‘आपण तोंड उघडले तर देश हादरून जाईल’, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव येथे केले आहे.
मुंबई- ‘आपण तोंड उघडले तर देश हादरून जाईल’, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव येथे केले आहे. त्यांचे हे वक्तव्य गंभीर असून त्यांच्याकडे उपलब्ध माहितीमुळे देश हादरणार असेल तर त्यांनी देशहितासाठी ही माहिती उघड करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खडसे हे विरोधी पक्षनेते असताना आपण कोणतेही वक्तव्य पुराव्याशिवाय करत नाही, असे नेहमी सांगायचे. मी तोंड उघडले तर देश हादरून जाईल, असे ते म्हणत आहेत.
म्हणजेच त्यांच्याकडे त्याबाबतचे पुरावेही आहेत असा अर्थ होतो. त्यांना ही माहिती दाऊदनी दिली आहे का? त्यांच्या पक्षातील केंद्रीय किंवा राज्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती त्यांच्याकडे आहे का? असे प्रश्नही मलिक यांनी उपस्थित केले आहेत. खडसे यांनी ही माहिती सार्वजनिक करावी. त्यांनी घाबरू नये, असे मलिक यांनी सांगितले.
एकनाथ खडसेंच्या जमीन विक्री प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. मात्र पीएचे लाच प्रकरण व दाऊद प्रकरणाबाबत काही हालचाली होताना दिसत नाहीत. मुख्यमंत्रीही चौकशीआधी त्यांना क्लीनचिट देतात. म्हणजेच मुख्यमंत्रीही खडसेंना घाबरत आहेत.
याचा अर्थ मुख्यमंत्र्यांबाबत काही भयंकर माहिती खडसेंकडे आहे का, असा प्रश्नही मलिक यांनी उपस्थित केला. खडसेंनी देशहितासाठी आपल्याकडील माहिती उघड करावी, त्यांना ही माहिती दाऊद किंवा इतर कोणत्या माध्यमांकडून मिळाली तेही त्यांनी स्पष्ट करावे, असेही मलिक म्हणाले.
शेतमालाच्या थेट विक्रीचा निर्णय भांडवलदारांसाठी
फळे व भाज्यांची विक्री थेट बाजारात करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतक-यांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकार सांगत असले तरी प्रत्यक्षात त्याचा थेट फायदा हा मल्टी नॅशनल कंपन्या आणि बडया भांडवलदारांनाच होणार आहे.
सध्या फळभाजी विक्रीमध्ये रिलायन्स, टाटा, गोदरेज, आघाडीवर आहेत. ते सध्या ऑनलाईन विक्रीही करत आहेत. त्यामुळे हा निर्णय शेतक-यांसाठी नसून थेट भांडवलदारांच्या फायद्यासाठी घेतल्याचा आरोप मलिक यांनी केला.