आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक कोल्हापूर येथे उभारण्यासाठी राज्य सरकारकडून अद्याप दिरंगाई केली जात आहे.
मुंबई– आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक कोल्हापूर येथे उभारण्यासाठी राज्य सरकारकडून अद्याप दिरंगाई केली जात आहे. विधान परिषदेत तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरातून हे उघड झाले आहे.
काँग्रेसचे संजय दत्त व आनंदराव पाटील यांनी शाहू महाराज यांच्या कोल्हापूर येथील स्मारकासंदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता, त्यावरील लेखी उत्तरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकासाठीच्या जमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव सरकारच्या विधाराधीन असल्याचे म्हटले आहे.
संजय दत्त व आनंद पाटील यांनी कोल्हापूर येथे राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी लागणा-या जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही काय, असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी होय असे लेखी उत्तर दिले.
पुढे उत्तरात जमीन हस्तांतरणाव्यतिरिक्त प्रकल्प खर्चाच्या आराखडयास मंजुरीच्या प्रस्तावाची मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे यांच्या स्तरावर छाननी करण्यात येत आहे. जमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव हा सरकारच्या विचाराधीन असल्याचे म्हटले आहे.