प्रसिद्ध नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून ‘स्लम थिएटर’ म्हणजे झोपडपट्टीतील मुलांची रंगभूमी साकार होत आहे. रंगभूमीवरचा या प्रकारचा हा आपल्या देशातीलच नव्हे तर जगातला पहिला प्रयोग आहे. ज्यांना कसलीच संधी मिळत नाहीत, अशा वंचित मुलांची रंगजाणीव समृद्ध करण्याबरोबर त्यांच्यातील नाटयगुणांचा शोध घेणे हा तिचा हेतू आहे.
रंगभूमी प्रवाही असते. तिच्यात अनेक प्रयोग होत असतात, सतत होत असतात. त्यात अनेक प्रवाह सहभागी होत असतात. अगदी हौशे-गवशे-नवशे सगळ्यांचा समावेश असतो. त्यातून अनेकांना आपले कलागुण गवसतात, तर अनेकांचे कलागुण बहरतात. रंगभूमीची ही जादू म्हणा किंवा ताकद, पण अनेकांच्या बाबतीत असंही घडतं की, त्यांच्यात अनेक कलागुण असतात, परंतु त्यांना रंगभूमीचा परीसस्पर्श कधीच होत नाही. रंगभूमीची ती अद्भुत दुनिया त्यांना कधीच अनुभवता येत नाही. त्यांचे कलागुण रंगमंचावरच्या प्रकाशात न येता, अंधारात दडून जातात.
झोपडपट्टीतील, अनाथाश्रमातील, रस्त्यावरील मुलांच्या बाबतीत आपले कलागुण घेऊन हे अंधारात लुप्त होणं बरेचदा घडतं. कारण त्यांना रंगभूमीच्या प्रकाशापर्यंत कसं पोहोचायचं, हेच ठाऊक नसतं. या वंचित मुलांना रंगभूमीवर पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे, प्रसिद्ध नाटककार रत्नाकर मतकरी यांनी. गेली पंचवीस र्वष ‘बालनाटय’ ही नाटयसंस्था चालवणा-या मतकरी यांनी ठाण्याच्या ‘समता विचार प्रसारक’ संस्थेच्या सहकार्याने ‘स्लम थिएटर’ची संकल्पना मांडली आहे. तिचं नाव जरी स्लम थिएटर असलं तरी तिच्यात केवळ झोपडपट्टीतील मुलांचा सहभाग नसेल, तर अनाथाश्रमातील, रस्त्यावरील मुलं या नाटयसंकल्पनेत भाग घेऊ शकतील. रंगभूमीवरचा या प्रकारचा हा आपल्या देशातीलच नव्हे तर जगातला पहिला प्रयोग आहे.
ही संकल्पना मतकरी यांची. आपल्याला ती सुचली कशी हे सांगताना मतकरी म्हणतात, ‘मला कल्पना सुचतात तेव्हा त्या अचानकच सुचतात. तशीच मला हीही कल्पना अचानकच सुचली, पण माझं असं असतं की, एकदा कल्पना सुचली की, त्याच्या सगळ्या उण्या-अधिक बाजूंचा विचार करतो. ही कल्पना सुचल्यावर दिवसभरात मी ती संपूर्णपणे कागदावर उतरवली. त्यात मी बजेटपर्यंत सगळ्या गोष्टींचा विचार केला. नंतर मी त्याचं इंग्रजी भाषांतर करून त्याच्या झेरॉक्स प्रती काही लोकांना दिल्या. त्यानंतर मला असं सुचलं की, नुसतं स्लम थिएटर असं म्हणण्यात अर्थ नाही. कारण मुंबईत कितीतरी स्लम आहेत, त्यामुळे आपण एखाद्या विशिष्ट परिसराची निवड करावी. म्हणून मी ठाणे निवडलं. या सगळ्याचं आयोजन करण्यासाठी कुणाची तरी मदत घेणं भाग होतं. मला आठवलं की, सध्या व्हीजेटीआय विभागप्रमुख असलेला संजय मंगला गोपाळ हा माझा मित्र उत्तम ऑर्गनायझर आहे. नर्मदा आंदोलनाचं काम तो आजही चांगल्या पद्धतीने करतोय. त्याची ‘एकलव्य’ नावाची संस्था आहे. गरीब मुलांना अभ्यासात मदत करणं, त्यांना पुस्तकं वगैरे देणं अशी कामं ती करते. त्याला यात सहभागी का करू नये, असं मला वाटलं. मी त्याला ही कल्पना सांगितली तेव्हा त्याला ती खूप आवडली. त्याने त्याच्या समता मंचची मदत द्यायची तयारी दाखवली. त्यानंतर आमची एक बैठक झाली. या प्रकारचं काम करणारे तिथले काही जण आणि पन्नासेक मुलं, ज्यात काही अगदीच लहान होती, तर काही कुमारवयीन होती, असे सगळे जमलो. त्यात या संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकलं.’
