महाराष्ट्रातल्या राजकारणातले, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे श्री. सुशीलकुमार शिंदे उद्या ७५व्या वर्षात पाऊल ठेवीत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या ५० वर्षाच्या कर्तृत्वाचा आलेख. ‘प्रहार’तर्फे त्यांना शुभेच्छा.
उद्या ४ सप्टेंबर. एका निर्मळ मनाचा राजकीय नेता ७५व्या वर्षात पाऊल ठेवीत आहे. त्याचे नाव सुशीलकुमार शिंदे. राजकारणात आवश्यक असलेली जात बरोबर नसताना प्रवाहाच्या विरुद्ध पोहून सोलापूरच्या ढोर गल्लीतून एक वॉर्डबॉयची नोकरी करणारा, मग ‘बुढ्ढी के बाल’ विकणारा, नंतरचा कोर्टातला बेलीफ, मग रात्रशाळेत शिकून पोलीस विभागाची परीक्षा पास होऊन सबइन्स्पेक्टर अशा सगळय़ा प्रतिकूल परिस्थितीत चेह-यावरचे हास्य कायम ठेवून राजकारणात निर्मळपणा टिकवणारे सुशीलकुमार.
सुशीलकुमार देशाचे गृहमंत्री झाले. लोकसभेतले काँग्रेस पक्षाचे नेते झाले. पंतप्रधानांच्या खालोखाल दोन जागा महत्त्वाच्या असतात. एक – गृहमंत्री आणि दुसरी – लोकसभेतला नेता. या दोन्ही जागांवर मराठी माणूस बसला होता. क्रमांक दोनला सुशीलकमार पोहोचले आणि गृहमंत्रीपदही त्यांना मिळाले. यापूर्वी असे कधीही घडलेले नाही. ते राज्यपाल होते, राज्यपालाला केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा सन्मानाने सामील करून घेतले असेही पूर्वी कधी घडलेले नव्हते. सर्वसाधारण मतदारसंघात दलित समाजाच्या उमेदवाराने उभे राहून लाखो मतांनी निवडून येणे, असेही पूर्वी घडलेले नाही. नासिकराव तिरपुडे एकदा विधानसभेला सर्वसाधारण मतदारसंघातून (भंडारा) विजयी झाले होते. सुशीलकुमारांचा चमत्कार एकदा नव्हे तर लोकसभेसाठी तीनदा झालेला आहे आणि नंतर सोलापूरच्या ढोर गल्लीतला हा दलित समाजातील एक मुलगा देशाच्या गृहमंत्रीपदाच्या खुर्चीवर नॉर्थब्लॉकमध्ये विराजमान झालेला महाराष्ट्राने पाहिला.
गृहमंत्रीपदाच्या खुर्चीच्या वर भारताचे पहिले गृहमंत्री आणि पोलादी पुरुष सरदार पटेल यांचा फोटा लावलेला आहे. तो आजतागायत कायम आहे. गृहमंत्रीपदावर आतापर्यंत महाराष्ट्राचे पहिले गृहमंत्री यशवंतराव चव्हाण, मग शंकरराव चव्हाण, मग शिवराज पाटील आणि त्यानंतर सुशीलकुमार शिंदे बसलेले होते. सुशीलकुमारांची गृहमंत्रीपदी निवड झाली तेव्हा महाराष्ट्राने जसा आनंद व्यक्त करायला हवा होता, तसा तो केला नाही. मनाच्या उदारतेमध्ये महाराष्ट्रातील लोक कद्रू आहेत. त्यांना मनसोक्त अभिनंदन करता येत नाही आणि मनसोक्त टाळय़ाही वाजवता येत नाहीत. पी. चिदंबरम परत अर्थमंत्री झाले होते तेव्हा चेन्नईमध्ये त्यांना किती शाली घातल्या आणि त्यांचे किती कौतुक झाले होते. महाराष्ट्र नुसताच मागे पडलेला नाही तर आपला माणूस किती मोठा झालेला आहे, याचा