कोळसा, लाकूड, इंधन यासारख्या पारंपरिक ऊर्जास्रोतांचा अतोनात वापर केल्यामुळे आज हे ऊर्जास्रोत नष्ट होण्याच्या मार्गावर तर आहेतच, शिवाय त्यामुळे जैविक विविधतेचंही खूप नुकसान होत असल्याचं तज्ज्ञ वारंवार सांगत आहेत. यावर मात करायची तर विजेसारखे महागडे ऊर्जास्रोत वापरावे लागतात. परंतु नैसर्गिक ऊर्जास्त्रोत वापरल्यास ऊर्जेचा पुनर्वापरही होतो. लोकांच्या मनावर हे ठसवण्यासाठी ठाण्यात टाटा कॅपिटलच्या वतीने अनोखं सूर्यअरण्य निर्माण करण्यात आलं आहे.
पृथ्वीवरील ऊर्जास्रोत कायमच मानवाला पुरेसे पडणारे नाहीत, त्यासाठी नव्या ऊर्जास्रोतांच्या शोधात आपण नेहमीच असतो. काही नैसर्गिक व पारंपरिक ऊर्जास्रोत मात्र आपल्यासोबत सदासर्वदा राहतील असे आहेत, परंतु त्यांचं महत्त्व जाणून घेऊन त्यांचा वापर करणारे देश फार कमी आहेत. असाच एक नैसर्गिक ऊर्जास्रोत आहे तो म्हणजे सौरऊर्जा आणि भारतात सौरऊर्जेला नेहमीच महत्त्व दिलं गेलं आहे. सौरऊर्जा ही अखंड मिळत राहणारी ऊर्जा आहे आणि या बाबतीत भारत उष्ण कटिबंधीय देश असल्यामुळे नशीबवान आहे. आता वेळ आली आहे ती आधुनिक गरजांसाठी पारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करून घेण्याची. हेच ओळखून टाटा कॅपिटल व सेंटर फॉर एनव्हायर्नमेंटल रिसर्च अँड एज्युकेशनच्या प्रयत्नातून ठाण्यात देशातलं पहिलंवहिलं अनोखं सूर्यअरण्य निर्माण करण्यात आलं आहे. नैसर्गिक ऊर्जास्रोतांचा वापर वाढावा आणि ऊर्जास्रोत पुनर्वापरात आणले जावेत ही जाणीव लोकांमध्ये पेरली जावी या हेतूने हे सूर्यअरण्य बनवण्यात आलं आहे. या सूर्यअरण्यात सहा सोलर ट्रिज म्हणजे सौरऊर्जा शोषून घेणारी झाडं उभारण्यात आली आहेत. या सौरझाडांच्या फांद्यांवर एकूण मिळून १४ सोलार पॅनेल्स बसवण्यात आली आहेत. ही झाडं व पानं धातूची आहेत.
पानांवर चर्चच्या काचांवर आढळणारं सुंदरसं रंगीत फिलिग्री डिझाइन केलेलं आहे. तसंच ‘वन्यजीव व दुर्मीळ वनस्पती वाचवा’ असे संदेश या झाडांना लावण्यात आले आहेत. ही झाडं पुनर्वापरात आणलेल्या साहित्यापासून बनवण्यात आली आहेत. या सौरझाडांसाठी इतर सौरऊर्जा प्रकल्पांपेक्षा तुलनेने कमी खर्च आला व यापुढेही त्यांच्या देखभालीचा खर्चही कमीच असेल, असं सिरीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. ही झाडं ७५० वॉट्सपर्यंत सौरऊर्जा शोषून घेऊ शकतात व पुढील वीस र्वष ही झाडं सौरऊर्जा देत राहतील. सध्या टाटा कॅपिटलच्या कॅम्पसमधील २८ लाइट्सना या सौरझाडांकडून सौरऊर्जा मिळणार आहे. या लाइट्समध्ये लेड बल्ब वापरण्यात आले आहेत. नेहमीचे बल्ब व सीएफल बल्बपेक्षा या लेड बल्बना कमी वीज लागते त्यामुळे या बागेतील लाइट्ससाठी हे बल्ब वापरण्यात आले आहेत. संध्याकाळ झाल्यावर हेच बल्ब सौरऊर्जेवर चालवण्यात येतात.
टाटा ग्रुपच्या सर्वच ऑफिसेससाठी ग्रीन ऑफिस ही संकल्पना राबवली जाते, जेणेकरून ऑफिसेस इको-फ्रेंडली असतील. म्हणूनच टाटा कॅपिटलच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे उद्योगसमूहाकडून सामाजिक बांधिलकीसाठी केल्या जाणा-या प्रयत्नांमधून सूर्यअरण्याची ही कल्पना सिरी (सेंटर फॉर एनव्हायर्नमेंटल रिसर्च अँड एज्युकेशन)च्या पुढय़ात मांडण्यात आली. ‘सिरी’ने ही कल्पना प्रत्यक्षात आणायचं ठरवलं. रिन्युएबल एनर्जी म्हणजे पुन्हा पुन्हा वापरता येणारे ऊर्जास्रोत हल्लीच्या महागाईच्या युगात व प्रदूषित वातावरणात खूप महत्त्वाचे ठरत आहेत. त्यादृष्टीनेच या सूर्यअरण्याचा विचार करण्यात आला होता. या सूर्यअरण्याच्या निर्मितीतून पर्यावरण जागृती, वन्यजीव संवर्धन, ऊर्जा व आर्थिक बचत, सामाजिक आरोग्याची जपणूक असे संदेश दिले आहेत. या प्रयत्नापासून देशातील इतर कॉर्पोरेट कंपन्या व इतर संस्थाही प्रेरणा घेतील, असा विश्वास टाटा ग्रुप व सिरी यांना वाटतो आहे, असं टाटा सन्सचे ब्रँड कस्टोडियन व चीफ एथिक्स ऑफिसर डॉ. मुकुंद राजन यांनी सांगितलं. २८ जानेवारीला हे सूर्यअरण्य पाहण्यासाठी खुलं करण्यात आलं.
ऊर्जाबचतीसाठी असे काही प्रयत्न करण्याची इतर संस्थांची इच्छा असल्यास त्यांनाही सिरीतर्फे मार्गदर्शन करण्यात येईल. ठाण्यातील पोखरण रोडवर टाटा कॅपिटलचं ऑफिस असलेल्या आय-थिंक टेक्नो कॅम्पसमधील ही आगळीवेगळी झाडं पाहण्यासाठी इथे विद्यार्थी व इतर अभ्यासक येत आहेत.