मुंबईसह राज्यातील दहा महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निमित्ताने सध्या ‘पोरखेळ’ चालला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ काँग्रेसनेते नारायणराव राणे यांनी त्याचे वर्णन ‘डबलबारी’ असे केले आहे. प्रचार कसा चाललाय सध्या राज्यातील निवडणुकांचा?
गणपतराव : मुंबईसह राज्यातील दहा महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निमित्ताने सध्या ‘पोरखेळ’ चालला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ काँग्रेसनेते नारायणराव राणे यांनी त्याचे वर्णन ‘डबलबारी’ असे केले आहे. प्रचार कसा चाललाय सध्या राज्यातील निवडणुकांचा?
संपतराव : गणपतराव, घरचा टीव्ही बंद आहे. मग काय सभांचे वृत्तांत वृत्तपत्रांतून वाचून किंवा प्रत्यक्ष सभा ऐकून हा सध्याचा पोरखेळ अनुभवतोय. पण प्रचारादरम्यान फुल्टू मजा, मस्ती चाललीय? बिनपैशाचा तमाशाच बोला की! कार्यकर्त्यांना तर सुगीचे दिवस आलेत. दिवसभर उमेदवारांबरोबर प्रचारात सहभागी व्हायचे, आवाज कुणाचा.. अबकी बार.. अशा घोषणा द्यायच्या, सूर्यनारायण कलू लागल्यावर बार, गच्च्यांवर, मिळेल त्या जागी चपटी, खंबा आडवा करण्याचे काम जोरात सुरू आहे. त्याबरोबर मस्तपैकी चाकना, डाळी काय, नॉनव्हेज काय.. काय काय विचारू नका.
‘मंदिर मस्जिद बेर कराती, मेल कराती है मधुशाला’ असं हरिवंशराय बच्चन यांनी लिहून ठेवलंय. ते तर निव्र्यसनी. पण त्यांनी जे काही ‘मधुशाला’त तत्त्वज्ञान लिहून ठेवलंय, ते लाजवाबच आहे. ‘दो घुट मुझे भी पिला दे शराबी.. देख फिर होता है क्या..’ असा सगळा माहौल आहे राव. रॉय किणीकर यांनी तर ‘मद्य नव्हे, हे तर मंतरलेले पाणी’ अशी मद्याची भलामण केलेली आहे. त्याचा प्रत्यय सध्याचे वातावरण पाहता येतो.
गणपतराव : नाही म्हणजे, म्युनिसिपाल्टीच्या निवडणुका या ‘वॉटर-गटर-मीटर’ या भोवतीच फिरणा-या असतात. यंदा मात्र या निवडणुकीला काहीसा विधानसभा निवडणुकीसारखा रंग येऊ लागलाय. म्हणजे बघा, ते आपले नागपूरनरेश देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात तर अधिकाधिक सरकारने काय केले, काय करणार आहे, याचेच गुणगाण असते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका केल्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्यावर तुटून पडतात. पण तेही महापालिकेतील कार्यकाळात शिवसेनेने काय केले, काय करणार आहेत, याची टेप लावतात. आता तर त्यांच्या आवाजाला चांगलीच धार चढलेली दिसतेय.
संपतराव : धार चढवली नाही तर शिवसेनेची धार बोथट होणार. स्वर्गीय बाळासाहेबांची भाषणे आठवून पाहा. कशी विरोधकांची सालटी सोलून काढायचे. त्यात त्यांचे मित्र शरदबाबू यांनाही अनेक शेलकी विशेषणं द्यायला ते विसरायचे नाहीत. कधी मैद्याचं पोतं.. असा बाळासाहेबांकडे दारूगोळा होता. भाषणातून तो ते विरोधकांवर डागत असत. त्यामुळेच की काय शिवसेना स्थापन झाल्यानंतर खूप उशिरा बाळासाहेबांचे झंझावाती दौरे व भाषणामुळे शिवसेनेला राज्यात सत्ता मिळाली. पण त्यात कमळाबाईही त्यांना चिटकली. ती २०१४च्या विधानसभा निवडणुकांपर्यंत.
या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने कमळाबाईशी काडीमोड घेत स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. कमळाबाई असो, किंवा धनुष्यबाणवाले असो, यांना राज्यातील जनतेने थेट स्वीकारले नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांना थेट सत्तेसाठी दावा करता येत नव्हता. अखेर जुना घरोबा पाहून उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सत्तेसाठी (की, पक्षात बंडखोरी होऊ नये. आमदार भाजपात जाऊ नये म्हणून) भाजपाबरोबर युती केली.
