दहीहंडीत कायद्याने २० फुटांच्या वरील थरांना मान्यता दिली नाही. मात्र दुसरीकडे या खेळाला साहसी खेळाचा दर्जाही दिला गेलाय. मग प्रश्न पडतो की, या दहीहंडीला नियमात बांधण्याची गरजच काय आहे? नियमाच्या कचाटय़ात अडकल्याने विश्वविक्रम करण्याची इच्छा आणि तयारी असतानाही अनेक पथकांना शांत बसावं लागत आहे आणि ज्यांनी आधीच विश्वविक्रम केला आहे त्यांचंच सर्व स्थरातून कौतुक होताना दिसतंय. त्यामुळे मंडळात आपापसातच वैर निर्माण होतात. केवळ नावाजलेल्या गोविंदा पथकांनाच स्पॉन्सरशिप, स्पेशल ट्रीटमेंट अशा गोष्टी मिळतात, हे आणि असे अनेक प्रश्न घेऊन अवधूत गुप्तेने हा ‘कान्हा’ साकारला आहे.
ही कथा आहे दोन गोविंदा पथकांमधील भांडणाची. दहीहंडी म्हणजे मुंबईकर तरुणांची जाण असते. त्यामुळे इतरांपेक्षा मोठय़ा थराची हंडी फोडण्यासाठी हे पथक दहीहंडीच्या तीन तीन महिने आधीपासूनच सराव सुरू करतात. या चित्रपटातही असंच काहीसं दाखवण्यात आलं आहे.
या चित्रपटात नऊ थरांची हंडी लावून विश्वविक्रम केलेला जय एकता पथक आहे आणि दुसरीकडे नऊ थरांचं स्वप्न बघणारा जय बजरंग गोविंदा पथक आहे. मात्र न्यायालयाने आता नऊ थर लावण्यास मनाई केली. मात्र तरीही हे दोन्ही पथकं नऊ थर लावण्यासाठी अथक प्रयत्न करतात.
जय बजरंग पथकाचा कॅप्टन मल्हार (वैभव तत्ववादी) आपल्या पथकातील मुलांना घेऊन नऊ थर लावण्यासाठी प्रयत्न करतो; मात्र त्यांना स्पॉन्सरशिप मिळत नसते. त्याचबरोबर विश्वविक्रम केलेल्या जय एकता पथकाला भरभरून स्पॉन्सरशिप मिळते. शिवाय राजकारणात जाण्याचं स्वप्न पाहणा-या मधुभाई (किरण करमरकर) यांचाही पाठिंबा या पथकाला असतो.
दरम्यान आमदार विश्वासराव सरपोतदार (प्रसाद ओक) यांच्या दहीहंडी सराव शिबिरात हे दोन्ही गोविंदा पथक समोरासमोर येतात आणि त्यांच्यात काही कारणांनी खडाजंगी उडते, तेव्हा जय बजरंग गोविंदा पथकाला नऊ थर लावण्याची संधी मिळते.
त्या मंडळातील मुलं, मुली मिळून नऊ थर लावतात. मग यावर अनेक चर्चासत्रं होतात. चित्रपटाचा खरा महत्त्वाचा क्षण आहे तो दहीहंडीच्या दिवशीचा. विश्वासराव सरपोतदारांच्या दहीहंडीला सगळ्या मीडियाला मज्जाव करण्यात येतो. तेव्हा जय बजरंग मंडळातील गोपाळ नऊ थरांची हंडी लावतात.
मात्र तेव्हा वरच्या थराला असलेला कान्हा (सुमेध वानी) वरून खाली पडतो आणि गंभीर जखमी होतो. तो खाली कसा पडतो? त्याला कोणी मुद्दाम खाली पाडतो का? गुन्हेगार शोधण्यासाठी दोन्ही मंडळं एकत्र येतात का? गुन्हेगार सापडल्यावर त्याला कशी शिक्षा होते? या सा-या प्रश्नांची उकल चित्रपटात अगदी उत्तम पद्धतीने केली आहे.
मात्र त्या काळात जो गोंधळ अवधूत गुप्तेंनी दाखवला आहे तो अगदी चित्रपटाला साजेसा असाच आहे. शिवाय आजच्या तरुणांची ही समस्या मांडताना चित्रपटात संबंधित योग्य व्यक्तींचीही मुलाखत यात दाखविण्यात आली आहे. झी स्टुडिओ, विहांग ग्रुप, यंग बेरी प्रोडक्शन, प्रताप सरनाईक निर्मित व जोय राजन आणि परवेश सरनाईक सहनिर्मित ‘कान्हा’ चित्रपटाची संकल्पना सचिन दरेकर आणि अवधूत गुप्ते यांची असून लेखन सचिन दरेकर आणि स्वप्नील गांगुर्डे यांनी केलं आहे.
अवधूत गुप्तेंनी दिग्दर्शनाची एक वेगळी शैली या चित्रपटात मांडलेली दिसते. दिग्दर्शकाने हा चित्रपट तीन टप्प्यांत मांडला आहे. चित्रपट उलगडण्यासाठी अवधूत गुप्तेने लावलेली ही शक्कल नक्कीच प्रेक्षकांना भावेल. काही ठिकाणी अतिशयोक्ती वाटत असली तरी चित्रपट कोठेही रेंगाळलेला वाटत नाही.
गौरी नलावडेची या चित्रपटानिमित्त ब-याच दिवसांनी नवी भूमिका पाहायला मिळाली आहे. ‘कान्ही’ची भूमिका अगदी सुरेख रेखाटली आहे. त्याचबरोबर तिचं नृत्यकौशल्यही यात दिसून आलं आहे.
वैभव तत्ववादी त्याच्या भूमिकेत योग्य काम करताना दिसतोय. या चित्रपटात लक्षात राहण्यासारखं काम म्हणजे वैभव तत्ववादीची आजी साकारलेल्या राऊळ आजींची भूमिका. मालवणी तडक्यात त्यांनी अगदी अप्रतिम आजी साकारली आहे. शिवाय कान्हाची भूमिका साकारलेल्या सुमेध वानीचंही कौतुक करण्यासारखं काम आहे.
अवधूत गुप्तेंनी दिग्दर्शित केलेला चित्रपट असल्याने यात गाणी उत्तम असणारच. ‘अस्ती अस्ती वर चढ मित्रा’ आणि ‘झगमग’ ही दोन गाणी अफलातून झाली आहेत. सुरेश वाडकर, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, रोहित राऊत, सोनी कक्कर, आदर्श शिंदे, पूर्वेश सरनाईक अशा दिग्गज गायकांनी गाणी गायली असल्याने चित्रपट आणखी खुलतो.
तांत्रिक गोष्टीही उत्तम जुळून आल्याने चित्रपट पाहताना कंटाळवाना वाटत नाही.
यंदाही २० फुटांपर्यंतची हंडी लावण्यास न्यायालयाने सांगितलं आहे. मात्र तरुणांना काय वाटतं? साहसी खेळ म्हणून विचार करता हा निर्णय न पटणारा आहे. अनेक राजकीय मंडळींनीही त्यांची भूमिका मांडली आहे. त्यामुळे याच काळात हा चित्रपट प्रदर्शित झाल्याने दहीहंडीत प्रत्यक्ष काम करणा-यांना तो नक्कीच आवडेल.