मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे पंधरा दिवसांत बुजवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी दिले.
मुंबई – मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे पंधरा दिवसांत बुजवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी दिले. गणेशोत्सव काळात कोकणात जाणा-यांना वेळेत पोहोचता यावे, यासाठी सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, पोलिस व जिल्हा प्रशासन आदी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे, आदेशही त्यांनी दिले.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामासंबंधी आढावा बैठक मंगळवारी विधानभवनात भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला उद्योगमंत्री नारायण राणे, जलसंपदामंत्री सुनील तटकरे, नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत आदी उपस्थित होते. या वेळी उद्योगमंत्री राणे यांनी महामार्गावर नागरिकांची गैरसोय होऊ नये, तसेच वाहतूक सुरळीत राहण्यासाठी खड्डे बुजवण्याचे काम गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावे, असे आदेश दिले.
कोकणवासीयांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासंदर्भात केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे सांगून, सार्वजनिक बांधकाममंत्री भुजबळ पुढे म्हणाले की, ‘दरवर्षी गणेशोत्सव काळात या महामार्गावरून हजारो नागरिक कोकणात जात असतात.
या काळात वाहतुकीचे नियोजन करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी घ्यावी. तसेच या महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे काम हाती घ्यावे व त्याबाबतचा अहवाल पंधरा दिवसांत सादर करावा. तसेच ही कामे करत असताना या भागातील लोकप्रतिनिधींच्या सूचनाही अंमलात आणाव्यात.
नागरिकांची गैरसोय होता कामा नये, खड्डे बुजवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. या महार्गावरून प्रवास करणा-या नागरिकांच्या सोयीसाठी रात्री उशिरापर्यंत उपहारगृहे सुरू ठेवण्यासंबंधीचे आदेश विनाविलंब काढण्यात यावेत. तसेच या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यासंबंधी आदेश काढून त्याला जाहीर प्रसिद्धी द्यावी, असे आदेशही भुजबळ यांनी या वेळी दिले.
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवण्यात यावेत, यासाठी उद्योगमंत्री नारायण राणे यांनी छगन भुजबळ यांना नुकतेच पत्र दिले होते. मंगळवारी आयोजित बैठकीला आमदार जयंत पाटील, मीनाक्षी पाटील, सुभाष देसाई, डॉ. दीपक सावंत, विवेक पाटील, भरत गोगावले, धैर्यशील पाटील, रवींद्र वायकर, योगेश सागर, दीपक केसरकर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्यामलकुमार मुखर्जी, तसेच रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, पोलिस व वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.