गणेशोत्सवाच्या धामधुमीत भजनाने धरलेल्या तालाबरोबर पावसानेही संततधार सुरूच ठेवल्याने गणेशभक्तांची तारांबळ उडली आहे.
सिंधुदुर्ग- गणेशोत्सवाच्या धामधुमीत भजनाने धरलेल्या तालाबरोबर पावसानेही संततधार सुरूच ठेवल्याने गणेशभक्तांची तारांबळ उडली आहे. गुरुवारी विजांचा लखलखाट आणि प्रचंड गडगडासह पाऊस बरसत होता. गेले तीन दिवस कोसळत असलेला पाऊस आणखी दोन दिवस राज्यभर बरसत राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.
सिंधुदुर्गासह कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी, विदर्भ आणि मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्राच्याही अनेक भागांत वरु णराजाने पुन्हा हजेरी लावली आहे. गेले तीन दिवस सायंकाळनंतर धुवांधार पाऊस कोसळत आहे. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनारी भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यात पाऊस कोसळत आहे. या क्षेत्राची तीव्रता अजून ४८ तास टिकून राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, जोरदार वारे यांसह पाऊस कोसळत आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे संकेत असल्याची माहिती हवामान खात्याचे वरिष्ठ संशोधक सतीश गावकर यांनी दिली आहे.