विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेत राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वात महत्त्वाची भूमिका असेल, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी ट्विटरद्वारे स्पष्ट केले आहे.
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेत राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वात महत्त्वाची भूमिका असेल, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी ट्विटरद्वारे स्पष्ट केले आहे. राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस कोणतीही तडजोड करण्यास तयार असेल. एवढेच नाही तर सर्व पर्याय पक्षासाठी खुलेच असतील, असे संकेतच त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी होईल, असा विश्वासही पटेल यांनी व्यक्त केला.
सध्याची राजकीय स्थिती पाहता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात त्रिशंकू अवस्था निर्माण होऊ शकते. अशा वेळी छोटया पक्षांना अधिक महत्त्व येणार आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसची बारीक नजर आहे. यातूनच पुन्हा एकदा काही करून सत्तेत जाता येईल का, याची चाचपणीच जणू राष्ट्रवादीकडून केली जात आहे. म्हणूनच पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे की, सत्ता स्थापनेत राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. राष्ट्रवादीशिवाय कोणीही सरकार बनवू शकणार नाही.
अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पर्याय खुले ठेवण्याची दाट शक्यता आहे. राजकारणात कोणीही अस्पृश्य नसतो हे पक्षाचे नेते वेळोवेळी सांगत आले आहेत. त्यामुळे गरज पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस भाजप किंवा शिवसेनेलाही जवळ करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बदलत्या समीकरणांवर राष्ट्रवादीची नजर आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस काही करू शकते
राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यामुळे ते कोणताही निर्णय घेऊ शकतात. पटेल यांनी केलेल्या ट्विटवरून राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच पर्याय खुले ठेवले आहेत असे वाटते, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी दिली आहे. आघाडी तोडण्याचा निर्णय राष्ट्रवादीने ज्या पद्धतीने घेतला त्या पद्धतीनेच ते नव्याने कोणाबरोबर जायचे याचाही निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.