एखादी संवेदनशील व्यक्ती काळाच्या ओघात बदलणा-या गोष्टी पाहून जेव्हा पडद्यावर मांडू पाहते तेव्हा प्रेक्षकांना नक्कीच एक चांगली कलाकृती पाहण्यास मिळते. निर्माते आणि लेखक देवेन कापडनीस यांना त्यांच्या निरीक्षणाचा आणि संवेदनशील असल्याचा फायदा ‘बरड’ चित्रपट बनवताना झाला.
नाशिक ते मुंबई असा प्रवास करताना त्यांना काही वर्षापूर्वी हिरवीगार शेतजमीन दिसायची. अचानक त्या जमिनी ओसाड होत गेल्या. त्याला कुंपण घातलं गेलं. त्या बंदिस्त झाल्या. त्यांचं शेतजमीन म्हणून अस्तित्वच नाकारलं गेलं. पण त्या ‘बरड’ जमिनी बनून राहिल्या. मग कुणीतरी कुठेतरी अफवा उठवतं अमुक विकास होणार आहे, तमुक विकास होणार आहे. किंवा बाजूच्या ठिकाणी अमुक इंडस्ट्री उभी राहणार आहे. अचानक त्या जमिनींना सोन्याचा भाव येतो.
शेतकरी पैशाच्या लोभापायी जमीन विकतात. शेतांच्या जागी सिमेंट, काँक्रीटचा रुक्षपणा दिसायला लागतो. हेच वास्तव निर्माते देवेन कापडणीस यांनी ‘बरड’ चित्रपटातून मांडलं. दिग्दर्शक तानाजी घाडगे हे स्वत: गावातील आणि शेतीवर निसर्गावर प्रेम करणारे असल्याने त्यांना हा सामाजिक विषय भावला आणि बरड चित्रपट तयार झाला.
‘बरड’ची मांडणी वास्तवादी असली तरी लोकांसाठी समाजप्रबोधन सोबत त्यात रंजक मूल्य असल्याचेही देवेन कापडणीस आणि तानाजी घाडगे यांनी सांगितलं. या दोघांनीही अनेक मालिका केल्याने त्यांचं आधीपासूनच टय़ूनिंग जमलं होतं. आणखी एका व्यक्तीची यात भर पडली, ती भरत गणेशपुरे यांची.
भरत आणि तानाजी दोघंही एकमेकांच्या स्ट्रगल पीरियडपासूनचे सोबती. दोघांनाही एकमेकांच्या क्रिएटीव्हीचा पुरेपूर परिचय असलेला. त्यामुळे मालिकेत व्यस्त असलेल्या भारत गणेशपुरे यांनी यातील खलनायक कम लोभी माणसाची भूमिका करायची असं ठरलं. उपरोधिक पद्धतीने त्यांच्या व्यक्तिरेखेतून माणसाच्या जमीन विकून पैसे कमावण्याच्या वृत्तीवर भाष्य करण्यात आलं आहे. या चित्रपटात भारत गणेशपुरे यांनी ‘गुपचुप गुपचुप कोणी माती खाल्ली रे..’ हे गाणं गायलं आहे.
मिथिला कापडणीस यांनी हे गाणं लिहिलं आहे. या गाण्यासाठी कोणी मुरब्बी गायक नको होता. एक रॉनेस पाहिजे होता म्हणून हे गाणं गायल्याचं भारत गणेशपुरे यांनी सांगितलं. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुहास पळशीकर यांनी गावातील आदर्श व्यक्तीची भूमिका केली आहे. अतिशय साधा, परंतु काहीतरी विचार मांडणारा हा चित्रपट असल्याने आपण तो स्वीकारण्याचे अभिनेते सुहास पळशीकर यांनी सांगितले.
रूढार्याने या चित्रपटात नायक-नायिका नाहीत. चित्रपटात कथेला आवश्यक थीम साँग, गाव असल्याने गावात वेळोवेळी होणारे भजन-कीर्तनाचे कार्यक्रम, गोंधळ, गावातील लोककला अशा ख-याखु-या संगीताचा वापर केला आहे. चित्रपटाचं संगीत संदीप वाडेकर यांचं आहे.
चित्रपटात शहाजी काळे, राजन पाल, नंदकिशोर चौघुले, संजय कुलकर्णी असे अनेक कलावंत आहेत. वाळू माफियांवरचा ‘रेती’ चित्रपट केल्यानंतर या विषयावर चित्रपट केल्याचं निर्माते देवेन कापडणीस म्हणाले, मात्र हा विषय त्यांच्या डोक्यात दोन वर्षापासून घोळत होता. काहीतरी अफवा उठवून चढया भावात जमिनी विकत घ्यायच्या आणि शेती नष्ट करायची ही अलीकडची मोडस ऑपरेंडी त्यांना अस्वस्थ करत होती.
शेती नष्ट करायची, घरं बांधायची मग परत निसर्ग हवा म्हणून फार्म आणि ऑरगॅनिक वस्तू कुठे मिळतील याची चौकशी करायची हे उलटचक्र खूपच भयावह असल्याची जाणीव चित्रपट पाहून लोकांना व्हावी. त्यांनी हे सगळं काय चाललंय याचा विचार करत जावं हाच आपला चित्रपट निर्मिती मागचा उद्देश असल्याचे निर्माते देवेन कापडणीस म्हणाले.