एलफिन्स्टन पुलावरील झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात पश्चिम रेल्वे प्रशासनाने रेल्वे अधिका-यांना क्लीनचिट दिली आहे.
मुंबई- एलफिन्स्टन पुलावरील झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात पश्चिम रेल्वे प्रशासनाने रेल्वे अधिका-यांना क्लीनचिट दिली आहे. पाऊस आणि अफवेमुळे ही दुर्घटना घडल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने चौकशी समितीच्या अहवालात नमूद केले आहे. २९ सप्टेंबरला एलफिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी पश्चिम रेल्वेच्या पाच सदस्यीय समितीने केली.
पश्चिम रेल्वेचे मुख्य सुरक्षा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने एलफिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीची चौकशी करून अहवाल तयार केला. हा अहवाल पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसमोर सादर करण्यात आला. यामध्ये रेल्वे पुलांवरील गर्दी कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या पयार्याची यादी देण्यात आली आहे. मात्र या दुर्घटनेसाठी रेल्वे अधिकारी जबाबदार नसल्याचा निष्कर्ष काढत रेल्वे प्रशासनाने हात वर केले आहेत. सर्व दोष पाऊस आणि अफवेवर ढकलून या प्रकरणातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाने केला आहे.
‘‘पाऊस आल्यामुळे लोक मोठय़ा प्रमाणात रेल्वे पुलावर जमले होते. पुलावरील गर्दी वाढल्याने लोकांच्या मनात भीती निर्माण झाली. पुलावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. प्रत्येकजण पुलावरुन पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता आणि चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे या घटनेसाठी कोणालाही जबाबदार धरता येणार नाही’ असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंदर भाकेर यांनी सांगितले.
याआधी दादर पोलिसांनी या घटनेचा तपास केला होता. या तपासात अफवेमुळे पुलावरील लोकांमध्ये घबराट निर्माण झाल्याचे समोर आले. ‘एका व्यक्तीने फूल गिर गया’ म्हटले. मात्र अनेकांनी ते ‘पूल गिर गया’ असे ऐकले. यानंतर प्रवाशांच्या मनात भीती निर्माण झाली आणि प्रत्येकजण तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करु लागला. यातूनच चेंगराचेंगरीची घटना घडली, असे दादर पोलिसांच्या तपासातून पुढे आले.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने घटनेची जबाबदारी झटकून संपूर्ण दोष पाऊस आणि अफवेला दिला आहे. यासोबतच प्रशासनाने अहवालात रेल्वे पुलांवरील गर्दी टाळण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. यामध्ये तिकीट आरक्षण केंद्र दुसरीकडे हलवण्यासोबतच गर्दीच्यावेळी फेरीवाल्यांना प्रवेश न देण्याची सूचना करण्यात आली आहे. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे आणि हॉटलाईन सेवा सुरु करण्यात यावी, असेही घटनेचा तपास करणा-या पाच सदस्यीय समितीने सुचवले आहे