कपिल शर्मा यांच्या कार्यालयाचे अनधिकृत बांधकाम महापालिकेने मागील महिन्यात तोडल्याने संतप्त कपिलने आपले कार्यालय बनवण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप महापालिकेच्या कर्मचा-यांवर केला.
मुंबई- अंधेरी पश्चिम येथील सरदार वल्लभभाई पटेल नगरमधील म्हाडाच्या वसाहतीतील हास्यकलावंत कपिल शर्मा यांच्या कार्यालयाचे अनधिकृत बांधकाम महापालिकेने मागील महिन्यात तोडले. त्यामुळे संतप्त झालेल्या कपिल याने आपले कार्यालय बनवण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप महापालिकेच्या कर्मचा-यांवर केला.
याबाबत ट्विटर कपिल याने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्तांना याप्रकारणी लक्ष घालण्याचे आदेश दिले. त्यानुसार कपिल यांना नोटीस जारी करून संबंधितांची नावे उघड करण्यास सांगितले आहे. त्यानंतर याप्रकरणी पुढील चौकशी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हास्यकलावंत कपिल शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विट करत आपण पाच वर्षाला १५ कोटींचा आयकर भरतो. मात्र,आपले कार्यालय बनवण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आपल्याकडे पाच लाख रुपये मागतात,अशी तक्रार करत ‘हेच का अच्छे दिन’ असा सवाल केला. हीच पोस्ट त्यांनी नरेंद्र मोदी यांनाही ट्विट केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी, त्यावर ट्विट करत कपिल यांनी याची संपूर्ण माहिती तसेच नावे द्यावी. यावर योग्य ती कारवाई महापालिका आयुक्त करतील, असे सांगितले.
त्यानंतर पुढील कार्यवाहीच्या दिशेन चक्रे फिरत प्रमुख अभियंता (दक्षता) मनोहर पवार यांनी कपिलला पत्र पाठवून महापालिकेने या घटनेची गंभीर दखल घेतली असून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल,असे कळवले आहे. ही कारवाई करणे शक्य व्हावे यासाठी आपण ज्यांना लाच मागण्यांविरोधात तक्रार केली आहे, त्यांची नावे जाहिर करावी,असे यात म्हटले आहे.
कपिल शर्मा यांनी संबंधितांचे नाव व त्यांच्या कामाचा तपशील उपलब्ध करून दिल्यानंतरच सविस्तर चौकशी केली जाईल. यात जो दोषी आढळेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल,असे मनोहर पवार यांनी स्पष्ट केले.
खाडीत भराव टाकून केले अनधिकृत बांधकाम
अंधेरी पश्चिम येथील जानकी देवी पब्लिक स्कूल रोडवरील सरदार वल्लभभाई पटेल नगरमधील म्हाडाच्या वसाहतीत ७०-७१ हा कपिल शर्मा यांच्या नावावर बंगला आहे. या बंगल्याच्या पाठिमागील बाजुस तब्बल एक हजार चौरस फुटाचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते.
बंगल्याच्या मागील बाजुस खाडीचा परिसर आहे. त्यात भराव टाकून हे अनधिकृत बांधकाम करण्यात येत होते. याप्रकरणी महापालिकेच्या के/पश्चिम विभागात तक्रार प्राप्त झाल्यानंतर २६ जुलै २०१६ रोजी त्यांना काम थांबवण्याबाबत नोटीस देण्यात आली. परंतु त्यानंतरही तिथे बांधकाम सुरुच होते. त्यामुळे ०४ ऑगस्ट २०१६ रोजी हे अनधिकृत बांधकाम तोडले गेले.
पूर्वी जारी करण्यात आलेल्या बांधकाम स्थगितीचे आदेश बजावल्यानंतर तसेच बांधकाम तोडण्यासाठी बजावलेल्या नोटीसला कपिल शर्मा यांनी कोणतेही लेखी उत्तर महापालिकेला दिले नाही. तसेच हे बांधकाम नियमित करण्याबाबतही कोणत्याही प्रकारचा अर्ज विभाग कार्यालयात केला नसल्याचे महापालिकेच्या सुत्रांकडून सांगण्यात येते. हे बांधकाम तोडल्यामुळेच त्यांच्या स्वाभिमानाला ठेच लागली म्हणूनच प्रथम अधिका-यांची नावे आणि मग राजकीय पक्षांची नावे पुढे करत पैसे मागत असल्याचा आरोप कपिल करत आहे.
मात्र, याप्रकरणी महापालिकेच्या अधिका-यांनी बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे कपिल यांनी खाडी परिसरात भराव टाकून तिवरांची कत्तल करून हे बांधकाम केले असेल तर त्यांच्याविरोधातच मोठी कारवाई करावी लागणार असल्याचे अधिका-यांकडून समजते.