सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन राज्यभरात हेल्मेट सक्ती सुरू केल्यानंतरही मुंबईकर मात्र या निर्णयाकडे कानाडोळा करताना दिसत आहेत.
मुंबई – सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन राज्यभरात हेल्मेट सक्ती सुरू केल्यानंतरही मुंबईकर मात्र या निर्णयाकडे कानाडोळा करताना दिसत आहेत. दुचाकी वाहन चालकासोबत मागे बसून प्रवास करणा-या (पिलियन रायडर) व्यक्तीलाही हेल्मेट सक्तीच्या घेतलेल्या निर्णयानंतर या संख्येत घट होण्याची शक्यता होती. मात्र, वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या आकडय़ांचा विचार करता सुरक्षेकरता घेतलेल्या या नवीन निर्णयाला मुंबईकरांनी केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे.
वाहतूक पोलीस आणि आरटीओने मुंबईतील महत्त्वाचे रस्ते आणि चौका-चौकांत केलेल्या विशेष तपासणीत तब्बल २ लाख ४३ हजार ४०५ दुचाकीस्वारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. १६ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान मुंबईतील आरटीओच्या विविध विभागात ही मोहीम राबवली होती. विशेष म्हणजे राज्यभरात हेल्मेट सक्ती लागू झाल्यानंतरही विनाहल्मेट प्रवास करणा-या दुचाकीस्वारांची संख्या कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे चालकांच्या हिताच्या दृष्टीने घेतलेल्या या निर्णयानंतरही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईच्या रस्त्यांवर दररोज शेकडो नवीन वहानांची भर पडत असते. त्यात दुचाकी गाडय़ांचेही प्रमाण अधिक आहे. आपल्या दारात किमान दुचाकी गाडी तरी हवी, असा समज आता प्रत्येकाच्या मनात घर करू लागला आहे. मात्र वाढत्या वाहनांमुळे प्रदूषणाचा प्रश्न निर्माण तर होत आहे. मात्र त्याहीपेक्षा म्हणजे रस्ते अपघातात गाडीचालकांना जीव गमवावा लागत असून अपघातांमध्ये मृत्यू होण्यामध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे.
दुचाकीस्वाराचा अपघातापासून बचाव करण्यासाठी हेल्मेट सक्तीचा निर्णय नव्याने पुन्हा एकदा घेण्यात आला. मात्र आरटीआेच्या हेल्मेट सक्तीला दुचाकीस्वारांकडून विरोध होत आहे. आरटीआेने हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला हा कोणासाठी यापेक्षी हेल्मेटमुळे आपला जीव वाचू शकतो, याचा विचार दुचाकी गाडीधारकांनी केला पाहिजे, तरच भविष्यात होणा-या अपघातातून आपला जीव वाचू शकतो, हे विसरुन चालणार नाही, हेही तितकेच खरे.