मूत्रपिंडाची कमतरता राज्यभरात जाणवत असून मुंबईत सध्या ३,११० जण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत ‘वेटिंग’वर आहेत.
मुंबई- मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांना प्रत्यारोपणाविना दुसरा पर्याय नसतो. पण मूत्रपिंड नातलगांनीच द्यावे, ही कायद्यात तरतूद आहे. मूत्रपिंड दान करण्यासाठी कोणी पुढे आले तर त्यांना ही परवानगी नाकारली जाते. रक्त जुळणारी व्यक्ती नातेवाईकच असेल तर मूत्रपिंड दान करणे शक्य होते. अन्यथा ‘ब्रेनडेड’ रुग्णाचे मूत्रपिंड दान करता येते. यामुळे मूत्रपिंडाची कमतरता राज्यभरात जाणवत असून मुंबईत सध्या ३,११० जण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत ‘वेटिंग’वर आहेत. मूत्रपिंडाच्या प्रतीक्षा यादीवर असणारे हे लोक आठ-दहा वर्षापासून अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. इतकंच नाहीतर वेळेवर अवयव न मिळाल्याने मृत्यू पावणा-या रुग्णांची संख्याही सर्वाधिक आहे. मूत्रपिंड दाते मिळत नसल्याने गेल्या काही वर्षात मूत्रपिंडाची गरज असणा-यांची प्रतीक्षा यादी अधिक पटीने वाढली आहे.
दरम्यान, हिरानंदानी किडनी रॅकेटप्रकरणानंतर प्रत्यारोपणाची भीती वाटू लागल्याने सर्व रुग्णालयातील प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बंद करण्यास डॉक्टरांनी नकार दिल्याने मूत्रपिंड प्रतीक्षा यादीत अजून वाढ होण्याची भीती वर्तवली जात आहे.
‘विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती’द्वारे मिळालेल्या माहितीनुसार, सन २०११-१५ या चार वर्षाच्या कालावधीत ६,२४३ दात्यांनी अवयवदानाची नोंदणी केलेली होती. तर या केंद्राच्या समन्वयातून ३९८ गरजूंना नवे जीवन मिळाले आहे. महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक व खासगी रुग्णालयातून २५६ मूत्रपिंडं, १३६ यकृत, ४ हृदय व २ फुप्फसे या प्रमाणे एकूण ३९८ अवयवांचे प्रत्यारोपण झाले होते. तर अवयवदानासंबंधीच्या प्रतीक्षा यादीवर २,७३७ गरजूंची नोंदणी आहे. ज्यापैकी २,५६५ जण अद्यापही मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत आहेत. याशिवाय यात आता ५४५ जणांची भर पडली असून ही संख्या आता ३,११० वर पोहोचली आहे. विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या एका अधिका-याच्या म्हणण्यानुसार, अवयवांच्या प्रतीक्षेत असणारे काही लोक दोन-तीन किंवा तब्बल आठ-दहा वर्षापासून वाट पाहात असतात. रक्तगट जुळणारे मूत्रपिंड मिळत नसल्याने रुग्णांना वर्षानुवर्षे डायलिसिसवर अवलंबून राहावे लागते. पालिकेच्या केईएम रुग्णालयात महिन्याला ४ ते ५ मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होतात. पण रुग्ण व दात्याचे रक्तगट जुळणे गरजेचे आहे. त्यामुळे रक्तगट न जुळल्याने सध्या रुग्णालयात ६४ जण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे मूत्रपिंड चिकित्सक तज्ज्ञ डॉ. निवृत्ती हासे यांनी दिली.
कायद्यात दुरुस्तीची आवश्यकता
मूत्रपिंड दान करण्यासाठी सध्या दात्यांची संख्या कमी आहे. शिवाय, नातेवाईकही दान करण्यासाठी पुढे येण्यास धास्तावतात. अशा स्थितीत अन्य व्यक्तीचे रक्तगट रुग्णाशी मिळतेजुळते असल्यास व ती व्यक्ती दान करण्यास राजी झाल्यास त्या व्यक्तीला कायद्याद्वारे दान करण्याची परवानगी नाही. त्यामुळे कायद्यात दुरुस्तीची गरज असून त्याबाबत केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने यात लक्ष घातल्यास अनेकांना जीवदान मिळू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मूत्रपिंड निकामी का होते
बदलती जीवनशैली मूत्रपिंड निकामी होण्याला कारणीभूत ठरत आहे. देशात प्रत्येकी दोन लाख लोकांमध्ये २० हजार लोक मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असतात. याशिवाय, वेदनारहित गोळ्यांचे अतिसेवना केल्यासही मूत्रपिंड निकामी होऊ शकते. मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका या लोकांना जास्त असतो, असे ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील डॉ. प्रतीतसमदानी यांनी सांगितले.
जागरूकता आवश्यक
‘लाईव्ह रिलेटेड’ व ‘कॅडेव्हर डोनेशन’ या दोन पद्धतीने मूत्रपिंड प्रत्यारोपण केले जाते. पण लाईव्ह रिलेटेड प्रत्यारोपणामुळे होणा-या गैरप्रकारामुळे कॅडेव्हरवर अधिक भर दिला पाहिजे. याकरता जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. खासगी रुग्णालयाच्या तुलनेत पालिका व सरकारी रुग्णालयात ब्रेनडेड रुग्णांची संख्या अधिक असते. पण या रुग्णालयात कॅडेव्हर डोनेशनसंदर्भात जागरूकतेचा अभाव असल्याने अवयवदान होत नाही. त्यामुळे सरकारने यासंदर्भात ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. जेणेकरून दात्यांची संख्या वाढली तर आपसुकच प्रतीक्षा यादी कमी होईल.