महाराष्ट्राच्या राजकारणातील आजचा दिवस नक्कीच पुढील काही दिवस लोकांच्या स्मरणात राहील. महाराष्ट्राच्या विधिमंडळातही आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील आजचा दिवस नक्कीच पुढील काही दिवस लोकांच्या स्मरणात राहील. महाराष्ट्राच्या विधिमंडळातही आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे.
विरोधी पक्षांच्या बाकांवरून मांडलेल्या प्रस्तावाला प्रमुख सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांनी पाठिंबा दिला. तर सत्तेमध्ये सहभागी होऊन सत्तेची गोड फळे चाखणा-या शिवसेनेने मात्र ठरावाच्या विरोधात भूमिका घेतली.
इतकेच नव्हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामध्ये असलेल्या छुप्प्या युतीवर जोरदार हल्लाबोल केला. त्याला भाजपाचे सुधीर मुनगंटीवार, गिरीश बापट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
तर विरोधी बाकांवर राहून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी एकजूट दाखविण्याची गरज असताना विरोधी पक्ष एकमेकांच्या उखाळयापाखाळया काढीत होते. म्हणजे कोण कुणाचा मित्र आणि कोण कुणाचा शत्रू आहे, हेच काही काळ कुणाला कळत नव्हते. तशीच सुरुवात रामदास कदम यांनी केली.
ते म्हणाले, ‘‘नेमके काय चाललेय तेच कळत नाही. मात्र एक बरे झाले. यानिमित्ताने सर्व उघडे पडले. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून असलेले संबंध आता लोकांना कळून चुकले.
युती का तोडली, त्यानंतर निवडणूक निकाल लागण्याच्या अगोदरच बाहेरून पाठिंब्याच्या घोषणा कुणी केल्या. विधानसभा अध्यक्षाच्या निवडीमध्ये कुणीही कुणाला मदत केली आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीला का गेले याचेही उत्तर मिळाले.
मोदी तर म्हणाले की, देशाचा कारभार चालवीत असताना आपण बारामतीकरांची मदत घेतो. देशाचे पंतप्रधान मराठी माणसांचा सल्ला घेतात याचा आम्हाला अभिमान वाटतो,’’ अशी खोचक टिप्पणी कदम यांनी करताच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, ‘‘नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. त्यांच्याबद्दल संशय निर्माण करणारे वक्तव्य करू नये आणि पंतप्रधान काही पहिल्यांदा बारामतीला गेले नाहीत.
त्यापूर्वी राजीव गांधीही पंतप्रधान असताना बारामतीला आले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत असे सांगत होते. एकमेकांची स्तुती करीत होते, तेव्हा तुमचा मेंदू थंड पडला होता काय?’’ असा संतप्त सवाल मुनगंटीवार यांनी केला.
तर संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट हेही कदम यांच्यावर चांगलेच तुटून पडले. ते म्हणाले, ‘‘कोण कुणाला भेटतंय, कुणाचे काय चालले आहे, हे कळत नाही, असे कदम म्हणतात. आमचं काय चाललंय ते कदम यांनी नंतर पाहावे. पहिल्यांदा शिवसेनेमध्ये काय चालले आहे, हे तरी रामदास कदम यांना माहीत आहे काय? ’’ हा घाव मात्र कदम यांच्या चांगलाच वर्मी लागला.
या ठरावाच्या उत्तरातील भाषण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अत्यंत जोरदार केले. ठरावाच्या विरोधात बोलणा-या प्रत्येकाचे मुद्दे त्यांनी सपशेल खोडून काढले. विशेषत: रामदास कदम यांना तर तटकरे यांनी अक्षरश: सोलून काढले.
ते म्हणाले, ‘‘शिवसेनेला नैतिकता शिकवण्याचा अधिकार तरी आहे का? आम्ही लाल दिव्याची गाडी मिळावी म्हणून हा अविश्वास ठराव आणला असे म्हणता? तुम्ही मंत्री कशासाठी झाला आहात.
लाल दिव्याच्या गाडीसाठीच ना? मुंबईत झालेल्या अधिवेशनात विरोधी बाकावर बसलात. शिवसेनेचे एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेतेही झाले. मात्र एक महिन्यात चमत्कार घडला आणि इकडून उठून तिकडे जाऊन बसलात.
विरोधी बाकांवरून एक महिन्यात सत्ताधारी बाकांवर जाऊन बसलात. लाल दिव्याच्या गाडीसाठीच ना? सगळेच या सभागृहात सांगू काय? तुम्हाला लाल दिव्याच्या गाडीचा सोस नाही काय?
नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले तेव्हा तुम्हीच माझ्या बंगल्यावर आला होतात. ‘मला दादाकडे घेऊन चला आणि विरोधी पक्षनेता व्हायला मदत करा,’ असे सांगायला. ते विसरलात काय?’’ तटकरेंनी लगावलेल्या या टोल्याने रामदास कदम यांचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला. तटकरे यांनी अत्यंत कठोर शब्दात शिवसेना आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला.
मात्र ज्यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता त्या शिवाजीराव देशमुख यांच्याबद्दल मात्र शेवटपर्यंत अत्यंत आदर व्यक्त केला. तटकरेंचे विधान परिषदेतील भाषण चांगलेच गाजले. शिवाजीराव देशमुख सभागृहात बोलताना अत्यंत भावुक झाले.
कोणतीही चूक केलेली नाही. सभागृहाने अविश्वास दाखवावा असे आपण वागलेलो नाही. तरीही आपल्यावर हा ठराव आला. खरे तर राजीनामा देऊन हा प्रसंग टाळण्याचा माझ्यासमोर पर्याय होता.
मात्र आतापर्यंत संघर्ष करीत आपण इथपर्यंत वाटचाल केली आहे. सार्वजनिक जीवनात कोणताही ठपका आपल्यावर येणार नाही याची काळजी घेतली. मात्र त्याच वेळी कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे धैर्य दाखविले. आजही त्याच धैर्याने आपण या ठरावाला सामोरे जात आहोत, असे सांगताना त्यांचा स्वर कातर झाला.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भांडणात भाजपाने घेतलेल्या भूमिकेबद्दल शिवाजीराव देमशुख यांनी फार अचूक टिप्पणी केली. ते म्हणाले, ‘‘सुग्रीव आणि वालीचे भांडण चालले होते. रामाने बाण मारला नसता तर बरे झाले असते.’’ त्यांची टिप्पणी भाजपाच्या वर्मावर घाव घालणारी होती. आजच्या अविश्वास ठरावाने राज्यातील सुप्त आणि गुप्त राजकारण चव्हाटयावर आले.