टी-२० विश्वचषक स्पर्धेत धर्मशाळा येथे होणा-या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी विरोध केला आहे.
नवी दिल्ली- टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत पाकिस्तान दरम्यान होणारा सामना हिमाचल प्रदेशमधल्या धर्मशाळा येथे १९ मार्च रोजी आयोजित केला आहे. मात्र, या सामन्याला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी सुरक्षा व्यवस्थेचे कारण देत विरोध केला आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्रही लिहिले असून हा सामना रद्द करण्याची मागणी केली आहे.
टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार भारत पाकिस्तान यांच्यातील सामना धर्मशाळा येथे खेळला जाणार आहे. मात्र, हा सामना येथे खेळवला जाऊ नये, असे वीरभद्र सिंह यांनी पत्राद्वारे गृहमंत्र्यांना सांगितले असून राज्य सरकारतर्फे सुरक्षा पुरवण्यास असमर्थता दर्शवली आहे.
मुख्यमंत्र्यांनी राजनाथ सिंह यांना लिहिलेल्या पत्रामध्ये असे म्हटले आहे की, ‘हिमाचल प्रदेशमधील अनेक जवान हे पाकिस्तान विरोधात लढत असतांना शहीद झाले आहेत. त्यामुळे या शहीदांचा सन्मान राखण्याकरता करता असे सामने येथे घेतले जाऊ नयेत.’
मात्र, बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी यावर बोलतांना सांगितले की, टी-२० सामन्याचे वेळापत्रक एक वर्षा आधी आणि त्यासाठीची ठिकाणे सहा महिने आधीच ठरले होते. त्यावेळी त्यांना काहीच अडचण नव्हती आणि आता अचानक असे बोलणे चुकीचे आहे. आता असे मत व्यक्त करून या मुद्द्यावरून राजकारण खेळू नका, असेही ते म्हणाले.
एक वर्ष आधीच या सगळ्या सामन्यांचे नियोजन झालेले असल्यामुळे ऐनवेळी त्यात असा बदल करता येणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. यामुळे धर्मशाळा येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.