शेतक-यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या संघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्याची सुरुवात शनिवारी सिंदखेडराजा येथील राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी जिजाऊंना अभिवादन करून करण्यात आली.
मुंबई- शेतक-यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या संघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्याची सुरुवात शनिवारी सिंदखेडराजा येथील राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी जिजाऊंना अभिवादन करून करण्यात आली. ‘जोपर्यंत महाराष्ट्रातील शेतक-यांचा सातबारा पूर्णपणे कोरा होत नाही, तोपर्यंत सरकार विरोधातील हा संघर्ष असाच चालू ठेवण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते आमदार अजित पवार यांनी व्यक्त केला.
सिंदखेडराजा येथे झालेल्या जाहीर सभेत अजित पवार बोलत होते. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात शेतक-यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आम्ही जोरदारपणे लावून धरला, परंतु सरकारने बहुमताच्या बळावर आमच्या १९ आमदारांचे निलंबन करून विरोधी पक्षांची मुस्कटदाबी केली.
त्यामुळे अखेर आम्ही कर्जमाफीचा हा लढा जनतेच्या साक्षीने लढण्याचे ठरवून सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊन ‘चंद्रपूर ते पनवेल’ अशी संघर्ष यात्रा काढली. आज सिंदखेडा राजा येथे जिजांऊ जन्मस्थळापासून दुस-या संघर्ष यात्रेची सुरुवात होत असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अवघ्या १५ दिवसांत ३६ हजार कोटींची कर्जमाफी दिली. मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडीच वर्षात कर्जमाफी का देऊ शकले नाहीत. कर्जाच्या ओझ्याखाली हजारो शेतकरी आत्महत्या करीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र योग्य वेळी कर्जमाफी देऊ असे सांगत आहेत. अजून किती शेतक-यांनी आत्महत्या केल्या म्हणजे हे सरकार कर्जमाफी करणार आहे, असा सवाल त्यांनी सरकारला केला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या सरकारला जयंती व पुण्यतिथीमधील फरकही कळत नाही. शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोल बडविण्याचा नालायकपणा या सरकारने केला असून राज्यातील शिवप्रेमी जनता त्यांचा ढोल वाजविल्या शिवाय राहणार नाही अशा शब्दात त्यांनी सत्ताधा-यांवर शाब्दिक हल्ला चढवला.
लातूर जिल्ह्यातील शीतल वायाळ या २१ वर्षीय मुलीने आपल्या लग्नाचा खर्च वडिलांना परवडणार नाही म्हणून आपली जीवनयात्रा संपवली या घटनेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले कोपर्डीच्या दुदैर्वी घटनेनंतर रस्त्यावर उतरलेल्या जनतेने आता पुन्हा एकदा या मुलींला व राज्यातील शेतक-यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घ्यायला हवी.
शेतक-यांमध्ये क्रांती घडविण्यासाठी आम्ही संघर्ष यात्रेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलो आहोत. शेतक-यांमध्ये क्रांती घडल्याशिवाय शेतक-यांच्या हिताचा विचार हे सरकार करणार नाही असे अजित पवार म्हणाले.
यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरुन भाजपा- शिवसेना सरकारवर टीकेचे आसूड ओढले. यावेळी ते म्हणाले राज्यात शेतकरी आत्महत्या होत असताना राज्याचे मुख्यमंत्री मात्र आम्ही युपी मॉडेलचा अभ्यास करीत असल्याचे सांगत आतहे. मागून आलेल्या युपीच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तरप्रदेशमधील शेतक-यांची कर्जमाफी करुन दाखवली मात्र आपले मुख्यमंत्री हे अजून युपी मॉडेलचाच अभ्यास करीत आहेत.
सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले सत्तेत सहभागी शिवसेनेचे नेते विनोदी कलाकारांच्या भूमिकेत असून त्यांनी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाला देखील मागे टाकल्याची टीका विखे-पाटील यांनी केली.
या सभेत सिंदखेडाराजा शहराचे नगराध्यक्ष नाझीर काझी, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पाटीर्चे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, आ. राहूल बोंद्रे , समाजवादी पाटीर्चे अध्यक्ष अबु आझमी यांचीही भाषणे झाली.