प्रवाशांना योग्य त्या सुविधा देणे व इच्छीतस्थळी वेळेत पोहोचवणे रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून विशेषकरून मध्य रेल्वे मार्गावर रुळांना तडा जाणे, पेंटोग्राफ तुटणे, ओव्हरहेड वायर तुटणे, गाडी घसरणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे प्रवाशांना सुविधा मिळणे तर सोडाच, प्रवास करताना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागतो.
प्रवाशांना योग्य त्या सुविधा देणे व इच्छीतस्थळी वेळेत पोहोचवणे रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून विशेषकरून मध्य रेल्वे मार्गावर रुळांना तडा जाणे, पेंटोग्राफ तुटणे, ओव्हरहेड वायर तुटणे, गाडी घसरणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे प्रवाशांना सुविधा मिळणे तर सोडाच, प्रवास करताना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागतो. प्रत्येकाच्या सहनशीलतेची सीमा असते, रेल्वेच्या ढिसाळ कारभाराला कधीपर्यंत बळी पडणार हा विचार केल्यानंतर एक वर्षापूर्वी दिवा स्थानकात प्रवाशांचा उद्रेक आणि शुक्रवारी बदलापूर स्थानकात प्रवासी अनावर झाला आणि रेल रोकोचा पर्याय निवडला.
विशेषकरून मध्य रेल्वेचा ढिसाळ कारभार असाच सुरू राहिला, तर भविष्यात कधीही उद्रेक होऊ शकतो. प्रवाशांच्या उद्रेकास रेल्वे प्रशासनाचा मनमानी व ढिसाळ कारभार जबाबदार आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
मुंबईची जीवनवाहिनी म्हणून मुंबई उपनगरीय रेल्वेची जगभरात ऑळख आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेने दररोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या तिजोरी वर्षाला कोटय़वधी रुपये जमा होतात. मात्र महसुलाच्या तुलनेत मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासी आजही सुविधांपासून वंचितच आहे.
वेळेत गाडी न येणे, तिकीट व पास काढण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहणे, या गोष्टींची सवय प्रवाशांच्या अंगवळणी पडली आहे. मात्र मध्य रेल्वे प्रशासनाच्या सावळ्यागोंधळामुळे ऑव्हरहेड वायर तुटणे, पेंटोग्राफ तुटणे, गाडी रुळावरून घसरणे, रुळाला तडा जाणे असे प्रकार सातत्याने घडू लागले आहेत. प्रामाणिकपणे तिकीट अथवा पास काढून जाणारे प्रवासी मध्य रेल्वेच्या सावळ्यागोंधळाचा कधीपर्यंत सामना करणार, हे न सुटणारे कोडे आहे.
प्रवाशांना सुविधा देण्यासाठी दर रविवारी मेगाब्लॉकच्या नावाखाली दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते. अगदी सहा ते सात तास काम चालते. मात्र आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारीच प्रवाशांना रेल्वेच्या ढिसाळ कारभाराला सामोरे जावे लागते, हे प्रवाशांचे नशीबच म्हणावे लागेल.
उपनगरीय प्रवाशांना सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ठाणे ते सीएसटी एसी-डीसी विद्युत प्रकल्प, फलाटांची उंची, गाडय़ांची संख्या वाढवणे, असे विविध प्रकल्प हाती घेतले. परंतु इच्छाशक्ती व मनमानी कारभारामुळे आजही एकही प्रकल्प मार्गी लागलेला नाही. मात्र वर्षातून दोन वेळा तिकीट दरवाढ करीत प्रवाशांचे कंबरडे मोडण्याची संधी प्रशासनाने सोडलेली नाही, हेही तितकेच खरे.
घाटकोपर स्थानकात झालेल्या अपघातात मोनिका मोरेला आपले दोन्ही हात गमावण्याची वेळ आली आणि त्यानंतर रेल्वेच्या ढिसाळ कारभाराची ऑरड सुरू झाली. रेल्वे प्रशासनानेही प्रवाशांच्या प्रति सहानभूती दाखवत सुविधा देण्याचा नेहमीप्रमाणे बनाव केला. मात्र प्रवासी थंड झाल्याचे पाहता रेल्वे प्रशासनाचा कारभार ये रे माझ्या मागल्याप्रमाणे पुन्हा एकदा सुरू झाला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
मुंबई उपनगरीय रेल्वेकडे केंद्रीय रेल्वे बोर्ड दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिवसेना-भाजपाकडून यापूर्वी अनेक वेळा करण्यात येत होता. परंतु आता प्रत्यक्षात राज्यात व केंद्रात भाजपाची सरकार असून विशेष म्हणजे केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे मुंबई महाराष्ट्रातीलच आहे. त्यामुळे मुंबई उपनगरीय प्रवाशांना न्याय मिळेल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्षात मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांवर प्रभूची कृपादृष्टी झालीच नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. मात्र भविष्यात मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासी प्रभू भरोसे अशी म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आल्यास प्रवाशांचे दुर्भाग्य म्हणावे लागेल, यात दुमत नाही.
मुंबईतील २० उपनगरीय स्थानकांचा कायापालट करण्यासाठी तब्बल दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करणा-या मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाने काही महत्त्वाचे प्रकल्प मात्र बासनात गुंडाळले आहेत. या महत्त्वाच्या प्रकल्पांना रेल्वे बोर्डाने मदतीचा हात दिला असता, तर मुंबईकरांचा रेल्वे प्रवास आणखी सुखाचा होण्याची शक्यता होती. मात्र काही हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या मोठय़ा प्रकल्पांबाबत विचार करणा-या रेल्वे बोर्डाने या तुलनेने छोटय़ा आणि तरीही परिणामकारक प्रकल्पांकडे पाठ फिरवली आहे. त्याउलट स्थानकांच्या सुशोभीकरणावर खर्च करण्याची गरज नसताना तिथे सढळ हस्ते पैसे खर्च करण्याची तरतूद केली आहे.
स्थानकांच्या कायापालटासाठी रेल्वे बोर्ड आणि एमआरव्हीसी अपर डेक उभारून तेथे तिकीट विक्री केंद्र, रिक्षा-टॅक्सी स्टँड अशा योजना आखत आहे. त्याचप्रमाणे स्थानकांवर सरकते जिने, उदवाहक आदी सुविधा देण्यात येत आहेत. मात्र या सुविधांपेक्षा सुखकारक प्रवासाची गरज असल्याने प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याचे प्रवाशांकडून बोलले जात आहे.