सत्तेत आल्यावर कमळाबाईने रंग दाखवायला सुरुवात केली. पूर्वी मोठा भाऊ असलेली शिवसेना लहान भावाच्या भूमिकेत आली. आपोआप मोठा भाऊ म्हणून भाजपाने शिवसेनेला दाबायची एकही संधी सोडली नाही. सत्तेत आल्यावरही त्यांना मनासारखी मंत्रीपदे काही मिळाली नाहीत. उष्टया पत्रावळीत जेवण वाढावं तसं भाजपाने युतीधर्म म्हणून शिवसेनेच्या ताटात काही मंत्रीपदे फेकली. पण जनतेतून निवडून आलेल्या आमदारांनी याबाबतची नाराजी पक्षप्रमुखांकडे वारंवार विषदही केली. मात्र त्याचा उपयोग काही झाला नाही.
या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका ही सोन्याची कोंबडी आहे, हे शिवसेनेला माहीत असल्याने त्यांनी या महापालिकेसाठी पुन्हा कमळाबाईशी युती केली तर त्याचा फटका आपल्यालाच बसू शकतो, हे हेरले. त्यानुसार गोरेगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी खास ‘ठाकरी’ शैलीत भाषण करून युती तोडून टाकली. पण निवडणूक झाल्यावर त्रिशंकु स्थिती निर्माण झाल्यास शिवसेना असो किंवा भाजपा ‘हिंदुत्व’च्या मुद्दयावर एकत्रही येऊ शकते.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी ‘रस्त्यावर येण्याची’ भाषा करताच, फडणवीस यांनी ‘वाघाच्या जबडयात हात घालून दात मोजण्याची’ तयारी केली. पण कसले काय अखेर ठाकरे व फडणवीस यांनी नंतर एकत्र येत पत्रकार परिषद घेऊन कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी युतीची घोषणा करीत सत्ताही मिळवली. आताही तसे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्यापूर्वी भाजपाचा मस्तवालपणा उतरवणे शिवसेनेला गरजेचे होते. त्यासाठी उद्धव ठाकरे सध्या आक्रमक झालेले दिसतात.
गणपतराव : खरंय ते. ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना,’ अशीच या दोन्ही पक्षांची अवस्था आहे. त्यामुळेच निवडणुकीत शिवसेनेला ‘औकात’ दाखवण्याची भाषा सुशील, सत्शील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस यांना उत्तर न देतील तर ते उद्धव ठाकरे कसले? त्यांनीही मग दानपट्टा चालवायला सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांना त्यांनी ‘पाणी पाजण्याची’ भाषा केली. ‘भाजपाचे कमळ हे कमळ नाही, तो नुसताच मळ आहे’ अशी कोटी करायलाही ते विसरले नाहीत.
निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरे थेट मोदींवर टीका करून आपला परिघ वाढवताहेत. मोदींनी नुकतीच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर खालच्या पातळीवर उतरत टीका केली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी, ‘मोदींकडे बिनसाबणाचे बुडबुडे सोडण्याची कला आहे’ अशी केलेली मार्मिक टिपण्णी आठवत असेल. फडणवीस असो किंवा भाजपाचे राज्यातील इतर मंत्री व नेत्यांची किल्ली मोदी व अमित शहा यांच्याकडे आहे. ते जशी किल्ली फिरवतात त्याप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस डोलू लागतात. त्यामुळे उद्धव यांनी थेट मोदी-शहा या जोडगोळीला टार्गेट करायला सुरुवात केली आहे.
शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांनी तर शहा यांची संभावना ‘स्टॉप नाना’ अशी केली आहे. चिरंजीवीचा तो दाक्षिणात्य चित्रपट ज्यांना आठवत असेल त्यांना तो स्टॉप नानाही माहीत असेल. एकुणात काय तर शिवसेना-भाजपावाल्यांनी चांगलाच माहौल तयार केला आहे. ९० एमएम चित्रपटाचे संवाद सहज होतील, अशी टीका, कोटया, शेलकी विशेषणं या निवडणूक प्रचारादरम्यान ऐकायला, पाहायला मिळत आहेत.
