मराठीत कादंबरीवर आधारित दोन मोठे चित्रपट लागोपाठ येत आहेत, असा एक चांगला योगायोग सध्या जुळून आलाय. त्यातला एक चित्रपट काहीसा व्यावसायिक तर दुसरा कलात्मक तरीही प्रभावी. यातला ‘दुनियादारी’ हा सुहास शिरवळकरांच्या कादंबरीवरील चित्रपट या आधीच प्रदर्शित झाला आहे.
मराठीत कादंबरीवर आधारित दोन मोठे चित्रपट लागोपाठ येत आहेत, असा एक चांगला योगायोग सध्या जुळून आलाय. त्यातला एक चित्रपट काहीसा व्यावसायिक तर दुसरा कलात्मक तरीही प्रभावी. यातला ‘दुनियादारी’ हा सुहास शिरवळकरांच्या कादंबरीवरील चित्रपट या आधीच प्रदर्शित झाला आहे, तर या शुक्रवारी ‘७२ मैल – एक प्रवास’ हा अशोक व्हटकर यांच्या कादंबरीवरील चित्रपट प्रदर्शित झालाय. या चित्रपटाला आतापर्यंत मिळत असलेला प्रतिसाद पाहता आशयघन मराठी चित्रपटांची वाट हा चित्रपट चोखाळत असल्याचं दिसून येतंय.
या चित्रपटाची निर्मिती ही हिंदीतला आघाडीचा अभिनेता अक्षय कुमार आणि करमणूक जगतातील एक नावाजलेलं व्यक्तिमत्त्व अश्विनी यार्डी यांनी केली आहे. हा चित्रपट त्यांच्याही दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा चित्रपट ठरावा. या चित्रपटाने आपल्या प्रसिद्धीसाठी खास इंग्लंडमधील ‘स्टर्लिग मीडिया’ या कंपनीची केलेली नियुक्तीही अशीच चर्चेचा विषय ठरली आहे. या चित्रपटाला ‘लंडन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये मिळालेलं यश पाहता त्याची पुनरावृत्ती भारतातही होण्यास काही हरकत नसावी.
अशोक व्हटकर यांची ही कादंबरी त्यांच्या स्वत:च्या जीवनावर आधारित आहे. ही कादंबरी आली तेव्हा तिच्यातली आशयघनता व अनोख्या शैलीने वाचकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली होती. ‘अनेक दिवसांपासून या कादंबरीवर चित्रपट करायचा माझा मानस होता, मात्र तशी संधी मिळत नव्हती. ‘जोगवा’ या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आमची एक खास टीम तयार झाली. त्यातूनच या चित्रपटाची प्रेरणा मिळाली,’ असं चित्रपट दिग्दर्शक राजीव पाटील सांगतात. या चित्रपटाचे संवाद व गीतलेखन संजय कृष्णा पाटील यांचं आहे. या चित्रपटातली प्रमुख भूमिका स्मिता तांबेने केली आहे.
कादंबरीवरचे चित्रपट एक आव्हान
‘जोगवा’ या चित्रपटाच्या यशानंतर कादंबरीवर आधारीत चित्रपट काढण्यात माझी ‘मास्टरी’ झाली आहे, असं लोक म्हणतात. ‘७२ मैल’ ही कादंबरी मी पहिल्यांदा वाचली तेव्हापासूनच या कादंबरीत चित्रपट पाहात होतो. त्यावेळी मी तसा प्रयत्नही केला. ‘जोगवा’च्या राष्ट्रीय पुरस्कारानंतर माझा आत्मविश्वास दुणावला आणि या विषयाकडे वळलो. मला एक आवर्जुन सांगावसं वाटतं की निर्माता म्हणून अक्षय कुमारनं जो विश्वास दाखवला तो फार महत्त्वपूर्ण ठरला.
ही कथा ऐकल्यानंतर त्याला ती इतकी पटली की, मी हा चित्रपट करणारच असा त्यानेच निर्धार केला. त्यानंतर या चित्रपटाच्या प्रत्येक टप्प्यावर तो कायम आमच्या पाठिशी उभा राहिला. चित्रपट यशस्वी करण्यासाठी जे काही करायला हवं ते सारं करण्याची तयारी त्याने आणि अश्विनी यार्डी यांनी केली.
अक्षयसारखा कलाकार आमच्या पाठिशी उभा राहिल्यामुळे या चित्रपटाची निर्मिती अधिक सोपी झाली. या चित्रपटाची निर्मिती हे एक आव्हानच होतं. या चित्रपटातल्या माझ्या सगळ्या कलाकारांचा व इतर सर्व माझ्या तंत्रज्ञांचाही आभारी आहे. सेटवर?तूम्ही काम करता तेव्हा तुमच्यावर सगळयांचा विश्वास असावा लागतो. तो या माझ्या सा-या टीमनं दिला. या चित्रपटानं एक आव्हान पेलल्याचं समाधान दिलं आहे. मला असा विश्वास आहे की आता प्रेक्षकही या चित्रपटाला तितक्याचं उत्साहानं स्वीकारतील. – राजीव पाटील
माझी एक महत्त्वाची भूमिका
माझ्याकडे हा चित्रपट आला, तेव्हा अगदी सिंड्रेलाची भूमिका मिळाल्याचा आनंद मला झाला होता, मात्र त्यानंतर या चित्रपटाच्या चित्रीकरणात आणि ही भूमिका कोण करणार हे निश्चित होण्यात बराच काळ गेला. दरम्यान माझ्यातला उत्साहही संपला होता. हे एका अर्थानं चांगलंच झालं होतं. मी या भूमिकेचा अगदी सखोल विचार करू शकले. तिच्या व्यक्तिमत्त्वातले सगळे कंगोरे समजून घेण्यासाठी हा काळ उपयुक्त ठरला. या भूमिकेनं मला अक्षरश – झपाटलं होतं, असं म्हणायला हरकत नाही.
‘७२ मैल एक प्रवास’ मधली राधाक्का ही एका शब्दांत सांगायचं तर एक अशिक्षित तत्त्वज्ञानी आहे. तिच्या जीवनाचं तत्त्वज्ञान तिनं कुठल्या विद्यापीठात शिक्षण घेऊन मिळवलेलं नाही. ते तिच्या अनुभवातून आलं आहे. तिनं जे जीवन भोगलं आहे, त्यातून तिची जी जीवनाविषयीची जाणीव निर्माण झाली आहे, ती अगदी साध्या शब्दांत व्यक्त करण्याचं सामर्थ्य तिच्या ठायी आहे. यामुळे ती जे वाक्य बोलते, ते समोरच्या व्यक्तीला विचार करायला लावणारं आहे. तिची भूमिका करताना तिला समजून घेताना हे सारं माझ्या अभिनयातून मला व्यक्त व्हायला मिळालं, हे मी माझं भाग्यचं समजते. – स्मिता तांबे
मेकिंगवर पुस्तक
या चित्रपटाच्या निर्मितीप्रक्रियेवर ‘७२ मैल एक प्रवास’ हे पुस्तक तयार करण्यात आलं असून त्याचं प्रकाशन नाना पाटेकर यांनी केलंय. हा चित्रपट पाहूनच मी या प्रकाशन सोहळ्याला आल्याचं या वेळी नाना म्हणाले. या चित्रपटाचं त्याने प्रचंड कौतुक केलं. या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळय़ा प्रकारचा चित्रपट पाहिल्याचं समाधान आपल्याला मिळेल, असे गौरवोद्गारही या वेळी नाना पाटेकर यांनी काढले.