गुणवत्ता यादीत समावेश होऊनही तब्बल ७० हजार विद्यार्थ्यांनी अकरावीच्या प्रवेशाला नापसंती दाखवल्याचे समोर आले आहे.
मुंबई- मुंबई महानगर क्षेत्रात शालेय शिक्षण विभागाकडून राबवण्यात आलेल्या अकरावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी बुधवार, २ जुलै रोजी जाहीर झाली होती. या गुणवत्ता यादीनुसार तिन्ही शाखांसाठी १ लाख ७६ हजार ८७६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. शनिवारी या प्रवेशाची मुदत संपेपर्यंत १ लाख ६ हजार ५३७ विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेतले, तर या गुणवत्ता यादीत समावेश होऊनही तब्बल ७० हजार विद्यार्थ्यांनी अकरावीच्या प्रवेशाला नापसंती दाखवल्याचे समोर आले आहे.
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीत वाणिज्य शाखेतील १ लाख ५ हजार ५७२, विज्ञान शाखेतील ५६ हजार १३६ आणि कला शाखेतील १५ हजार १६८ असे एकूण १ लाख ७६ हजार ८७६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. मात्र यांपैकी ७० हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशाला नापसंती दाखवली असल्याने दुस-या गुणवत्ता यादीत येणा-या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तर दुसरीकडे ज्या ७० हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही, त्या सर्व विद्यार्थ्यांना ९ जुलै रोजी जाहीर होणा-या दुस-या गुणवत्ता यादीत ऑनलाइनमध्ये प्रवेशाची नोंद न झाल्याने वगळले जाणार आहे. त्यामुळे त्यांची दुस-या यादीतील प्रवेशाची संधी हुकणार आहे.
पसंतीक्रमातील प्रवेश
अकरावीच्या पहिल्या प्रवेश फेरीत पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयांमध्ये ४४ हजार ८०६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. तर दुस-या पसंतीक्रमात २३ हजार १५८, तिस-या पसंतीक्रमात १६ हजार २११, चौथ्या पसंतीक्रमात १२ हजार ५१७ आणि पाचव्या पसंतीक्रमात १० हजार ६६४ विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाले होते.