‘रात्रीस खेळ चाले’विरोधात पोलीस ठाण्यात तक्राराची बातमी ताजी असतानाच बुधवारी मालिका बंद करण्यासाठी मुंबईतील झी मराठीच्या कार्यालयाबाहेर सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले.
मुंबई – ‘झी मराठी’ वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रात्री साडेदहा वाजता प्रसारित होणा-या ऐकिव आणि काल्पनिक गोष्टींवर आधारित ‘रात्रीस खेळ चाले..’ ही मालिका सध्या अडचणीच्या भोव-यात सापडली आहे.
या मालिकेविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात तक्राराची बातमी ताजी असतानाच बुधवारी मालिका बंद करण्यासाठी मुंबईतील झी मराठीच्या कार्यालयाबाहेर सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले.
कोकणात आजही भुताखेतांच्या गोष्टी चवीचवीने सांगितल्या जातात. त्या समज-गैरसमजातून रचल्या गेलेल्या असतात; मात्र त्यांना कोणताही आधार नसतो. अशाच काहीशा ऐकिव आणि काल्पनिक गोष्टींवर आधारित ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित करण्यात येत आहे.
या मालिकेची कथा-पटकथा संतोष अयाचित आणि आशुतोष पराडकर यांची असून संवाद प्रल्हाद कुडतरकर यांचे आहेत.