कंबरेएवढय़ा पाण्यातून चालत जाण्याचा निर्णय मंगळवारी अनेक मुंबईकरांनी घेतला
मुंबई- कंबरेएवढय़ा पाण्यातून चालत जाण्याचा निर्णय मंगळवारी अनेक मुंबईकरांनी घेतला व नऊ-दहा तास चालत घर गाठले. मात्र बुधवारी त्यांच्यावर अंगदुखी, तापाने रडकुंडीला येण्याची वेळ आली आहे. खोकला, अंगदुखी, कणकण, पाय दुखण्यासह, दूषित पाण्यामुळे, गारठय़ाने हातापायाची त्वचाही सोलवटली आहे.
बुधवारी नायर, केईएम, लो. टिळक रुग्णालयाच्या परिसरामध्ये काही तासांसाठी पाणी भरले होते. त्यामुळे ओपीडी अर्धवेळ घेण्यात आल्या, तर रुग्णांनाही वरच्या मजल्यावर नेण्यात आले. त्याची धास्ती घेऊन पालिका रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी जाणा-या मुंबईकरांनी बुधवारी जवळच्या खासगी रुग्णालयांमध्ये धाव घेतली.
दूषित पाण्यामध्ये अनेकदा प्राण्यांचे मलमूत्र असते, त्याचा त्वचेला संसर्ग होण्याची भीती असते, त्यामुळे अंगाला खाज येणे, संसर्ग झाल्यामुळे ताप येण्याचाही त्रास वाढता असल्याचे फिजिशिअन डॉक्टरांनी सांगितले. पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साथीचे आजार वाढत होते, त्यात आता दूषित पाण्यामुळे होणा-या संसर्गजन्य आजारांची साथ वाढण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
वांद्रे ते दादर, बोरिवली ते दहिसर, गोरेगाव ते ठाणे, वाशी ते ठाणे अशा वेगवेगळ्या अंतराहून तंगडतोड करत घर गाठलेल्या मुंबईकरांना पायामध्ये गोळे येणे, मुंग्या येणे, पाय सुजणे, डोकेदुखी असा त्रास होत होता. पंधरा ते वीस किलोमीटर पाण्यामधून चालत आलेल्या अनेकांनी उभे राहण्याचेही त्राण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उंदीर, घुशी यांच्यामुळे लेप्टोस्पायरेसिस होण्याचा धोका असतो, या आजारांची लक्षणे काही दिवसांनी उद्भवू शकतात, असा सावधगिरीचा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे.
[EPSB]
[/EPSB]