‘मुळात ज्यांना कसलीच संधी मिळत नाहीत, अशा मुलांसाठी हे आहे. शाळांमधून वगैरे अनेकदा नाटयस्पर्धा वगैरे होतात, परंतु त्यातही मुलांना क्वचितच आपल्याला व्यक्त करण्याची संधी मिळते. बहुतेकदा स्पर्धामध्ये बक्षीस मिळवण्यासाठी शाळा व्यावसायिक मदत घेऊन नाटक करतात. इथे आमची संकल्पना अशी आहे की, मुलांनी आपल्या अनुभवातून व्यक्त व्हायचं आहे. त्यांना आम्ही काही देणार नाही. त्यांचं त्यांनीच नाटक लिहायचं, बसवायचं, त्यांच्या समस्या, त्यांच्या घरातल्या समस्या, आजूबाजूच्या परिसरातील समस्या थोडक्यात त्यांचं जीवन ज्यातून प्रतिबिंबीत होईल, ते त्यांनी आपलं आपणच दाखवायचं. थोडक्यात त्यांना स्वत:ला शोधण्याची संधी मिळावी. म्हणजे ग्रूपमध्ये काम करताना त्यांच्यातील कुणाला लक्षात येईल की, आपल्याला चांगलं लिहिता येतं, कुणाच्या लक्षात येईल की, आपल्याला चांगला अभिनय करता येतो.’ मतकरी आपली संकल्पना आणखी स्पष्ट करत सांगतात.
मतकरींना बालनाटय रंगभूमीचा दांडगा अनुभव आहे. आपल्या ‘बालनाटय’ संस्थेसाठी गेल्या ५२ वर्षात त्यांनी अनेक नाटकं केलीत. अगदी झोपडपट्टीतही नाटकं केली आहेत. खोक्यातून नाटकाचं सामान घेऊन नाटक करणं किंवा रस्त्याच्या कडेला ट्रकवर नाटक सादर करणं असे अनेक प्रयोग ‘आनंदयात्रा’ या नावाने त्यांनी केले आहेत. त्यांनी बालमजुरीवरही एक नाटक केलं होतं. या नाटकाच्या वेळी ते प्रेक्षकांना असं आवाहन करत की, तुमच्या मुलाच्या वाढदिवसाच्या खर्चाइतके पैसे आम्हाला दिलेत तर आम्ही हे नाटक झोपडपट्टीतील अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचवू. या नाटयजाणीवेचंच पुढचं पाऊल म्हणजे स्लम थिएटर ही संकल्पना आहे, असं म्हणायला हरकत नाही.
ही कल्पना प्रत्यक्षात कशी येणार? त्याची रूपरेखा तयार झाली आहे. ठाण्यातील तेरा विभागांच्या महापालिका शाळांमधील मुलांचे गट तयार करण्यात येणार आहेत. महापालिका शाळांना आधारभूत धरण्यात आलं नसलं तरी सोय म्हणून त्यातील विद्यार्थ्यांचे गट तयार करण्यात आले आहेत. कारण हल्ली महापालिका शाळांमध्ये केवळ झोपडपट्टीतील मुलंच जातात, मध्यमवर्गीय मुला जात नाहीत, अशी परिस्थिती आहे, पण त्यामध्ये काही काटेकोर निकष वगैरे लावलेले नाहीत. म्हणजे सात ते चौदा वयर्वष असा मुलांचा गट ठरवण्यात आला असला तरी एखादा पंधरा वर्षाचा मुलगा आला तर त्यालाही सहभागी करून घेतलं जाईल. तसंच झोपडपट्टीतील मुलांची रंगभूमी असं म्हटलं असलं तरी एखादा अनाथाश्रमातला, रस्त्यावरचा मुलगा असला तरी त्याला घेतलं जाईल. यासाठी तेरा विभागांतील प्रत्येकी दोन याप्रमाणे पंचवीसेक गट तयार करण्यात येतील. या प्रत्येक गटात दहा मुलं असतील. मतकरी सांगतात, ‘या मुलांची तीन दिवस नाटकं होतील. त्याला स्पर्धा असं नाव आम्ही दिलेलं नाही, तर ‘आमचं नाटक, हमारा नाटक, नाटयजल्लोष’ अशी नावं दिलीत. प्राथमिक फेरीतून पाच नाटकं अंतिम फेरीसाठी निवडली जातील. त्यांना बक्षीसंही दिली जातील. त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन ही ब-यापैकी रकमेची बक्षीसं आम्ही देणार आहोत. मुलांना यातून असं वाटलं पाहिजे की, आपल्याला चांगली ट्रीटमेंट मिळतेय आणि आपणही कुणीतरी आहोत. फायनलमध्ये येणा-या नाटकांतून जी मुलं टॅलेंटेड असतील त्यांच्या टॅलंटचा वापर व्हावा, यासाठी त्यांची रंगभूमी-चित्रपटसृष्टीतील मंडळींकडे शिफारसही केली जाईल. थोडक्यात, या मुलांना स्वत:ची ओळख मिळावी आणि पुढल्या आयुष्यात त्यांनी काहीतरी करून दाखवावं, असा मुख्य विचार आहे. त्यातून पाच ते दहा मुलांच्या आयुष्याला तरी थोडंसं वळण मिळावं. म्हणूनच त्यांच्यातील टॅलंट शोधणं आणि त्यांनी स्वत:ला शोधणं या गोष्टींवर आम्ही भर दिला दिलाय.’
