रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते हे कोडे अद्याप मुंबईकरांना समजू शकलेले नसून खड्डे हे मुंबईकरांच्या पाचवीलाच पुजले आहेत.
मुंबई- रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते हे कोडे अद्याप मुंबईकरांना समजू शकलेले नसून खड्डे हे मुंबईकरांच्या पाचवीलाच पुजले आहेत. खड्डय़ांमुळे मुंबईकरांची हाडे खिळखिळी होत असताना बेस्टला खड्डय़ांचा फटका सहन करावा लागत आहे. खड्डय़ांमुळे बेस्ट बसचे ३ हजार टायर्स निकामी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नेहमीच येती दिवाळी-दसरा त्याचप्रमाणे पावसाचे आगमन झाले की पाणी तुंबणे, रस्त्यात खड्डे पडणे हे मुंबईकरांच्या माथीच मारले आहे. पावसात पाणी तुंबल्यामुळे मुंबईकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, त्याचप्रमाणे पावसाळ्यात पडणा-या खड्डय़ांमुळे बेस्टची डोकेदुखी वाढते. खड्डय़ांमुळे बेस्ट बसच्या टायर्सची हवा जात असून अनेक टायर्स नादुरुस्त होतात. त्यामुळे खड्डय़ांमुळे नुसते मुंबईकर त्रस्त नसून बेस्ट परिवहन विभागही त्रस्त होतो.
मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. मात्र आजही रस्त्यांवरील खड्डे सुस्थितीत आहेत. त्यामुळे खड्डय़ांच्या नावाखाली खर्च होणारे कोटय़वधी रुपये जातात कुठे हा संशोधनाचा भाग आहे. खड्डय़ांचा त्रास फक्त गाडीधारकांनाच सहन करावा लागतो, हे खरे असले तरी बेस्ट उपक्रमालाही रस्त्यांवरील खड्डय़ांनी आर्थिक खड्डयात गाडले आहे.
वर्षाला दीड हजार टायर्स खड्डय़ांमुळे खराब होतात. मात्र यंदा तब्बल ३ हजार टायर्स खराब झाले आहेत. बसचे टायर्स खराब होत असल्याने एका बसमुळे दिवसाला मिळणा-या सात हजार ५०० रुपयांना मुकावे लागत आहे. त्यातच नवीन टायर्स वेळीच उपलब्ध होत नसल्याने बेस्टचा आर्थिक तोटा वाढतच आहे. बेस्ट हे मुंबई महापालिकेचे अंग असून खड्डय़ांमुळे होणारे आर्थिक नुकसान महापालिकेने दिले पाहिजे, अशी मागणी बेस्ट समिती सदस्यांनी केली आहे.
बेस्ट परिवहन विभागाच्या ताफ्यात मिडी, सर्वसाधारण, वातानुकूलित, डबल डेकर अशा एकूण ४,२०० बस आहेत. तर २८ लाखांहून अधिक प्रवासी बसने प्रवास करतात. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याचा परिवहन विभागाकडून सतत प्रयत्न करण्यात येत असतो. मात्र पावसाळा सुरू झाला की परिवहन विभागाला फटका बसतो तो म्हणजे खड्डय़ांमुळे बसचे खिळखिळे होणारे टायर्स.