‘म्हाडा’तर्फे गिरणी कामगारांच्या माहिती संकलन प्रकियेत जे कामगार सहभागी होऊ शकले नव्हते अशा कामगारांना हक्काच्या घरासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.
मुंबई – ‘म्हाडा’तर्फे गिरणी कामगारांच्या माहिती संकलन प्रकियेत जे कामगार सहभागी होऊ शकले नव्हते अशा कामगारांना हक्काच्या घरासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. ज्या कामगारांची माहिती संकलनात नोंद होऊ शकली नाही, अशा कामगारांना न्याय देत या कामगारांनाही घरे देण्याची मागणी होत आहे. ‘म्हाडा’कडून दुस-या टप्प्यात जी सोडत काढण्यात येईल ती नोंद झालेल्या १ लाख ४८ हजार कामगारांतून काढण्यात येईल. ज्या कामगारांनी अर्ज भरले नव्हते अशा कामगारांसाठी कालांतराने विचार केला जाईल, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सांगितले.
‘म्हाडा’तर्फे २०१०, २०११ साली कामगारांची माहिती संकलनाचे काम करण्यात आले होते. पण, ज्या कामगारांची नावे माहिती संकलनात नोंद होऊ शकली नाहीत अशा कामगारांचे ‘गिरणी कामगार कर्मचारी निवारा व कल्याणकारी संघा’तर्फे संघटन करण्यात आले आहे. केवळ माहिती न मिळाल्याने कामगार हक्काच्या घरापासून वंचित राहणे चुकीचे असल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे. कामगार संपानंतर उत्पन्नाचे साधन नसल्याने अनेक कामगारांनी गाव गाठले. पहिल्या टप्प्यातील सोडत जेव्हा काढण्यात येणार होती त्यावेळी म्हाडातर्फे माहिती संकलनाचे अर्ज काढण्यात आले. एकूण १ लाख ४८ हजार कामगारांची नोंद करण्यात आली.
२०१२साली ६ हजार ९२५ घरांसाठीची सोडत काढली गेली. म्हाडा व एमएमआरडीएतर्फे बांधल्या गेलेल्या एकूण १० हजार घरांची सोडत डिसेंबरमध्ये काढण्याचे मुख्यमंत्र्यांद्वारे जाहीर करण्यात आले. ही सोडत १ लाख ४८ हजार अर्जातून काढण्यात येणार आहे. मात्र ज्या कामगारांनी अर्ज भरले नव्हते अशा कामागारांचे काय, असा सवाल काही कामगारांनी केला आहे. १ लाख ४८ हजार अर्जाची छाननी प्रक्रिया सध्या सुरू आहे. दुस-या टप्प्यातील सोडत या अर्जातून काढली जाईल. ज्या कामगारांची नोंद झाली नव्हती अशा कामगारांचाही कालांतराने विचार केला जाणार असल्याचे वायकर यांनी सांगितले.