२५ वर्षाची मैत्री ज्यांनी तोडली, ते पक्ष जनतेचे कधीच होऊ शकत नाहीत, अशा शब्दांत दहिसर विधानसभा मतदारसंघातल्या काँग्रेसच्या उमेदवार शीतल म्हात्रे यांनी भाजप व शिवसेनेला लगावला आहे.
मुंबई – सत्तेच्या लालसेपोटी आणि मुख्यमंत्रीपदासाठी २५ वर्षाची मैत्री ज्यांनी तोडली, ते पक्ष जनतेचे कधीच होऊ शकत नाहीत, अशा शब्दांत दहिसर विधानसभा मतदारसंघातल्या काँग्रेसच्या उमेदवार शीतल म्हात्रे यांनी भाजप व शिवसेनेला लगावला आहे.
गेली अनेक वर्षे दहिसर विभागात शिवसेना, भाजप व मनसेचे आमदार, नगरसेवक तसेच महापौर आहेत. मात्र दहिसरकरांना अभिमान वाटावा, असे कोणतेच काम या एकाही पक्षाने केले नसल्याने येणा-या निवडणुकीत मतदार काँग्रेसलाच मतदान करणार, असा विश्वास म्हात्रे यांनी ‘प्रहार’शी बोलताना व्यक्त केला.
देशात काँग्रेसचे स्वत:चे अस्तित्व आहे. देशात व राज्यात काँग्रेसने विकासकामे केली आहेत. त्याचबरोबर पक्षाकडे मजबूत संघटनात्मक बळ असल्याने गेली तीन वर्षे जनतेने मला विश्वासाने नगरसेवक म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे युती तुटली किंवा राहिली, याचा काँग्रेसवर काहीच फरक पडत नसल्याचे मत शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केले.
देशात मोदी लाट वगैरे काहीही नाही. या सगळ्या हवेतील गोष्टी आहेत. जर असे असते तर उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार निवडून आले नसते. पक्ष हा नेहमीच व्यक्तीपेक्षा मोठा असतो. हा नियम काँग्रेस नेहमीच पाळत आला आहे. काँग्रेसने केलेला विकास हाच आमचा प्रचाराचा मुख्य मुद्दा असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आपल्याला आव्हान देऊ शकेल, असा एकही प्रतिस्पर्धी उमेदवार नाही, असा दावाही म्हात्रे यांनी केला.
दहिसर मतदारसंघातून शीतल म्हात्रे, राष्ट्रवादीचे हरीष शेट्टी, शिवसेनेचे विनोद घोसाळकर, भाजपच्या मनीषा चौधरी आणि मनसेच्या शुभा राऊळ निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात सध्या विनोद घोसाळकर आणि त्यांच्या मुलाने नगसेविका शीतल म्हात्रे यांना धमकावल्याचे आरोप प्रकरण चांगलेच गाजत आहे.
घोसाळकरांविरुद्ध कारवाई न केल्याने राऊळ व चौधरी नाराज होत्या. त्यात उमेदवारी न मिळाल्याने राऊळ यांनी मनसेचा झेंडा हाती घेतल्याने दहिसर मतदारसंघात तीनही उमेदवार घोसाळकरांना हरवण्यासाठी एकत्र येणार असल्याचे समजते.