मराठा समाजाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी २९ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
मुंबई- मराठा समाजाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी २९ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सोमवारपासून मराठा आरक्षणावर नियमित सुनावणी सुरू होणार होती. मात्र, पहिल्याच सुनावणीदरम्यान पुढील सुनावणी एका महिन्यासाठी तहकूब करण्यात आली.
राज्यभरात मराठा आरक्षणासाठी मराठय़ाचे लाखा लाखांचे मोर्चे काढले जात आहेत. या पार्श्वभूमीवर विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाला दिले होते. त्यानुसार २७ फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणाची दैनंदिन सुनावणी उच्च न्यायालयात सुरू होणे अपेक्षित होते.
मात्र, पाच र्वष रिक्त असलेली मागासवर्गीय जमातीसाठीची समिती ४ जानेवारी २०१७ला राज्य सरकारकडून नव्याने स्थापन करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा या समितीपुढे मांडायचा की नाही, यावर पुढील सुनावणीला याचिकाकर्ते आणि राज्य सरकार आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे ही सुनावणी २९ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली. न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.