शेतक-यांचे प्रश्न घेऊन नागपूर विधान भवनावर मंगळवारी काँग्रेसने काढलेला मोर्चा अभूतपूर्व होता. राज्याच्या कानाकोप-यातून लोक आले होते.
शेतक-यांचे प्रश्न घेऊन नागपूर विधान भवनावर मंगळवारी काँग्रेसने काढलेला मोर्चा अभूतपूर्व होता. राज्याच्या कानाकोप-यातून लोक आले होते. आणले नव्हते. एरव्ही मोर्चा म्हटला की, लोक आणावे लागतात. या मोर्चाचे विशेष असे की, लोक स्वत:च्या पैशाने गाडया करून आले होते. अशोक चव्हाण किंवा कुण्या नेत्यासाठी इतके लोक आले नव्हते. या सरकारचा कारभार पाहून लोक संतापले आहेत. तो संताप त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या डोळयात एक खुन्नस दिसत होती. वर्ष-दीड वर्षापूर्वी हेच ते लोक होते ज्यांनी मोदींच्या शब्दावर विश्वास ठेवून भाजपाला मते टाकली होती. पण नरेंद्र मोदी व त्यांचा भाजपा ‘फेकू’ निघाला.
आपल्याशी दगा झाल्याचा राग लोकांना आहे शेतक-यांना आहे, महिलांना आहे व तरुणांना आहे. तो राग व्यक्त करण्यासाठी हे सारे खिशाला खार लावून इतके दूर व नंतर नंतर पायी चालत आले होते. श्रावण आत्राम नावाचा मोर्चातला एक म्हातारा दुर्गम गडचिरोलीतून आला होता. तो म्हणाला, ‘मी काँग्रेसचा नाही. पण मी आता मोदीसोबत नाही’, हे दाखवण्यासाठी इथे आलो. वर्षभरात तीन हजार शेतक-यांनी नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या विधवाही आल्या होत्या.
नंदा नावाची एक शेतकरी विधवा म्हणाली, ‘माझ्या नव-याला श्रद्धांजली वाहण्यासाठी मी इथे आले. लोकांच्या भावना किती तीव्र आहेत ते पाहा. ग्रामीण भागातले कार्यकत्रे मोठया संख्येने होते. ग्रामीण भाग हा काँग्रेसचा आत्मा होता. मध्यंतरी तो हरपला होता. ‘काँग्रेस संपलेली नाही’ हे या मोर्चाने दाखवून दिले. ‘सिंहासन खाली करो, जनता आयी है! हा या मोर्चाचा इशारा आहे.
मागील वर्षी अधिवेशनातही काँग्रेसने असाच मोर्चा आयोजित केला होता. पण त्याचा फज्जा उडाला. दोन हजार लोकही नव्हते. त्यावेळी भाजपा-शिवसेना युतीचे सरकार नुकतेच सत्तेत आले व काँग्रेसही पराभवातून सावरलेली नव्हती. तब्बल पंधरा वष्रे सत्तेत राहिल्याने आंदोलनाची काँग्रेसला सवय नव्हती. पण, हा मोर्चा पाहून काँग्रेसला मोर्चा काढता येत नाही, असे म्हणणारे तोंडघशी पडतील.
लोकांच्या मनात संताप होता, काँग्रेसच्या नेत्यांनी तो ‘कॅश’ केला इतकेच. गुजरातमध्ये काँग्रेसकडे मोठा नेता नाही. तरीही तिथल्या जिल्हा परिषद निवडणुका नुकत्याच काँग्रेसने जिंकल्या. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीतील यशामुळे काँग्रेसवाले तसेही ‘चार्ज’ झाले होते. अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हे पहिले मोठे आंदोलन होते.
मोर्चा फसला असता तर काँग्रेसला तर तो मोठा धक्का राहिला असता. हा मोर्चा कसा निघतो याकडे भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांचे बारीक लक्ष होते. भाजपालाही तो विरोधी पक्षात असताना असला तगडा मोर्चा काढता आला नव्हता. भाजपासाठी तर हा भूकंप आहे.
नरेंद्र मोदींचे सिंहासनही हादरले असेल. या मोर्च्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राला जाणवणार आहेत. निवडणुकांना आणखी चार वष्रे आहेत. पण भाजपचे काउंटडाउन सुरू झाले आहे. सरकारचे दिवस भरत चालले आहेत. या मोर्च्याने काँग्रेसला सूर गवसला. शेतकरीच हे सरकार उलथवतील.
दुष्काळ मोठा आहे. पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. पैसा एक वेळ आणता येईल. पण पाणी? दुष्काळाशी कसे लढावे, हेच भाजपाच्या नेत्यांना कळेनासे झाले आहे. राज्याची तिजोरी रिकामी आहे, दिल्लीहून पैसे आणणे जमले नाही. नुसता घोषणांचा पाऊस पाडणे सुरू आहे. कुणीही समाधानी नाही. मंगळवारी लहानसहान तब्बल १२ मोच्रे होते. धनगरांचा मोर्चा होता.
शिवसेनेचे मंत्री भाजपाच्या फजितीची गंमत पाहत आहे. आणखी चार महिन्याने स्फोटक वातावरण होईल. पुढा-यांना लोक गोटे मारतील. हे संकट कुण्या एका पक्षावर नाही. संपूर्ण राज्यावर आहे. त्यामुळे काँग्रेसलाही सोबत घेऊन मुकाबला करावा लागेल. पण युतीच्या नेत्यांना ते सुचत नाही. या संकटातही ते राजकारण करत आहेत. त्यामुळे संघर्ष आहे. अधिवेशनाच्या दुस-या दिवशी दोन्ही काँग्रेसने कामकाज चालू दिले नाही व पुढेही चालू देतील, असे वाटत नाही. नागपूर अधिवेशन गोंधळातच बुडण्याची भीती तयार होत आहे.