भारताच्या अंदमान आणि निकोबार बेटांवर रेल्वेसेवा सुरू करण्याची तयारी भारतीय रेल्वे विभागाने केली आहे.
नवी दिल्ली- भारताच्या अंदमान आणि निकोबार बेटांवर रेल्वेसेवा सुरू करण्याची तयारी भारतीय रेल्वे विभागाने केली आहे. यासाठी येथे सुमारे २४० कि. मी. लांबीचा रेल्वेमार्ग उभारण्यात येणार असून पोर्ट ब्लेयर आणि दिगलीपूर या दोन प्रमुख शहरांना रेल्वेने जोडण्यात येणार आहे. त्यामुळे अंदमान-निकोबार बेटांवरील प्रवास जलद होणार आहे.
या प्रकल्पाला रेल्वे विभागाच्या वतीने लवकरच मान्यता देण्यात येणार असून त्याचे काम युरू केले जाणार आहे. सद्यस्थितीत पोर्ट ब्लेयर आणि दिगलीपूर या दोन प्रमुख शहरांमध्ये केवळ बस सेवा आणि जहाज सेवा सुरू आहे. बसने या दोन शहरांमधील अंतर १४ तासांचे, तर जहाजाने २४ तासांचे आहे. त्यामुळे येथे रेल्वे उपलब्ध झाल्यास हा प्रवास किमान ६ ते ७ तासांवर आणता येणार आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे २५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा रेल्वेमार्ग सुरू झाल्यास भारतीय रेल्वेच्या शिरपेचात आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल मानाचा तुरा खोवला जाणार आहे. यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये आव्हानात्मक परिस्थितीत कटरा रेल्वे स्थानकापर्यंत भारतीय रेल्वेने आपले जाळे उभारले होते.
आता अंदमान निकोबारमध्ये रेल्वेसेवा सुरू झाल्यास स्थानिकांसह पर्यटकांनाही याचा फायदा होणार आहे. सध्या वर्षाला ४.५ लाख पर्यटक अंदमान निकोबार बेटांना भेट देतात. ही संख्या रेल्वेसेवा सुरू झाल्यास निश्चितच वाढू शकणार आहे.