संपतराव : पण या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा फारसा माहौल दिसत नाही. हो, तेही खरेच आहे म्हणा! पंधरा र्वष राज्यात व केंद्रात एकत्र राहणारी ही मंडळी गेल्या काही वर्षापासून क्षुद्र राजकारणाचे बळी ठरत आहे. आपला जिल्हा, आपला मतदारसंघ गोंजारण्यासाठी, वाचवण्यासाठी या दोन्ही पक्षांतील मधल्या फळीचे नेते मश्गुल राहिल्याने त्यांची नगरपालिका व नगर परिषदा किंवा आता महापालिका व जिल्हा परिषदांसाठी आघाडी झालेली नाही. ही मोठीच शोकांतिका आहे.
शिवसेना असो किंवा भाजपा या दोन्ही पक्षांना थोपवण्यासाठी अशी आघाडी आवश्यक होती. जे उत्तर प्रदेशात राहुल गांधी व अखिलेश यादव यांनी करून दाखवले ते राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना शक्य का झाले नाही? मुळात मगाशी सांगितल्याप्रमाणे ही मंडळी आपले गड, गडी सांभाळण्यात मश्गुल राहिल्याने आघाडी होऊ शकली नाही. आता हे एकेकाळचे मित्रपक्ष वेगवेगळ्या निवडणुका लढवत आहेत, अशावेळी त्यांनी एकमेकांवर यथेच्छ टीका न करता राज्यात व केंद्रातील सत्तेत सहभागी असताना केलेली विकासकामे जनतेसमोर ठेवली पाहिजेत. ती भाजपा पाहा, ‘इंचभर’ कामाची ‘हातभर’ जाहिरात करते. ते या दोन्ही समविचारी पक्षांच्या लक्षात का येऊ नये?
गणपतराव : ते त्यांच्या लक्षात आले असते तर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचीच सत्ता आली असती. पण अवदसा सुचली आणि विधानसभेला आघाडी तोडली. त्याची फळं दोन्ही काँग्रेस भोगत आहेत. या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना मनापासून आघाडी व्हावी असे वाटत होते. पण नेत्यांचा स्वार्थ आडवा आल्याने सगळीच पंचाईत झाली. मुसळ केरात गेले सगळे. अशावेळी कार्यकर्त्यांची मोठीच अडचण होते. पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने एकेकाळी मित्रपक्ष असलेल्यांच्या विरोधात प्रचार करायला त्यांचे मन धजत नाही. ते मनाने हे करण्यासाठी तयार नसतात. पण एकूण राजकीय परिस्थितीनुसार त्यांनाही नमते घ्यावेच लागते.
संपतराव : या दोन्ही काँग्रेसकडे शरद पवार, नारायण राणे असे दिग्गज नेते आहेत. पण त्यांनाही मनापासून आघाडी करायची होती. पण काही मधल्या फळीच्या नेतेमंडळींमुळे अडचण झाली. ठाण्यात आघाडी व्हावी म्हणून नारायण राणे यांनी काय कमी प्रयत्न केले? पण काही जागांमुळे अडले गेले. गणपतराव, ‘बोलण्यासारखे या दोन्ही काँग्रेसकडे खूप काही आहे. पण ते जाहिरातबाजी करण्यात कमी पडतात.’ भाजपावाले याबाबत हुशार आहेत. त्यांचेच अनुकरण शिवसेनावालेही सध्या करीत आहेत. पण अशा जाहिरातबाजीत दोन्ही काँग्रेसवाले कमी पडतात. त्याचाच फायदा शिवसेना-भाजपाला होतो.
गणपतराव : महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होईपर्यंत शिवसेना-भाजपावाले भांडत राहतील. पण नंतर सत्तेसाठी एकत्र येतील. त्यांचा हा तमाशा जनतेला कळतो. पण तो मतांमध्ये उतरत नाही. तो उतरल्यास जनतेला गृहीत धरणारी शिवसेना-भाजपा तोंडावर आपटेल. तो सुदिन लवकर येवो! सत्तेचा डबलबारी तमाशा थांबला पाहिजे.
संपतराव या निवडणुकांमध्ये भाजपाला दणका मिळालाच पाहिजे. कारण ते महाराष्ट्राचे लचके तोडायला निघालेले आहेत. ज्या राज्यात राहता, त्यांचे अन्न खाता त्याचाच तुकडा पाडायला निघालेत लेकाचे. हे रोखायला हवे, त्यासाठी भाजपाला मतदारांनी एकदा हिसका दाखवलाच पाहिजे. त्याशिवाय ही मंडळी वठणीवर येणार नाहीत.