आवाकासुद्धा मराठी माणसाला त्यावेळी आलेला नव्हता. राज्यपाल हे पद गृहमंत्रालयाच्या अख्त्यारीत येते. शंकराराव चव्हाण गृहमंत्री असताना मी त्यांच्यासोबत काश्मीरला गेलो होतो. माजी लष्करप्रमुख कृष्णराव हे काश्मीरचे राज्यपाल होते. श्रीनगरच्या दिमाखदार राजभवनमध्ये अलिशान सोफ्यावर शंकरराव चव्हाण गृहमंत्री म्हणून बसले होते आणि राज्यपाल कृष्णराव अगदी दहा मिनिटे उभेच होते. शंकरराव जेव्हा त्यांना ‘बसा’ म्हणाले, तेव्हा ते चुटपुरते बसले. गृहमंत्र्यांचा दरारा हा असा असतो. सुशीलकुमारांच्या वाटय़ाला ज्यादिवशी हे पद आले होते त्यादिवशी विविध वाहिन्यांनी आपल्या अकला पाझळल्याच. त्याच दिवशी उत्तर भारतात ग्रीडमध्ये गडबड झाल्यामुळे वीजप्रवाह खंडित झाला होता. त्याचवेळी सुशीलकुमार गृहमंत्री झाल्याची बातमी आली आणि मग चॅनेलवाल्यांना ऊत आला. ‘बत्तीगूलवाले को इनाम’ अशा विकृत शब्दरचना करून बातम्या दिल्या जात होत्या. हिंदी चॅनेलवाले त्यात सामील झाले. काही मराठी चॅनेलवाल्यांनाही भान राहिले नव्हते. सुशीलकुमारांनी सलग ६-७ वर्षे ऊर्जामंत्री म्हणून काम करताना ५० हजार मेगावॅट ऊर्जेचे उत्पादन वाढवले, हे कोणी सांगायला त्यावेळी तयार नव्हते. सलग ७ वर्षे ऊर्जामंत्री राहिलेले सुद्धा सुशीलकुमार शिंदे हे एकटेच आहेत. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सलग ९ वेळा मांडलेले ते एकटेच आहेत आणि कोर्टामध्ये बेलीफ म्हणून काम करणारा, नंतर पोलीस सबइन्स्पेक्टर झालेले आणि नंतर गृहमंत्री झालेलेही ते एकटेच आहेत. ढोर गल्ली ते नॉर्थब्लॉक हा त्यांचा प्रवास सोपा नाही. उगाच कोणाच्या वाटय़ाला हे भाग्य येत नाही.
नशीब नावाची गोष्ट असेल किंवा नसेल, पण ‘कर्तृत्व आणि विश्वास’ या दोन्ही गोष्टी एकत्र चालत असल्याशिवाय एवढय़ा उंच जागेवर जाणे सोपे नाही. ते आमदार होते, राज्यमंत्री होते, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस झाले, सात राज्यांचे ते प्रभारी होते. राज्यपाल होते. या सगळय़ा सन्मानापेक्षाही काँग्रेस पक्षाने त्यांना उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीकरिता पक्षाचे अधिकृत उमेदवार केले, त्यावेळी काँग्रेसजवळ बहुमत नव्हते. त्यामुळे विजय मिळणार नव्हता हे सगळय़ांनाच माहिती होते. वाजपेयींचे राज्य होते. काँग्रेस पक्षाने सुशीलकुमारांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी द्यावी ही गोष्ट लहान नव्हती, त्याचे ममत्वही महाराष्ट्राला वाटले नाही आणि नंतर पंतप्रधानांच्या खालोखाल महत्त्वाचे मानले गेलेले देशाचे गृहमंत्रीपद सुशीलकुमारांना मिळालेले होते तेव्हाही महाराष्ट्राने शिवाजी पार्कवर त्यांचा सत्कार करायला हवा होता. तसा आनंद महाराष्ट्राने व्यक्त केला नाही.
