मुंबई महापालिकेच्या ‘प्रारूप विकास आराखडा २०३४’च्या मंजुरीनंतर त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी चार पंचवार्षिक योजना तयार केल्या जाणार आहेत.
मुंबई- मुंबई महापालिकेच्या ‘प्रारूप विकास आराखडा २०३४’च्या मंजुरीनंतर त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी चार पंचवार्षिक योजना तयार केल्या जाणार आहेत. या पंचवार्षिक योजनांच्या अंमलबजावधीसाठी प्रत्येक वार्षिक योजनांसाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. तरतूद केलेल्या निधीचा वापर न झाल्यास पुढील वर्षी ती रक्कम खर्च केली जाणार आहे.
मंजूर विकास आराखडयाची अंमलबजावणी कशाप्रकारे केली जावी, याची रुपरेषा ठरवण्यासाठी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या उपस्थितील विशेष बैठक पार पडली. यामध्ये विकास आराखडा पुनर्रचना विभागाचे विशेष कार्य अधिकारी रमानाथ झा यांनी आयुक्तांना या रूपरेषेबाबत संगणकीय सादरी करण केले.
या बैठकीत विकास आराखडयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महापालिका मुख्यालय स्तरावर एका विभागाची स्थापना करण्यात येणार आहे. या विभागाच्या आधिपत्याखाली २४ विभागांमध्ये कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. वीस वर्षाच्या या विकास आराखडयामध्ये पाच वर्षामध्ये चार विभागणी करून पंचवार्षिक योजना तयार करण्याची सूचना करण्यात आली.
पहिल्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी ही एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत होणार आहे. प्रत्येक वार्षिक योजनेसाठी अर्थसंकल्पात ठोस तरतूद करावी आणि सध्याच्या आकडेवारीनुसार प्रत्येक वार्षिक योजनेसाठी तरतूद करण्याची अंदाजित रक्कम ५ हजार कोटींपेक्षा जास्त नसावी, असाही निर्णय घेण्यात आला.
विकास आराखडयावर ९६१६ हरकती व सूचना
मुंबई महापालिकेच्या २०१४-३४च्या प्रारूप विकास आराखडयासंदर्भात मागवलेल्या हरकती व सूचना मांडण्यासाठी मुदत शुक्रवारी संपली असून तब्बल ९ हजार ६१५ हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत.
शहर भागातून १,६१८, पश्चिम उपनगरातून ४,६१७, पूर्व उपनगरातून २,३०८, सर्वसाधारण १९५ आणि विकास नियंत्रण नियमावलीकरता ८७८ हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. शेवटच्या दिवशीच १ हजार ७२० हरकती व सूचना प्राप्त झाल्या. तर ऑनलाईन ३,३३० हरकती व सूचना प्राप्त झाल्याची माहिती विकास व नियोजन विभागाने दिली.