कर्जत-नेरळ राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या डिकसळ गावाच्या नाक्यावर विजेचे खांब जीवघेणे ठरत आहेत. खांबाजवळील विजेच्या तारेशी संपर्क आल्यानंतर एकाचा मृत्यू झाला आहे.
नेरळ- कर्जत-नेरळ राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या डिकसळ गावाच्या नाक्यावर विजेचे खांब जीवघेणे ठरत आहेत. खांबाजवळील विजेच्या तारेशी संपर्क आल्यानंतर एकाचा मृत्यू झाला आहे. नरेश गवळी असे त्यांचे नाव आहे. डिकसळ-गारपोली भागात पोद्दार सोसायटीमध्ये गवळी हे मागील काही वर्षापासून राहत आहेत. मूळचे मुंबई येथील असलेल्या या तरुणाने कर्जत-नेरळ राज्यमार्ग रस्त्यावरील डिकसळच्या नाक्यावर असलेले जय मल्हार हॉटेल चालवायला घेतले. गवळी रविवारी सकाळी घरातून निघून हॉटेलजवळ आले असता, त्या ठिकाणी वीज वाहक तार पडली होती. ती तार उचलून बाजूला करण्याचा प्रयत्नांत विजेचा जोरदार झटका लागून गवळी जागीच कोसळले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी तात्काळ वीज रोहित्र गाठून सर्व वीज पुरवठा बंद पाडला. या घटनेनंतर कर्जत येथील महावितरण कंपनीचे कामगार तात्काळ तेथे पोहोचले आणि तुटलेली तार तेथून हटवून पुन्हा वीज पुरवठा पूर्ववत केला. दरम्यान, महावितरण विभागाने या घटनेचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. नेरळ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
“महावितरणला ही घटना घडल्याची माहिती मिळताच तत्काळ कर्मचारी तेथे पोहोचले. सबंधित प्रकरणी पंचनामे करण्यात आले असून, त्याचवेळी सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर आकस्मिक मृत्यूची आर्थिक मदत देण्यात येईल.”
-सागर घुले,
उपअभियंता, कर्जत महावितरण
“आम्ही या पूर्वी अनेकदा सदर ठिकाणी आणि डिकसळ गावातील वीजवाहिन्या बदलण्याची मागणी केली आहे. महावितरण कंपनीने वेळेत कार्यवाही केली असती तर नरेश गवळी यांचे प्राण वाचले असते.”
-किशोर गायकवाड,”
उपाध्यक्ष आरपीआय, कर्जत तालुका
[EPSB]
पावसात सापडलेल्या कुत्र्याला सोशल मीडियाद्वारे पोहोचवले मालकापर्यंत
[/EPSB]