सुशीलकुमारांच्या या अलौकिक यशाचे नेमके गमक काय?
मी त्यांना १९६९पासून पाहतो आहे. १३ जून १९६९ला आचार्य अत्रे यांचे दु:खद निधन झाले तेव्हा जी फार मोठी अंत्ययात्रा निघाली होती. त्या अंत्ययात्रेत बंदोबस्तासाठी एक किरकोळ शरीरयष्टीचा पोलीस सबइन्स्पेक्टर हातात दंडुका घेऊन सुरुवातीपासून शेवटपर्यंत चालत होता, ते होते सुशीलकुमार. तेव्हापासून आजपर्यंत ४५ वर्षे मी त्यांना पाहतो आहे.
अनेक कठीण प्रसंगातही त्यांच्या चेह-यावरचे हास्य त्यांनी कधी मावळू दिले नाही. त्यांच्यातला ‘मनातला मोठेपणा’ आणि जीवनातला साधेपणा ते कधी विसरले नाहीत. परिस्थितीची जाणीव सतत कायम ठेवून मोठी पदे मिळाली तरी अहंकाराचा वारा त्यांना कधी लागला नाही. प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे जे दोन-चार राजकारणी या राज्यात आहेत, त्यात जसे आमचे विलासराव होते, तसेच आमचे सुशीलकुमारही आहेत. या दोघांची मैत्री हाही चर्चेचा विषय होता आणि या दोघांच्या मनाची निर्मळता ही सगळय़ांनाच भावलेली होती. सुशीलकुमार तर अतिशय वाईट आणि कठीण परिस्थितीत जीवन जगत होते. पण त्यांनी जिद्द सोडली नव्हती. त्यांच्या चेह-यावरचे हास्य कधी मावळले नव्हते आणि डोक्यावर पत्र्याची ट्रंक घेऊन सोलापूरहून मुंबईला आलेला हा एक तरुण जिद्दीने उभा राहिला. जातीव्यवस्थेच्या वेदना त्यांना बोचलेल्या होत्या. पण त्याचा बाऊ त्यांनी केला नाही. ते खचून गेले नाहीत. कठेही कटुता येऊ न देता सुशीलकुमारांनी आपल्या मनाची निर्मळता कधी गमावली नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय सत्ता हातात नसताना ज्यांनी रसिकता कायम जपली आहे अशा मोठय़ा नेत्यांमध्ये साहित्य, कला, संगीत आणि नाटक या सगळय़ामध्ये रमणारे सुशीलकुमार हे एक आहेत. ‘जीवनाचा सूर सापडलेला रसिक’ आणि राजकारणातल्या बेबंदशाहीतला उत्तम कलावंत असे सुशीलकुमार. सुशीलकुमार शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वात किती मेगावॅट ऊर्जा दडली आहे, याचा पत्ता लागत नाही. त्यावेळी सत्तेमध्ये राहूनही जमिनीवर पाय असणारा नेता म्हणजे सुशीलकुमार होते. काय योगायोग असतो, करमाळा मतदारसंघात पोटनिवडणुकीला काँग्रेस पक्ष सुशीलकुमारांना तिकीट देतो आणि त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक सांगतात, ‘या उमेदवाराला निवडून द्या आणि तो पुढे कोण होतोय ते बघा..’ सुशीलकुमार गृहमंत्री झालेले बघायला यशवंतराव चव्हाणही नव्हते आणि वसंतराव नाईकही नव्हते. पण महाराष्ट्राचा हा निर्मळ मनाचा माणूस इतक्या उच्चपदावर गेला याचा त्यांना खूप आनंद वाटला असता. ७५व्या वर्षात पाऊल ठेवणा-या सुशीलकुमारांचे ‘प्रहार’ परिवारातर्फे अभिनंदन.