या पंचवीस ग्रुपमधल्या पाच-पाच ग्रुपना एकेक गाइड दिला जाईल. हे गाइड म्हणजे थिएटरचा थोडाफार अनुभव असलेली माणसं असतील. मुलांच्या कामात या गाइडनी लुडबूड करायची नाही, तर थोडीफार शिस्त लावण्यासाठी, तालीम कुणीतरी बघावी यासाठी, कुठे नाटक फार लांबतंय, कंटाळवाणं होतंय का, हे सगळं बघण्यासाठी कुणाची तरी गरज असते. ती गाइडनी पूर्ण करायची असते. गाइडना याच्या सूचना आधीच देण्यात येतील. थोडक्यात गाइड त्यांच्यातील टॅलंट कसं बाहेर येईल हे बघतील. ते मुलांना हे तू करू शकतोस, हे अधिक चांगलं कर वगैरे सूचना करून त्यांना प्रोत्साहन देतील व त्यांच्याकडून काम करून घेतील, पण त्यांना पॉलिश करणार नाहीत. मुलांचा जो अनुभव असेल, ओबडधोबडपणा असेल तो जसाच्या तसा येईल, हे ते बघतील. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर केवळ वरवरच्या गोष्टींच्या बाबतीत मुलांना ते मदत करतील. जेणेकरून त्यांच्या नाटयकृतींना आकार येण्याच्या दृष्टीने मदत होईल. म्हणजे एखादा प्रसंग लांबतोय का, कृत्रिम होतोय का, कंटाळवाणा होतोय का, असं गाइड सांगतील, परंतु मुलांना ते कुठलीही गोष्ट बसवून देणार नाहीत.
‘या नाटयजल्लोषाची बाद फेरी अरिना थिएटरमध्ये घेतली जाईल. अरिना म्हणजे प्रेक्षकांच्या मधोमध स्टेज. तिथे नाटक केल्याने मुलांना स्टेज वगैरेंचं दडपण येणार नाही. मात्र यात लाइटचा वापर होईल. कारण लाइटमुळे थिएटरचा एक्सक्लुझिव्ह एरिया अधोरेखित होत असतो. अंतिम फेरीत येणारी पाच नाटकं मोठया रंगमंचावर होतील. मुलांना असं वाटायला नको की, आपल्याला थिएटरचा अनुभव मिळाला नाही किंवा तिथलं वलय पाहता आलं नाही. ही मुलं वंचित आहे, हे लक्षात घेऊन त्यांना थोडासा तरी आनंद मिळावा, असा आमचा हेतू आहे. त्यातून त्यांना त्यांच्या आणि इतरांच्या समस्या कळतील. काही नाही तरी पंधरा मुलं एकत्र येऊन काहीतरी बसवताहेत, असं झालं तर त्यातून त्यांना एक वेगळा अनुभव मिळेल. त्यांचं एरवीचं आयुष्य खूप निरस असतं.’ मतकरी सांगतात.
या सगळ्यासाठी पैसे जमवणं वगैरे गोष्टींचं आव्हान आता पार पाडायचं आहे. या सगळ्या उपक्रमासाठी पाचेक लाखांचा खर्च येणार आहे. त्यामुळे आयोजक सध्या प्रायोजकांच्या शोधात आहेत. रोख रक्कमच नव्हे तर कुणी कपडे, शूज दिलं तरी त्याचं स्वागत होणार आहे. ही सगळी जमवाजमव करायला दोनेक महिने लागणार असल्याने डिसेंबपर्यंत हा ‘नाटयजल्लोष’ साकार होईल, असं दिसतंय.