी संजयला धक्काबुक्की करण्यात आली.
‘संजयच्या पोटात कोणीतरी बुक्का मारल्याने त्याचे पोट दुखत आहे त्यामुळे त्याला आरोपींसाठी असलेल्या जागेत बसण्याची परवानगी द्यावी,’ अशी मागणी त्याच्या वकिलांनी केली. ती विशेष टाडा न्यायालयाचे न्या. जी. ए. सानप यांनी मान्य करून, सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या कुलाबा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनोद सावंत यांना चांगलेच फैलावर घेतले. समन्वयाअभावी हा प्रकार घडला, असे सावंत यांनी मान्य केले.
सायंकाळी ४.०५ वाजता संजय आरोपीच्या पिंज-यात उभा राहिल्यावर त्याने आपले वय आणि पत्ता सांगितला व ५५१ दिवस शिक्षा भोगल्याचे सांगितले. या वेळी न्या. सानप यांनी अन्य आरोपींनाही हे प्रश्न विचारले. झैबुन्नीसा आणि दादाभाई पारकर हे दोन आरोपी वैद्यकीय कारणास्तव शरण आले नाहीत. पारकर याला हृदयविकाराचा झटका आल्याने तर झैबुन्नीसा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरण येतील, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी न्या. सानप यांना दिली.
आपला भाऊ स्किझोफ्रेनिक असून, तो औरंगाबाद कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्यामुळे आपल्यालाही तेथेच ठेवावे, अशी इसा मेमनने केलेली मागणी टाडा न्यायालयाने मान्य केली. तसेच अल्ताफनेही औरंगाबाद कारागृहात ठेवण्याची आणि संजय व युसूफ नळवाला याने येरवडा कारागृहात ठेवण्याची मागणी टाडा न्यायालयाकडे केली. मात्र, त्यावर आर्थर रोड कारागृह प्रशासन निर्णय घेईल, असे न्या. सानप यांनी सांगितले.
पत्नी, बहीण, भाऊ आणि वकिलांना कारागृहात भेट घेता यावे, यासाठी टाडा न्यायालयाने किंवा न्यायालयाच्या रजिस्ट्रारने परवानगी द्यावी, जेणेकरून कारागृह प्रशासनाची नेहमी परवानगी घ्यावी लागणार नाही, अशी संजयचे वकील रिझवान र्मचट यांनी केली. ती न्या. सानप यांनी मान्य केली नाही. याबाबतचा निर्णय संबंधित कारागृह प्रशासन घेईल, असे ते म्हणाले. संजय आणि आरोपी संबंधित कारागृहात पोहोचेपर्यंत प्रसारमाध्यमांनी त्याचा पाठलाग करू नये आणि आरोपींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी चोख सुरक्षा पुरवावी आणि त्याची जबाबदारी मुंबई पोलिसांच्या परिमंडळ एकच्या उपायुक्तांनी घ्यावी, असे आदेशही न्या. सानप यांनी दिले.
ई-सिगारेटची मागणी फेटाळली
इलेक्ट्रॉनिक सिगारेटमध्ये निकोटिनचे प्रमाण कमी असल्याने ती देण्याची संजयची मागणी न्यायालयाने अमान्य करताना धूम्रपान सोडण्याचा सल्ला दिला.
रामायण, महाभारत, हनुमान चालिसा, भगवद्गीता ही पुस्तके कारागृहात नेण्यास मंजुरी.
जानेवारी १९९३: चित्रपट निर्माता हनिफ लकडावाला आणि त्याचा भावाने संजय दत्तच्या वांद्रे येथील घरी शस्त्र नेली.
१२ मार्च १९९३ : मुंबईत १३ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले.
१९ एप्रिल १९९३ : संजय दत्तला अटक
२८ एप्रिल १९९३ : संजयचा कबुलीजबाब पोलिसांनी नोंदवला
५ मे १९९३ : संजयची जामिनावर सुटका
नोव्हेंबर १९९३ : १८९ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
४ जुलै १९९४ : संजयला जामीन नाकारला. त्याची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली.
१७ ऑक्टोबर १९९५ : १६ महिन्यांची शिक्षा भोगल्यानंतर न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका.
३१ जुलै २००७ : संजयला सहा वर्षाची शिक्षा
ऑगस्ट २००७ : संजयने जामिनाकरता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली
नोव्हेंबर २००७ : सर्वोच्च न्यायालयाने संजयला जामीन मंजूर केला
ऑगस्ट २०१२ : सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी
१८ मार्च २०१३ : न्यायालयाने संजयला सुनावलेली सहा वर्षाची शिक्षा कमी करून
पाच वर्षाची शिक्षा सुनावली