दक्षिण काश्मीरच्या कुलगाम येथे रविवारी पहाटे झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनच्या चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आले.
कुलगाम- दक्षिण काश्मीरच्या कुलगाम येथे रविवारी पहाटे झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनच्या चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आले.
यात दोन भारतीय जवान शहीद झाले असून एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर एका अधिकाऱ्यासह तीन जवान जखमी झाले असून त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने श्रीनगर येथे आणून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे.
श्रीनगरपासून दक्षिणेला ७० कि. मी. अंतरावर असलेल्या नागबाल गावात काही दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानुसार रविवारी पहाटे याठिकाणी लष्कर, पोलीस आणि निमलष्करी दलांनी शोधमोहीम सुरू केली.
दहशतवादी नेमके कुठल्या भागात लपले आहेत, हे ठाऊक असल्याने काही घरांची जवानांनी तपासणी केली, मात्र दहशतवादी सापडले नाहीत. यावेळी एका पोलिसाने एक घर पुन्हा तपासण्याची मागणी केली आणि निमलष्करी दल, विशेष पथकाच्या जवानांसह पोलीस पुन्हा त्या घरात शिरले. यावेळी त्यांना एक छुपा पोटमाळा आणि आढळून आला, या पोटमाळयावर दहशतवादी लपले होते.
पकडले जाण्याच्या भीतीने या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला, ज्यात लान्सनायक रघुवीर सिंग आणि लान्सनायक गोपालसिंग भदोरिया हे शहीद झाले. यानंतर झालेल्या चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांनी जंगलात पळ काढला, तर चार दहशतवादी मारले गेले. यापैकी तीन दहशतवाद्यांची ओळख पटली असून त्यांची नावे मुदासिर अहमद तांतरे, फारूक अहमद दार आणि अझहर अहमद अशी आहेत.
हे सर्व जण बंदी असलेल्या हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत. त्यांच्याकडून चार शस्त्रे हस्तगत करण्यात आली असून या चकमकीनंतर फुटीरतावाद्यांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली, मात्र जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे अधिका-यांनी सांगितले.
भारतातील दहशतवाद इस्लामाबादमधूनच!
या चकमकीनंतर काश्मीर पोलीस दलाचे महासंचालक एस. पी. वैद यांनी हे मोठे यश असल्याचे म्हटले आहे. देशाचे दोन जवान शहीद आणि एका नागरिकाचा मृत्यू झाल्याबद्दल त्यांनी शोकही व्यक्त केला.
तर केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतातील आणि प्रामुख्याने जम्मू-काश्मीरमध्ये होणारा दहशतवाद इस्लामाबादमधून पसरवला जात असल्याचा आरोप केला. याबाबत आता आणखी पुरावे देण्याची गरज नसून भारतातील दहशतवादाला इस्लामाबादच खतपाणी घालत असल्याची बाब सा-या जगाला माहीत आहे, असे ते म्हणाले.
सीमेवर संरक्षक तारा कापणा-याला अटक
पाकिस्तानी दहशतवादी सर्रास भारतात घुसखोरी करत असले, तरी त्यांना घुसखोरी करण्यासाठी मदत होईल, अशाप्रकारे नियंत्रण रेषेवर लावण्यात आलेल्या संरक्षक तारा कापताना एका इसमाला बीएसएफने अटक केली आहे. नियंत्रण रेषेवर असलेल्या तारांमधून रात्रीच्या वेळी वीजप्रवाह सुरू असतो.
या तारांचा आणि भारताच्या लाईट टॉवरचा वीजप्रवाह खंडित होईल, अशाप्रकारे रविवारी पहाटे हा इसम पूंछ सेक्टरमध्ये तारा कापत होता. यामुळे त्याला दोनदा इशारे देण्यात आले, मात्र तरीही त्याने तारा कापणे सुरू ठेवल्याने त्याच्यावर एक गोळी झाडण्यात आली, यात तो जखमी झाला असून त्याला ताब्यात घेऊन उपचार सुरू करण्यात आल्याचे बीएसएफने म्हटले आहे.