खड्डयांमुळे मुंबईच्या रस्त्यांची अक्षरक्ष: चाळणी झाली असून त्याचा मोठा फटका वाहनाना बसत आहे.
मुंबई- खड्डयांमुळे मुंबईच्या रस्त्यांची अक्षरक्ष: चाळणी झाली असून त्याचा मोठा फटका वाहनाना बसत आहे. खासगी वाहन चालक रस्त्यांवरील खड्डयांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत असताना आता ‘बेस्ट’नेही आपल्या नाराजीला मोकळी वाट करून दिली आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे बसेस चालवणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे खड्डेमय रस्त्यावर बस चालवता येणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सुनावत चालकांनी बसेस चालवण्यास नकार दिला आहे.
वांद्रे पूर्व टाटा कॉलनी परिसरात बेस्टच्या बसेस सुरू करण्याबाबत स्थानिक नगरसेवक इलियास शेख यांनी बेस्ट उपक्रमाला पत्र लिहिले होते. या पत्रावर बेस्ट उपक्रमाने टाटानगरमधील रस्त्यात खड्डे असल्याने तेथे बसेस सुरू करता येणार नाही, असे कळवले आहे. वांद्रे पूर्व येथील महाराष्ट्र नगर ते टाटा कॉलनी मार्गावरून बेस्टच्या २१५, ३१७ आणि ७५ अशा तीन बसेस सुरू होत्या.
परंतु गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावरील या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या बसेस सुरू करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा मागणी शेख यांनी केली होती. यावर धारावी बस आगाराचे उपव्यवस्थापक पी. के. धरणकर यांनी २८ ऑगस्ट २०१६ रोजी पत्र पाठवले. त्यात त्यांनी महाराष्ट्र नगर ते टॉटा कॉलनी मार्गावर मोठय़ा प्रमाणात खड्डे असून खराब रस्त्यांमुळे बसचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे हे खड्डे बुजवून रस्ता योग्यप्रकारे बनवला जावा.
तोवर या मार्गावरून बसेस सुरू करता येणार नाही, असे त्यांनी कळवले आहे. या पत्राच्या अनुषंगाने महापालिका अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त तसेच एच/पूर्व विभागाचे सहायक आयुक्त यांना पत्र देऊन त्यांना रस्ता योग्यप्रकारे बनवण्याची विनंती केल्याचेही म्हटले आहे.
वांद्रे-कुर्ला संकुलातील महाराष्ट्र नगर ते टाटा कॉलनी परिसरातील रस्त्यांचा विकास १९७६मध्ये प्रथम झाला होता. परंतु हा रस्ता वांद्रे-कुर्ला संकुलातील असल्याने ते एमएमआरडीएच्या अखत्यारित आहे. त्यामुळे हा रस्ता कुणी करावा, यातच रस्त्याचा विकास अडकला आहे. परिणामी या रस्त्यावर खड्डे तयार होऊन प्रवाशांना बस सेवेपासून मुकावे लागले आहे.
केवळ खड्डय़ामुळे बससेवा न पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारे प्रथमच बेस्टने उघडपणे भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे या रस्त्यांचा विकास करून बस सेवा सुरळीत करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी इलियास शेख यांनी केली आहे.